Monday, February 19, 2018

ग्रहांची रत्ने व जंतर यंत्रे (भाग १)

हल्ली आंतरजालावर उपलब्ध माहितीवर विसंबून अनेक जण रत्न खरेदी करून धारण करतात. आंतरजालावर उपलब्ध माहिती हि जरी काही प्रमाणात खरी वाटली किंवा असली तरी तज्ञ ज्योतिषाच्या सल्ल्या शिवाय कुठलेही रत्न धारण करणे अत्यंत धोक्याचे असते. शिवाय प्रत्येक कुंडलीचा दर्जा हा वेगळा असतो. एखादे रत्न हे जरी लाभणार असले तरी त्याचाही एक कालावधी असतो तो कुंडलीच्या अभ्यासावरून समजतो. उदा. गुरु ग्रह हा नैसर्गिक शुभ ग्रह असला तरी तो मिथुनेचा व्ययात असून कर्क लग्नास षष्ठेश व भाग्येश झाला असता पुष्कराज वापरला तर ऐश्वर्य वृद्धी करता इष्ट असला तरी मधुमेह सारखे आजारास कारणीभूत होतो. मग पुष्कराज वापरणे बरोबर का? बिघडलेला शुक्र असताना शुक्राचे रत्न वापरले तर जातकाची लैंगिकता बळावते आणि चारित्र्य हनन होण्याचा संभाव असतो. म्हणून कुठलेही रत्न वापरणे योग्य नव्हे. कुंडलीमध्ये सर्वच ग्रह काही शुभकारक नसतात. नैसर्गिक शुभ ग्रह देखील अशुभ स्थानाचे स्वामित्व करतात व अशुभ ग्रह शुभ स्थानाचे स्वामित्व करतात. कुंडलीतील १२ ग्रहांपैकी फक्त गुरु आणि शुक्र हे नैसर्गिक शुभ ग्रह असतात पण चंद्र आणि बुध हे शुभ ग्रह असूनहि अशुभ ग्रहांच्या कुयोगात अशुभ फळे निर्माण करतात. उदा. कर्क लग्नाचा स्वामी चंद्र जरी लग्नेश असला तरी तो जर अष्टमात असेल तर अशावेळी मोती वापरल्यास खूप त्रास होतो. कुंडलीतील १२ स्थानांपैकी ६,८, व १२ हि स्थाने तर पहिल्या प्रतीची अशुभ स्थाने आहेत. २ व ७ स्थानाचे स्वामी मारकेश असतात उदा. वृश्चिक लग्नास धनेश गुरु असला तरी तो मारकेश झाला म्हणजे अशुभ. काहीवेळा केंद्राधीपत्य दोषामुळे शुभ ग्रह अयोग्य ठिकाणी पडल्यास दुषित होतो. काही वेळा शुभ ग्रह पापकर्तरी योगामुळे दुषित होतो. बऱ्याच ग्रहांना दोन दोन राशींचे स्वामित्व असल्यामुळे त्या ग्रहाचे रत्न वापरल्यामुळे शुभ ग्रहाचे फायदे मिळतील पण दुसऱ्या अशुभ ग्रहांचे तोटे पण सहन करावे लागतील. मिथुन लग्न विचारात घेतले तर षष्ठात मंगळ असताना पोवळे धारण केले तर शत्रूचा नाश होईल पण त्याच वेळी मंगळाची व्यय स्थानावरील दृष्टी त्या व्यक्तीला खूप अनाठाई खर्चात टाकेल.अशावेळी मंगळाचे जंतर यंत्र वापरल्यामुळे शत्रू नाश निवारण व खर्चालाही मर्यादा राहील. जंतर यंत्राचा वापर हा निर्धोक आणि तुलनेने कमी खर्चाचा असतो.
६,८,१२ स्थानात पडलेल्या ग्रहांची रत्ने वापरल्याने त्या ग्रहांच्या अशुभ परिणामत वाढ होते. शुभ ग्रहही नीच राशीत असेल तर त्याच्या कारकत्वाच्या दृष्टीने अशुभ ठरतो. काही ग्रहांच्या दृष्टी बाधक असतात अशा ग्रहांच्या रत्ने त्यांचे बल वाढेल आणि कुंडलीतील २-३ स्थानांना ते बाधक होईल. तेव्हा अशा सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करूनच एखाद्या ग्रहाचे रत्न वापरणे योग्य ठरते. त्यात मुख्यतः मंगळ, शनी, हर्शल, राहू, केतू, नेपच्यून ह्या ग्रहांची रत्ने अयोग्य रित्या वापरली तर फारच हानिकारक ठरतात असा अनुभव आहे. अशावेळी त्या त्या ग्रहांची जंतर यंत्रे वापरणे हे केव्हाही चांगले. त्यामुळे काही त्रास होत नाही पण लाभ मात्र होतोच. हि जंतर यंत्रे त्या त्या विवक्षित ग्रहाच्या मंत्राच्या विशिष्ठ संख्येने केलेल्या जपाने सिद्ध करावी लागतात.
काही उदाहरणांनी स्पष्ट करायचे झालेच तर, ज्यांना नोकरीतून निलंबित केले आहे त्यांनी शनी आणि राहूचे जंतर यंत्र व गुरूचा पिवळा पुष्कराज तज्ञ ज्योतीर्विदाच्या मार्गदर्शनाने घेऊन वापरावा. ज्या पुरुषांचे लग्न लवकर होत नाही त्यांनी शुक्राचे जंतर यंत्र वापरावे, कारण पुरुषांच्या कुंडलीत शुक्र हा विवाहाचा कारक असतो. स्त्रियांच्या कुंडलीत विवाहाचा कारक ग्रह हा गुरु असतो. विवाहास  उशीर होत असेल तर पिवळा पुष्कराज वापरावा जर शक्य नसतील तर गुरुचे जंतर यंत्र वापरावे. ज्या व्यक्तीचा स्वभाव चिडखोर, वादावादी करणारा तापट असेल तर अशा व्यक्तीने ४ ते ७ रती मोती चांदीच्या अंगठीत पौर्णिमेच्या रात्री चंद्र होऱ्यात चंद्रास नमस्कार करून वापरावा. रत्ने अनेक रोगही बरे होतात. ज्यावेळी ग्रह निर्बली, नीच राशीत, पिडीत असेल अगर तो ग्रह कुंडलीत अशुभ स्थानात पडला असेल किंवा अशुभ स्थानाचा अधिपती असेल त्यावेळी त्या ग्रहाचे जंतर यंत्र वापरावे.
ग्रहांची जंतर यंत्रे, त्याची जप संख्या याविषयीची सविस्तर माहिती पुढच्या लेखात देतो. 

सध्या .. सर्वे सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामया:  श्री स्वामी समर्थ | जय जय स्वामी समर्थ|

ग्रह शांतीचे सुलभ उपाय. (विवाह विशेष)

काय होतंय तेच कळत नाही. जिथे हात लाऊ त्याची माती होतेय. कुठ्ल्याही कामात अपयश. कर्जबाजारी पणा. जरा बँकेत चार पैसे साठत आहे असे वाटत होते, तर गेले आजारपणात. व्यवसायात अपयश. मुलगा व्यवस्थित शिकत नाही. वाढती व्यसनाधीनता. व्यवहारात फसवले जाणे. आयुष्य म्हणजे समस्या समस्या आणि समस्या. घरात सतत कटकटी. तरुण मुलाशी पटत नाही. काय सांगावे आणि किती सांगावे. 
आपल्या ऋषीमुनींनी मानवजातीवर किती प्रचंड उपकार करून ठेवले आहेत. ज्योतिष शास्त्राच्या रूपाने. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला ज्योतिष शास्त्रात अचूक आणि उपकारक अशी सापडतात. आपल्या पूर्वजन्माच्या आणि ह्या जन्माच्या कर्मामुळे, संचित कर्म, प्रारब्ध ह्यामुळे आपल्याला अनेक सुख दुखाचा सामना करावा लागतो. पण पापाला प्रायश्चित्त असते तसे जिथे समस्या आहे तिथे उपाय हा असतोच. 
जन्म लग्न कुंडली, नवमांश कुंडली, भाव चलित कुंडली, चालू महादशा आणि अंतर्दशा इ कुंडलीतील विविध घटकांचा सखोल अभ्यास करुन तज्ञ ज्योतिषी आपल्या समस्येच निराकरण करण्यासाठी काही खात्रीचे उपाय सुचवू शकतात. त्यांचा निश्चितच चांगल उपयोग होऊ शकतो. कुंडलीतील १२ स्थानातील ग्रहांचे अस्तित्व. ग्रहांची भावगत, नक्षत्रगत, राशिगत अवस्था, विविध योग, बलाबल इ गोष्टींमुळे आपल्या समस्या व त्यांची परिणामकारता यात व्यक्ती सापेक्ष फरक पडतो. शास्त्रात शुभ अशुभ असे ग्रह आहेत. ग्रह शत्रू राशीत असला कि त्याच्या फालत न्यूनता येते. उदा. शनी सिंह राशीत म्हणजे रवीच्या राशीत असल्यास त्यासंबंधी समस्या निर्माण होते. ग्रह काही राशीत नीच म्हणजे निर्बली असतात तर काही राशीत उच्च म्हणजेच बलवान असतात. ग्रह नीचेचा असेल तर तो ज्या भावात आहे त्याच्या कारक फालत समस्येला कारणीभूत होतो. उदा. पंचम स्थान हे संततीचे स्थान आहे. ह्या पंचमात म्हणजे पंचम स्थानात राहू असेल जो एक नंबरचा पाप ग्रह आहे तर संतती संबंधी फलात खूप त्रासदायक प्रकार घडतात. उदा. संतती न होणे, झाली तर दुर्धर आजार असणे, वेडसर असणे, परागंदा होणे, अल्पायु निपजणे इ. अशावेळी तज्ञ ज्योतिषी राहू संबंधी ग्रह शांतीचे उपाय सुचवतात ज्यामुळे समस्या काही प्रमाणात सुसह्य होय शकते. पंचमेश शनी दृष्ट असता, किंवा पाप कर्तरी योगात असता पंचमेश ग्रहाची शांती केल्याने जातकास आराम मिळू शकतो. जिथे ग्रहाचे रत्न वापरणे शक्य नसते तिथे त्या ग्रहाचे जंतर रत्न वापरावे व ग्रह शांती साठी काही उपाय करावेत. जे ग्रह जन्मलग्न कुंडलीत अशुभ स्थानी पडलेले असतात किंवा अशुभ युतीत, निर्बल राशीत असतात ते जातकास जीवनात खूप त्रासदायक ठरतात. अशा ग्रहांची शांती करणे आवश्यक असते. अशी बरीच उदाराहरण देता येतील पण विस्तार भयास्तव सध्या इथे देत नाही. पण पुढे आपण ग्रह शांतीचे सुलभ उपाय पाहूया. 

जन्म लग्न कुंडलीत रवी आणि केतू जर पंचम, सप्तम किंवा अष्टमात असतील, मंगळ किंवा राहू धन, अष्टम किंवा भाग्य स्थानात असतील, चंद्र षष्ठ किंवा अष्टम स्थानात असेल, गुरु कन्या किंवा मकर राशीत असेल, शनी तूळ, मकर, कुंभ, धनु, मीन राशी व्यतिरिक्त इतर राशीत असेल, शुक्र ३,६,८,१२ स्थानात असेल तर ग्रहशांती करणे इष्ट ठरते. 

उपाय हे सलग ४० दिवस करायचे आहेत. उपायात खंड पडू नये म्हणून दुधात भिजवलेले तांदूळ (अगदी थोडेसे) जवळ ठेवावेत. एखादा शुभ दिवस पाहून उपाय सुरु करावेत. 

ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांनी लग्नाचे अगोदर हे उपाय करावेत.

मंगळ :
१) दुधात धुतलेले जव वाहत्या प्रवाहात मुठभर फेकावेत. 
२) २-३ रेवड्या वाहत्या प्रहावत फेकाव्यात.
३) थोडा गुळ वाहत्या पाण्यात फेकावा. 
४) दिवसा पाण्यात खलुन केशर बेंबी जवळील भागास लावावे.
५) विवाहाचे अगोदर दोन लाल पोवळी घेऊन एक वाहत्या प्रवाहात फेकून दुसरे जवळ ठेवणे (हा उपाय एक वेळच करावा )

गुरु:

१) विवाहाचे अगोदर मुलीने दोन सारख्या वजनाची हळकुंडे एक वाहत्या पाण्यात फेकावे आणि दुसरे कायमचे जवळ ठेवावे. हळकुंड ऐवजी केशरहि वापरता येईल.
२) ४० दिवस रोज दिवसा केशराचे ३-४ तुकडे जिभेवर ठेऊन खावेत. 

चंद्र:

१) रात्री उशाला थोडे पाणी भांड्यात ठेऊन सकाळी ते बाभळीच्या झाडास घालणे. 
२) दोन मोती किंवा दोन पुड्या तांदूळ घेऊन एक वाहत्या पाण्यात फेकावे व दुसरे जवळ ठेवावे. 

रवी

१) थोडा गुळ वाहत्या पाण्यात फेकावा.

राहू

थोडे कोळसे रोज वाहत्या पाण्यात फेकावेत.

केतू :

कावळ्यांना पिवळ्या गाठ्या रोज नियमित खाऊ घालाव्यात.

शनी:

कावळ्यांना नियमित ताजे अन्न द्यावे.

बुध

रंगीत कुत्र्यास ताजे अन्न खावयास घालावे. 

वरील उपाय करताना त्या त्या ग्रहाचा पौराणिक मंत्र९ वेळा म्हणावा .

पुढच्या लेखात ग्रहांची रत्ने आणि जंतर यंत्रे ह्याविषयी सविस्तर लिहीन. तूर्तास ... श्री स्वामी समर्थ.


शुभम भवतु