Wednesday, May 3, 2017

वाढदिवस आणि नामस्मरण

नमस्कार,

आज एकूणचाळीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे, म्हणजेच अस्मादिकांचा वाढदिवस. तसा तो दर वर्षीच येतो. आणखी एक वर्षाने शरीराचे वय वाढते ( मनाचे वय हा स्वतंत्र विषय) आणि योगायोगाने एक सत्पुरुष श्री केशव बेलसरे यांचा एक लेख वाचनात आला. प. पु. गोंदवलेकर महाराजांचे ते अंतरंग शिष्य. साधकांसाठी त्यांनी लिहिलेले बहुदा शेवटचे पत्र खाली उद्धृत करीत आहे. पु. बाबांच्या विचारांनुसार आज भरपूर नाम घेण्याचा प्रयत्न करणार. कारण एक गोष्ट पटलेली आहे, हाताशी असलेला वेळ खूप कमी आहे. माझ्या, तुमच्या आणि आपणा सर्वांच्या.

*||श्रीराम||*

*आणखी चार महिन्यांनी मी ९० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. मला माझ्या चौथ्या वर्षापासून स्पष्ट स्मृती आहे. मी या ८५ वर्षात जे शिकलो ते प्रत्येकाला उपयोगी पडेल म्हणून सांगतो.* 

*१) आपल्या जीवनाचा जसा आरंभ होतो, तसा त्याचा शेवट कधीच होत नाही. कारण सगळेच कल्पनेबाहेर बदलते. परिस्थिती पण बदलते. माणसे बदलतात. इतकेच नव्हे तर आपले शरीर आणि मन देखील बदलून जाते.* 

*२) जीवन म्हणजे एक गूढ प्रवास आहे. आपण कोठून या जगात आलो, कोणी पाठवले हे आपल्याला कळत नाही. तसेच हे जग कशा परिस्थितीत सोडायचे, कोठे सोडायचे, कशा अवस्थेत सोडायचे हे आपल्याला ठाऊक नाही. बरे! जग सोडल्यावर आपण कुठे जातो, आपल्याला कोण भेटतात, त्यांच्या सहवासात किती काळ राहायचे हे माहीत नाही. एकूण जीवनाचा आरंभ अज्ञानात होऊन त्याचा अंत देखील अज्ञानात घडून येतो.* 

*३) आपण आपल्या इच्छा तृप्त करण्याचा जन्मभर सतत प्रयत्न करतो; परंतु ते घडवून आणण्याची शक्ती आपल्या अंगात नसते. पुढे जे घडून यावे असे वाटते, त्याची उपाय रचना आपण सतत करतो. पण आपले उपाय दृश्यावर म्हणजे समकालीन माणसांच्यावर आणि घटनांवर अवलंबून असतात, त्यामुळे प्रत्यक्षात जे घडून येते, ते आपल्या मनाच्या उलट किंवा मनासारखे घडलेच तरी त्याने मनाचे समाधान होत नाही.* 

*४) यावरून मी असे शिकलो की मानवी जीवन माणसाने ठरविलेल्या सिद्धांताप्रमाणे चालत नाही. ते आगगाडीच्या रूळाप्रमाणे ठरलेले नाही. ते एखाद्या समुद्राकडे धावणा-या नदीसारखे आहे. कोणाच्या वाट्याला काय प्रसंग येईल हे कोणास सांगता येत नाही.* 

*५) आपल्या मनासारखे व्हावे असे तर वाटते आणि तसे घडेल याची खात्रीही नसते. म्हणून प्रत्यक्ष जीवन जगताना मनाला एक प्रकारची अस्वस्थता, काळजी, भीती आणि असुरक्षितता व्यापून राहते. त्यातून मोकळे होण्यास अज्ञाताची कास धरल्या वाचून गत्यंतर उरत नाही. अज्ञात दोन प्रकारचे आहे. १. विश्वाला चालवणारी प्रचंड शक्ती आणि २. ती शक्ती ज्या व्यक्तीमध्ये प्रत्यक्ष अवतरते त्याचा सहवास.* 

*६) विश्वाला चालविणा-या अज्ञात शक्तीला नियती असे म्हणतात. नियतीला संत प्रारब्ध असे म्हणतात. नियतीवर पूर्ण श्रद्धा ठेवून जीवन जगणे सामान्य माणसाला फार कठीण जाते. नियती आपल्या जीवनात काय उलटापालट करील याचा अंदाज कोणालाच करता येणार नाही.* 

*७) म्हणून ज्या व्यक्तीमध्ये विश्वशक्ती साकार होते, अशा सद्गुरूंना मनात घट्ट धरणे हा जीवनातील काळजी, भीती आणि असुरक्षितता नाहीशी करण्याचा रामबाण उपाय आहे. हे मी जीवनात अत्यंत स्पष्टपणे शिकलो.* 

*८) संताला मनाने घट्ट धरणे म्हणजे त्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे स्थान देणे. मी शरीराने व्यवहारात वागत असताना "मी त्यांचा आहे" असे म्हणून त्याचे सतत स्मरण बाळगणे ही संतांचे झाल्याची खरी खूण आहे. आपल्याला अज्ञाताची इच्छा काय आहे ते कळत नाही, म्हणून आपल्या इच्छेमध्ये आणि त्यांच्या इच्छेमध्ये संघर्ष येतो. तो नाहीसा व्हावा यासाठी आपण आपली इच्छा त्यांच्या इच्छेमध्ये विलीन करण्याचा अभ्यास करावा. या अभ्यासालाच नामस्मरण असे संत म्हणतात. म्हणून नामस्मरणाने माणसाचे जीवन अज्ञाताने भरून जाते. एकदा ते भरले की मग कोणत्याही परिस्थितीत माणसाचे समाधान भंगणार नाही असा अनुभव येतो. यासाठी माझ्या शेवटच्या दिवसात मी सगळे सोडून नामस्मरण करतो.* 

*के. व्ही. बेलसरे*
*१४/०९/१९९७*

||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

No comments:

Post a Comment