Sunday, July 21, 2019

ज्योतिष : वैवाहिक समुपदेशन : - तू याच्याशी विवाह करशील तर एक तर विधवा होशील किंवा मरशील!


प्रिया (नाव बदलेले आहे), अत्यंत चिंताग्रस्त अवस्थतेत माझ्या समोर बसली होती. सतत ओढणीशी चाललेला चाळा तिची मनोवस्था अधोरेखित करीत होता. मी मात्र तिच्या कुंडलीत लक्ष घालीत मनातल्या मनात विश्लेषण करीत होतो. जे काही सांगायचे ते तिने सांगितलं होतच. समीर बरोबर असलेले तिचे प्रेमसंबंध विवाहात बदलणार होते. सुखी संसाराची गोड स्वप्न उभयतांनी रंगवली तर होतीच. आता काही दिवसातच तो तिचा आणि ती त्याची होणार होती. And they lived happily together, forever..... आम्ही आपले होतोच दोन्ही मांडवाचे व्हाराडी! "नांदा सौख्यभरे!" असा आशीर्वाद भरभरून द्यायला. बाहेर पावसाचा ताशा वाजत होताच. मी मात्र तिच्या कुंडलीशी चाललेल्या संवादात गर्क होतो. 
दोघांच्याही कुंडलीचे विवाहमेलन मी अष्टकवर्ग तालिकेवरून केलं, १२ पैकी ८ स्थानाचे गुण दोघांच्या बाबतीत चांगले होते. तनु स्थान, धन स्थान, सप्तम आणि व्यय स्थानाचे गुण कमी होते त्यावरून कुंडली जुळत असल्याचा निष्कर्ष मी काढला. तसं मी प्रियाला सांगितलेहि, तरीसुद्धा तिच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर कुठलीतरी अनामिक भीती दिसतच होती. शेवटी तिने मौन सोडले. जर समीरशी विवाह केला तर एक तर ती विधवा होईल किंवा तो विधुर होईल असे भाकीत त्यांच्याबाबतीत एक नव्हे तर दोन ज्योतिषांनी केले होते. अष्टकवर्ग तालिकेत दोघांचेही तनु स्थानाचे गुण कमी होतेच, आता मला दोघांच्याही कुंडली आणखी काळजीपूर्वक पाहणे गरजेचे होते. प्रथम म्हणजे तिच्या कुंडलीत अकाली वैधव्याचे योग्य आहेत का ते पाहणे  व त्याच्या कुंडलीत विधुर होण्याचा किंवा द्विभार्या योग आहे का ते पाहणे महत्वाचे होते. दोघांचीही आयुर्मर्यादा पाहणे गरजेचे होते. कुंडलीत अपघात योग, अपमृत्यु योग आहे का नाही ते पाहणे ओघाने आलेच. मी पुन्हा एकदा कुंडलीतील भाव, राशी , नक्षत्र, भावेश, नक्षत्रस्वामी ,नवमांश, विंशोत्तरी दशा इ तपासणे चालू केले. 
तसे पाहिले तर ९९.९९% कुंडलीमध्ये वैधव्य किंवा विधुरत्व योग हा असतोच, मानव हा मर्त्य आहे म्हणजे दोघांपैकी कोणी न कोणीतरी पहिला जाणारच, पण ४० -४५ वर्षाचे वैवाहिक जीवन जगल्यावर, मुले आपापल्या मार्गात सेटल झाल्यावर वार्धक्यात जर वैधव्य अथवा विधुरत्व येणार असेल तर त्याला नाईलाज आहे. अशी परिस्थिती ऐन तारुण्यात उद्भवली तर कठीणच. तसे कोणाचे होऊ नये पण नशिबात तसेच असेल तर !!!
स्त्रीच्या कुंडलीत वैधव्य योग असताना पतीच्या कुंडलीत अल्पायु योग नसेल तर अशा बाबतीत स्त्रीच्या कुंडलीतील वैधव्य योग निष्प्रभ ठरतो. पाप ग्रह दृष्ट मंगळ जर लग्न स्थानात किंवा चंद्राच्या सप्तमात असेल तर वैधव्य योग निर्माण होतो. सप्तमात अशुभ ग्रह क्रूर नक्षत्रात असेल व ग्रहाच्या दृष्टीत असेल तर वैधव्य योग बनतो. अष्टमात अशुभ ग्रह क्रूर नक्षत्रात, शत्रू राशीत, शत्रू ग्रहाच्या दृष्टीत असेल तर अशी ग्रह स्थिती पतीच्या मृत्यूस कारण ठरू शकते. सप्तमेश व अष्टमेश यांच्यात परिवर्तन योग होत असेल तर वैधव्य येऊ शकते. सप्तमात पाप ग्रहाची राशी असून तेथे शनी असेल तर वैधव्य योग होतो. लग्न व सप्तमात राहू - केतू असून अष्टम वा व्ययात पाप ग्रह असतील तर वैधव्य योग होतो. 
समीरच्या कुंडलीत अल्पायु योग्य आहे का हे पाहणे आवश्यक होते. आयुर्मर्यादा हि एकूण ३ प्रकारे पाहिली जाते. साधारण ३३ ते ३४ वर्षे हे अल्पायु, ३३ ते ५५ -६० वर्षे मध्यायु आणि त्यापुढे दीर्घायु. आयुर्मर्यादा ठरवण्यासाठी मारक व बाधक स्थानांचा विचार करावा. कुंडलीतील २ व ७ हि मारक स्थाने आहेत तर बाधक स्थाने हे लग्न राशी नुसार बदलतात. लग्न राशी जर चर तत्वाची असेल म्हणजे मेष, कर्क, तुला व मकर असेल तर ११ वे स्थान हे बाधक स्थान होते. लग्न राशी जर स्थिर तत्वाची असेल तर म्हणजे वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ असता नवम स्थान बाधक मानले आहे. तसेच मिथुन, कन्या, धनु व मीन या द्विस्वभाव राशींचे लग्न असेल तर सातवे स्थान बाधक मानले आहे. कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आयुर्मर्यादा ठरवण्यासाठी पुढील नियम आहेत. १) जर लग्न स्थानाचा उपनक्षत्रस्वामी मारक व बाधक 'दोन्ही' स्थानांचा कार्येश असेल आणि १,५,९,११ यापैकी किमान दोन स्थानांचा कार्येश नसेल तर जातक अल्पायु असतो. अर्थात चर लग्नासाठी ११ वे आणि स्थिर लग्नासाठी नववे स्थान वगळावे. आणखी म्हणजे लग्न स्थानाचा उपनक्षत्रस्वामी मारक बाधक स्थानांचा कार्येश होत नसताना तो जर आयुष्यवर्धक अशा १,५,९,११ या स्थानांचा देखील कार्येश होत नसेल तरी जातक अल्पायुषी असतो. २) जर लग्न स्थानाचा उपनक्षत्रस्वामी मारक किंवा बाधक या पैकी कोणत्याही भावांचा कार्येश नसेल किंवा फक्त मारक व बाधक यापैकी एका भावाचा कार्येश असेल त्याचबरोबर आयुष्य मर्यादा वाढविणाऱ्या किमान २ भावांचा कार्येश असेल तर अशी व्यक्ती दीर्घायु असते. ३) जर लग्न स्थानाचा उपनक्षत्रस्वामी मारक व बाधक या दोन्ही स्थानाचा कार्येश असेल त्याच बरोबर आयुष्यवर्धक अशा २ किंवा त्यापेक्षा जास्त स्थानांचा कार्येश असेल तर व्यक्ती मध्यायु असेल. अशाप्रकारे  एकदा आयुष्य मर्यादा निश्चित केल्यानंतर त्या काळात येणाऱ्या महादशा स्वामींचा अभ्यास करावा. जो महादशा स्वामी मारक व बाधक दोन्ही स्थानांचा कार्येश होतो त्या महादशेत मृत्यू होतो. एकापेक्षा जास्त महादशा स्वामी मारक व बाधक दोन्ही भावांचे कार्येश होत असतील तर रुलिंग प्लॅनेटचा आधार घ्यावा. गुरुवर्य कृष्णमूर्ती यांच्यामते अष्टम भावारंभाचे सह अधिपती म्हणजे अष्टम भाव ज्या राशीत, नक्षत्रात व उपनक्षत्रात असतो त्यांच्या महादशा, अंतर्दशा, विदशा असतानाच कालखंड धोकादायक असतो. दुसरे असे कि अष्टमेश ज्या राशीत, नक्षत्रात व उपनक्षत्रात असतो त्या अधिपती ग्रहाची महादशा, अंतर्दशा, विदशा धोका दायक होतो. त्यातून हे स्वामी ग्रह अशुभ स्थानी किंवा क्रूर नक्षत्रात असतील तर अनैसर्गिक वा आकस्मिक मृत्यू होतो. हाच विचार वैधव्य योग पाहण्यासाठी पत्नीच्या कुंडलीत सप्तमाच्या उपनक्षत्र स्वामींच्या बाबतीत करायचा.

प्रियाच्या कुंडलीत लग्न स्थानी तुला राशी येते म्हणजे २, ७ हि स्थाने मारक व ११ वे स्थान हे बाधक झाले. प्रियाचा लग्न स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा चंद्र आहे. चंद्र हा मंगळाच्या चित्रा नक्षत्रात आहे. चित्रा हे उग्र प्रवृत्तीचे नक्षत्र आहे. चंद्राचा उपनक्षत्र स्वामी बुद्ध आहे. बुद्ध राहूच्या नक्षत्रात आहे. म्हणजे चंद्र, मंगळ, बुद्ध व राहू यांचे कार्येशत्व पाहायचे ते खालील प्रमाणे.

चंद्र - १०, १२, ७, २
नक्षत्र स्वामी मंगळ - ५, १०, ४, २, ७
उप नक्षत्र स्वामी बुध - १, ९, १२
बुधाचा नक्षत्र स्वामी  राहू - १, ७ ,८

ग्रहांचे कार्येश भाव पाहिले तर कुठेही ११ वे बाधक स्थान कार्येश झालेले नाही. १,५,९ हि आयुष्य वर्धक स्थाने कार्येश झालेली दिसतात म्हणजे प्रियाचे आयुष्यमान हे दीर्घायु या गटात मोडते.

आता तिच्या सप्तम स्थानाचा विचार करूया..

सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी - राहू हा गुरूच्या नक्षत्रात असून त्याचा उपनक्षत्रस्वामी शनी आहे. शनीचा नक्षत्रस्वामी राहूच आहे.

राहू, गुरु व शनी पुढील प्रमाणे कार्येश होतात
राहू - १, ३, ६, ८
गुरु - १, ३, ६
शनी - १, ५ , ४

वरील कार्येश ग्रहांचा विचार करता कुठेही मारक बाधक स्थान कार्येश झालेले दिसत नाही पण १,६,३, ८ हि सर्व विवाह विरोधी स्थान कार्येश झालेली दिसतात. तृतीय स्थान तर कायदेशीर विवाह विच्छेद दर्शवते पण प्रियाच्या पुढील दशा स्वामींचा विचार केला तर सध्या २०३१ पर्यंत गुरूचीच महादशा सुरु असून त्यापुढे शनीची महादशा चालू होईल. गुरु व राहू हे तुला या विषम राशीत २२ अंशावर आहेत म्हणजे वृद्धावस्थेत आहेत म्हणजे त्यापासून मिळणारी अशुभ फळे नगण्यच मिळतील. घटस्फोट निश्चितच नाही होणार , फार तर दुरावा तोही तत्कालीन संभवतो. म्हणजे चिंता नॉट. चंद्राच्या सप्तमात केतू सारखा पाप ग्रह आहे. केतू २२ अंशावर आहे म्हणजे वृद्धच. शुक्रही स्वराशीचा वृद्ध अवस्थेत. या सर्वच परिपाक म्हणजे वैधव्य नाही. घटस्फोट नाही.

आता समीरची कुंडली पाहूया..
समीरची लग्न राशी वृश्चिक आहे म्हणजे नवम स्थान हे बाधक झाले व २,७ हि स्थाने मारक झाली.
समीरच्या कुंडलीत लग्नस्थानाचा उपनक्षत्रस्वामी शनी हा राहूच्या नक्षत्रात असून त्याचा उपनक्षत्रस्वामी बुद्ध आहे. बुद्ध राहूंच्याच नक्षत्रात आहे. तर हे आपले  खेळाडू खालील प्रमाणे कार्येश होतात

शनी - ११, ३
राहू - ११,२,४,६,७
बुद्ध - ११,८, १०

वरील जंत्री पाहिली तर काय दिसते बाधक स्थान कुठेही कार्येश झालेले नाही. उलट आयुष्यवर्धक ११ वे स्थान कार्येश झालेले आहे. म्हणजे समीर दीर्घायु या गटात आला. समीरच्या कुंडलीत चंद्र मारक व बाधक दोन्ही स्थानांचा कार्येश झालेला आहे - ११,९,६,७ आणि चंद्राच्या महादशेत गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्याचा अपघातही झाला होता त्यातून तो वाचला. आता एवढा सर्व उहापोह करून झाल्यानंतर मी प्रियाला निक्षून सांगितले , चिंता नॉट ! दोनच शब्द. - नांदा सौख्यभरे. पण मनात एक गोष्ट आलीच एवढ्या २-२ ज्योतिषांना असे काय दिसले कि एवढा निगेटिव्ह फलादेश द्यावा? प्रियाचे दोन्ही हाताचे ठसे घेतले आणि माझे स्नेही हस्त सामुद्रिक शास्त्राचा गाढा  व्यासंग असलेले श्री हेमंतजी रणनवरे यांना संपर्क केला. त्यांनी तिचे हात पाहून १० मिनिटात सांगितले. गो अहेड !! मग मी पण तिला म्हणालो, पहा २-२ ज्योतिषी सांगतायत - तू याच्याशी विवाह करशील तर एक तर विधवा होशील किंवा मरशील! हे साफ चुकीचे आहे!



ज्योतिषी - श्री. आमोद ननावरे (वसई) - ७७०९५९४९०२, ८७८८१३७१४
ज्योतिषी - श्री, हेमंत रणनवरे (नाशिक) - ७७२००६६६१८, ९६३७३२३०४१


जातक : महिला - प्रिया (नाव बदललेले) - ०६/१०/१९९४ स. ०७:४५ नाशिक.
जातक : पुरुष - समीर (नाव बदललेले) - ०३/१०/१९९४ स. ११:५० मुंबई.

प्रस्थापितांनी आणि नवोदितांनी जरूर आपल्या कमेंट व सूचना कराव्यात! स्वागतच आहे.