जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूची शोधूनी पाहे| ..... आजवरचं उपलब्ध संत साहित्यात हा श्लोक समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक ह्यात आहे. किती मार्मिक तसाच जिव्हाळ्याचा प्रश्न समर्थांनी काहीशे वर्षापूर्वी विचारला आहे. आणि म्हणून संत साहित्य हे कालातीत आहे. काळाचे सर्व संदर्भ जिथे अपुरे पडतात. काहीशे वर्षापूर्वी समर्थांनी विचारलेला प्रश्न आज पासून काही शे वर्षानंतरही तसाच राहील ह्यात काही शंकाच नाही. आज आपण अनेक मनो कायिक आजारांचा सामना करत आहोत. अति सर्वत्र वर्जयेत | असं कितीही संतांनी कळवळून सांगितलं तरी पालथ्या घड्यावर पाणीच. अति तेथे माती | अशा सारख्या शुभाशितांना काहीच अर्थ राहिला नाहीय. जीवन धकाधकीच झालंय. शांतता हरवलीय. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस अप ह्यामुळे आपल्या पिढीचे हजारो मनुष्य तास वाया जात आहेत. सर्वच दिशाहीन झालय. परिस्थितीचा रेटा इतका जबरदस्त आहे कि प्रपंचाच्या ह्या सागरात आपल जहाज भरकटत चाललंय. पण जहाजाचा कुशल कप्तान जसा मोठ्या संकटातून जहाजाला सुखरूप ठेवतो तसे आपणही आपल्या अंतर्मनाच्या सहाय्याने आणि आपल्या सुप्त शक्तींना विकसित करून ह्यातून सहज बाहेर पडू शकतो.
आज आपण सर्वच जण ताण तणाव ग्रस्त जीवन जगत आहोत. भौतिक गोष्टींच्या पाठी लागून जे हवं ते कुठल्याही परिस्थितीत मिळवण्याचा हव्यास आपल्याला आहे. त्यासाठी कुठलीही किंमत आपण मोजायला तयार आहोत. कुठे थांबायचं हेच कळेनास झालंय. आयुष्यातले प्रश्न मोठे आहेत. त्यांची उत्तर सापडत नाहीयेत. शिक्षणात अडथळे, व्यसनाधीनता, गृहकलह, विवाह होण्यात झालेला उशीर, बिघडलेले वैवाहिक जीवन, घटस्फोट, विवाहबाह्य संबंध, फसवणूक, संतती न होणे, झाल्यास व्यंग असणे किंवा रोगट असणे, अनारोग्य, अपघात, आर्थिक चिंता, पैसा पुरे न पडण, कमालीचे बिघडलेले नातेसंबंध वगैरे समस्यांची जंत्री कितीही केली तरी वाढतच जाणारी. शिवाय आपला भोवताल, तो तरी कुठे चांगला आहे? जागोजागी घाण, उखडलेले रस्ते, गर्दुल्ले आणि सामाज कंटक लोकांचा सूळसुळाट , गर्दी, गोंगाट, मोर्चे, असवेदनाशील राजकारणी, ह्यातून कुठे आशेचा किरण दिसतोय का? तर हो. नक्कीच. तो आशेचा किरण आपल्यातच आहे. आपल्या मनात.
तुकाराम महाराजांनी जसे म्हटले आहे, मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण | हे जे मन आहे ते जर स्थिर नसेल तर ते प्रसन्न कसे होईल? मग मनाला स्थिर कसे करावे? पहिले म्हणजे आपल्याला अशी इच्छा असायला हवी कि मला कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहायचय. मग इच्छा तिथे मार्ग निघणारच. कसा? जेव्हा माझ्या समस्या सोडविण्यात मी असमर्थ ठरतो तेव्हा मी त्यांचा जास्त विचार करत नाही, मी माझे विचार बदलतो. समस्या अपोआप सुटतात. हे तत्व महत्वाचे. जेव्हा समस्या निर्माण होते तेव्हा आपण समस्येवर विचार केंद्रित न करता उपायांवर चित्त केंद्रित केलं तर? तर दिशा मिळते दुसर असं कि जी गोष्ट आपल्या डायरेक्ट कंट्रोल मध्ये नसते त्या गोष्टीवर आगपाखड करण्यात काय अर्थ आहे? उगीचच गडबड करून, तिरसट वागून, रागावून, कुढत बसून परीस्थितीत बदल होतो का? नाही. अप्रिय भूतकाळाचा, अप्रिय घटनांचा, दुखांचा सतत विचार न करणे हेच शहाणपणाचे नाही का! आभाळात ढग दाटून आले आहेत तर पाउस पडणारच. पाउस पडला तर चिखल होणारच. चिखल झाला तर तो अंगावर उडणारच. मग आपल्या हातात काय उरते? पावसाचा तिरस्कार? चिखलाचा तिरस्कार? परिस्थितीचा तिरस्कार? जर आपण आपले विचारच बदलले तर नकीच तो पाउस आपण एन्जॉय करू शकू. जे अटल आहे ते घडणारच त्याचा पूर्ण स्वीकार करण्यानेच जीवन सुसह्य होईल नाही का.
ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या गोष्टीही आपल्याला अस्वस्थ करतात. एखादी व्यक्ती. स्थळ, समुदाय, विचार, पदार्थ असं काही असू शकते. पण त्याचा तरी किती विचार करायचा? रस्त्यावर चालताना घाण पडली असेल तर आपण काय करतो? ती साफ करतो कि नाकावर रुमाल ठेऊन बाजूने निघून जातो? बरोबर. नाकावर रुमाल ठेऊन बाजूने निघून जातो. याला म्हणतात उपेक्षा करणे. तशीच उपेक्षा आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींची कारायला हवी. डोळेझाक करणे, टाळणे, दुर्लक्ष करणे असे काही नाक्कीच्कारता येईल.आपल्या मनाला तशा सूचना द्यायच्या.
आणखी आपण निराश होतो जेव्हा आपण ठरविलेल्या गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत किंवा मिळत नाहीत. आपल्या योजना फसतात. प्रसंगी आपले नुकसान होते. निश्चित ध्येय नसेल तर कोणतीही योजना कार्यान्वित होणार नाही. एकदा का आपण आपले ध्येय ठरविले कि मग काहीही , कितीही अडचणी आल्या, कितीही पीछेहाट झाली तरी हट्टाने आपल्या ध्येयास चिकटून राहणे आवश्यक आहे. आपले ध्येय हे आपल्याला त्या आशेच्या किरणासारखे असते. तेच सतत आपल्याला मार्गदर्शन करते. दुसरे काय म्हणतात ते न ऐकता सतत आपल्या ध्येयाचाच पाठपुरावा करत राहणे महत्वाचे. विलंब लागत असेल तरी हरकत नाही यशाच्या आशेने पुढे पुढे सरकत राहणे हे परत मागे फिरण्यापेक्षा कैक पटीने चांगले नाही का? आपल्या भारतीय तत्वज्ञानात एकांताचा पुरस्कार केलेला दिसून येतो. एकांत म्हणजे एकटे असणे नव्हे. एकटेपणा हा एक प्रकारचा विकार झाला पण एकांत हा जाणून बुजून एकटे राहण्याचा घेतलेला निर्णय असतो. आयुष्यातली खूप गहन अशी कोडी आपल्याला एकांतात सुटतात असा अनुभव आहे. आपण जर नेहमीच घाई गर्दीत राहिलो, झगडत राहिलो तर आपल्याला आपल्या ध्येयपूर्तीची फळ चाखायला कशी मिळतील. प्रसंगी मनाला आणि शरीराला विसावा देणे, आपल्या सुखासाठी समाधानासाठी स्व्यास्थ्यासाठी प्रयत्नरत राहणे महत्वाचे नाही का. आणि म्हणून आपल्या चित्त वृत्तीमध्ये जर आपण समतोल साधला तर मनःशांतीच्या दिशेने टाकलेले ते एक दमदार पाउल ठरेल हे निश्चित. हा समतोल कसा साधायचा ह्याची उत्तरे संत साहित्यात नक्कीच सापडतात. गीतेमध्ये भगवान श्री कृष्णाने म्हटले आहे सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ। ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. जीवन हा एक संघर्ष नाही का? एक प्रकारचे युद्धच आहे. आपले आपल्याशी चाललेले युद्ध. तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आपला आपल्याशीच झगडा चाललेला असतो सतत. आपला अर्जुन झालेला आहे. म्हणून श्री कृष्णाने उपदेश केलाय कि सुखाची दुखाची, जयाची, पराजयाची, लाभाची, हानीची पर्वा न करता केवळ विहित कर्म करणे हेच महत्वाचे. स्तुतीने हुरळून जाऊ नये. अपमानाने निराश होऊ नये, यशाचा गर्व करू नये. हा उपदेश जर आपण तंतोतंत पाळला तर चित्ताचा समतोल साधता येतो. त्यातूनच आपल्याला भूतकाळासाठी नाही,भविष्यासाठी नाही अगदी आजच्या दिवसासाठी नाही तर आत्ताच्या क्षणासाठी जगता येते. शेवटी वाहत्या पाण्यात आपल्याला आपले प्रतिबिंब दिसेल काय? नाही. आपले प्रतिबिंब दिसण्यासाठी पाणी स्थिर असण गरजेच तसाच मनाचा तळ ढवळून निघत असेल तर आपल्याला कशातही यश मिळणार नाही. जर मन स्थिर असेल तरच यशाची अपेक्षा करता येते. प्रसन्नता हा नंतरचा भाग. एक स्थिर मनच प्रसन्न असू शकते. आणि जेव्हा आपल मन स्थिर होत नसेल तेव्हा कशी गत होते जस बहिणाबाई म्हणतात मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर. किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. हे जे मन आहे ते मोकळ्या जनावर सारख आहे. जनावराला जर मोकळं सोडलं तर ते उभ्या शेतात घुसत कितीही हाकलल तरी परत परत शेतात येत. तस मनाच आहे. जनावराला जस खुंट्याला बांधतात तास आपल मनही खुंट्याला बांधणे गरजेच आणि हा खुंटा कुठला तर आपल्या ध्येयाचा. म्हणून मनः शांतीचा मार्ग हा आपल्या ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेतून त्याच्या पूर्तीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कष्टातून आणि समतोल वृत्तीसाठी केलेल्या प्रयत्नातून प्रशस्त होतो. आपल मन हे प्रचंड अशा उर्जेचा एक स्त्रोत आहे. हि जी मनाची शक्ती आहे तीच संवर्धन करणे गरजेचे असते. ती जशी विधायक आहे तशी विघातक देखील. साधी गोष्ट. चाह्गल्या कामासाठी वापरली तर विधायक. वाईट कामासाठी वापरली तर विघातक. आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू. पूज्य वामनराव पै नि म्हटलंच आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरच आहे ते. मनाच्या क्षोभाला आपण जबाबदार असतो आणि मनःशांतीला सुद्धा आपणच जबाबदार असतो. पाणी जसे पतन शील असते. उताराकडे वाहते पण जर त्याला बंध घालून अडवले तर त्यातून आपण वीज निर्मिती करू शकतो. अनेक इतर विधायक काम करू शकतो तसच मनाच सुद्धा आहे. मन हे पतनशील असत. ते सहज विकारवश होते. म्हणून त्याला विधायक कामाकडे वळवणे अतिशय गरजेच. म्हणतात ना रिकामे मन भुताचा कारखाना. अशा या मनाला स्थिर ठेवण्यासाठी त्याच्या समोर ठराविक ध्येय असणं गरजेच. अशा या मनाची शक्ती वाढविण्यासाठी उपासनेची कास धरणे तितकेच महत्वाचे. सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्ती. उपास्य दैवताची भक्ती केल्यामुळे त्या दैवताचे संरक्षण प्राप्त होते. कवच प्राप्त होते. चांगल्या विचारांचा, संगतीचा लाभ होतो. आपले ध्येय सध्या करण्याकरिता करीत असलेल्या प्रयत्नांना ईश्वराचे अधिष्ठान मिळते. आशीर्वाद मिळतात आणि कार्यसिद्धी होते. आणि कार्यसिद्धी झाली कि मनःशांती आलीच.