Tuesday, April 10, 2018

ज्योतिष: जाणून घेऊया कुठल्या योगावर झालाय आपला जन्म. काय आहेत त्याचे परिणाम.

आपल्या भारतीय ज्योतिष शास्त्रात पंचांगाला अनन्य साधारण महत्व आहे. पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग. बाळाचा जन्म झाला कि ज्योतिषी जन्म टिपण घेतात. त्यात ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठला वार, कुठली तिथी, नक्षत्र, कुठल्या योगावर जन्म झालाय. आयुष्यातल्या बराचशा घडामोडी, स्वभाव इ गोष्टींचा घनिष्ट संबंध ह्या पंचांगातील घटकांशी आहे. काही योग हे शुभ तर काही अशुभ असतात. चला तर आपण पाहूया विवध योग आणि त्यांची सविस्तर माहिती. 

१) विश्कुम्भ योग: एक प्रकारचा अशुभ योग जरी असला तरी या योगावर जन्मलेल्या व्यक्ती तशा नशीबवान असतात. गुणी असतात. आरस्पानी सौंदर्य आणि तल्लख बुद्धिमत्तेची देणगी त्यांना जन्मजात लाभलेली असते. सहसा त्यांना आर्थिक तोशीस कधी पडत नाही. जरुरी पुरता पैसा राखून असतात. कुटुंबाला, मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना बरोबर घेऊन चालणे त्यांना आवडते. मित्र मैत्रिणींचा गोतावळा जमवून गप्पांचा फड रंगवायला खूप आवडत. चांगले कौटुंबिक जीवन लाभते. म्हणतात न ब्युटी विथ ब्रेन असा काहीसा पडताळा आपणास येतो जेव्हा आपण या योगावर जन्मलेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात असतो. दुसर्यांना प्रेमाने आणि सन्मानाने वागवण्याकडे यांचा कल असतो.जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले मग अजून काय पाहिजे?

२) प्रीती योग: नावातच सर्व काही आले. सौंदर्याचे उपासक असतात. जीवनात जे काही सुंदर आहे त्याकडे यांचा स्वभावतः कल असतो. खिलाडू वृत्ती उपजतच असते. विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे सहज आकृष्ट होतात. दुसर्यांना आकर्षून घेण्याची कला यांना चांगली अवगत असते. जे हवे ते मिळवण्याकडे बरीचशी उर्जा खर्च होते. बर्याचदा संधीचे रुपांतर यशात करण्यात यांचा हातखंडा असतो. संभाषण कला यांना अवगत असते. उत्साहाचा झरा आपल्याला इथे सापडतो. चांदणे शिंपित जाशी चालता तो चंचले म्हटले तर वावगे ठरणार नाही. ओठात आहे प्रेम अन हृदयात आहे प्रीत हि अशी अवस्था असते. जिओ!

३) आयुष्यमान योग: धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना ... आयुष्य म्हणजे एक कविता असते. सर्वार्थाने कृतार्थ आणि दीर्घ आयुष्य यांना लाभते. तुलनेने अधिक सुखी आयुष्य जगतात. आशावादी असतात. दु:खात हि सुख शोधण्याची वृत्ती यांच्या ठाई असते. सुधृढ शरीरयष्टी यांना लाभलेली असते. प्रसंगी कठोरहो होतात. कोणी वाट्याला आलाच तर त्याची धडगत नाही. आर्थिक परिस्थिती चांगली असते. शिस्तशीर आयुष्य जगण्याकडे कल असतो. चांगलं चुंगलं खायला खूप आवडतं. घेतलेलं काम तडीस नेतात. 

४) सौभाग्य योग: वाग्यज्ञ सतत चालू असतो. सामान्य बोलण्यातही विशिष्ट लकब, अविर्भाव असतो. बोलताना शब्दयोजना चांगली असते. सुगंध आवडतो. छान सुवासिक फुलं, अत्तर इ गोष्टींची उपजतच आवड असते. चांगल्या मार्गाने आणि मेहनतीने यश, प्रतिष्ठा, संपत्ती मिळवतात. काही वैशिष्ट्यपूर्ण कला असण्याची शक्यता असते. विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे सहज आकर्षित होतात. जनमानस यांच्यावर खुश असते. आपल्या अंगभूत गुणांनी किंवा कला आविष्काराने इतरांची वाहवा मिळवतात. एकूणच नशीबवान, भाग्यवान असतात. 

५) शोभन योग: सौंदर्याची खाण आणि आकर्षक व्यक्तिमत्व. हुशार, बुद्धिमान, प्रामाणिक, नैतिकतेला धरून असणारे वर्तन. एखादे काम घेतले कि पूर्ण करणारच. सरळ आणि निर्मल मनाचे लोक. उदात्त विचारसरणी असते. खोटारडेपणा आवडत नाही. मुलांची आवड असते. कुटुंबात रमतात. उत्तम संतती सौख्य लाभते. चिंताच नाही!!

६) अतिगंड योग:एक बर्यापैकी अशुभ योग असून जातकाच्या आईसाठी चांगला नाही. यांच्या एकंदर अनाकलनीय, अनैतिक कर्तुत्वामुळे यांच्या कुटुंबास अनेक प्रकारच्या त्रासातून जावे लागते. अनिर्बंध कामवासना असू शकते. ह्या योगाची शांती करावी हे सांगणे आलेच. सांभाळा!

७) सुकर्मा योग: हाती घेतलेले काम तडीस नेण्याची क्षमता असलेले जातक सुकर्मा योगावर जन्म झालेले असतात. ठराविक काम करण्यासाठी आवश्यक सर्व गुण त्यांच्याजवळ असतात.उद्योग व्यवसाय करण्याकडे स्वाभाविकओढाअसतो.सुस्वभावी व्यक्तिमत्वअसते. धार्मिक वृत्ती असते. त्यांच्या सत्शील स्वभावामुळे लोक त्यांचा आदर करतात. परोपकार करणे. दुसर्यांना मदत करणे आदि सद्गुण उपजतच असतात.

८) धृती योग: एक प्रकारचा सौम्य अशुभ योग असला तरी या योगावर जन्मलेल्या लोकांचा कल शांत जीवन जगण्याकडे असतो. आपल्या चुकांसाठी दुसर्याला जबाबदार धरण्याची वृत्ती काही प्रमाणात आढळते. विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे सहज आकृष्ट होतात. आपले सर्व निर्णय शांत पणे घेतात. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून मगच योग्य तो निर्णय घेतात. सर्व साधारण निरोगी आयुष्य व्यतीत करतात.

९) शूल योग: सतत अंग दुखी हि एक प्रमुख तक्रार आढळून येते. प्रामाणिक असतात. सत्कर्म करतात. परोपकारी असतात. धार्मिक वृत्ती असते. लेखन कला अवगत असल्यास धार्मिक, अध्यात्मिक प्रकारच लेखन करतात. ऐहिक गोष्टींचाहि तितकाच ओढा असतो. चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवतात. कुठलीही गोष्ट मिळवताना खूप संघर्ष करा लागतो. एक प्रकारचा अशुभ योग असल्याने एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे अशी जीवनभर प्रचीती येते.

१०) गंड योग: अखंड बोलणे हा आपला स्वभाव असतो. दुसर्याच्या मनासारखे बोलून त्याचे मन जिंकणे चांगले जमते. चांगले निगोशिएशन स्किल्स असतात. मधला मार्ग काढून गोष्टी सेटल करण्याकडे कल असतो. अतंस्थ वृत्तींशी एक प्रकारचा स्वतःशीच झगडा सुरु असतो. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे .. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. स्वतःच्या आरोग्याविषयी खूप काळजी घ्यावी लागते. सुधृढ शरीरयष्टी असते. चैनीच्या गोष्टींकडे ओढा असतो. हा एक अशुभ योग असतो.

११) वृद्धी योग: हुशार असतात.विचारांची दिशा  स्पष्ट असते. स्प्राईट च्या जाहिरातीत नाही का म्हटले असते क्लीअर है ! तसं. पटकन मुद्द्यावर येण, खरेपणा, प्रामाणिकपणा हे गुण असतात. आकर्षक व्यक्तिमत्व असते. जीवनात आशावादी असतात. समृद्ध आयुष्य जगतात. सुबत्ता असते. माणसांची उत्तम पारख असते. सद्गुणी आणि सरळ लोकांमध्ये वावर असतो. क्लीअर है !

१२) ध्रुव योग: दुर्दैवाने समाज विरोधी काम करण्यासारखी यांच्या बाबतीत परिस्थिती निर्माण होते. हुशार असतात पण आपल्या अक्कल हुशारीचा उपयोग स्वतःच्या, समाजाच्या उन्नती साठी न करता काहीतरी चुकीचे, बेकायदेशीर करण्यासाठीच करतात. आपल्या वागण्या बोलण्यामुळे अनेक शत्रू निर्माण होतात. मुद्देसूद बोलणे जरी असले तरी त्यामुळे नुकसानच जास्त होते. स्वभाव शांत असतो. परिश्रम पूर्वक पूर्ण क्षमतेने काम पूर्ण करण्याची हातोटी असते. कुंडलीत शुभ ग्रह असतील तर मात्र यांच्या समजूतदार स्वभावामुळे लोकांचे प्रेम यांना लाभते. सव साधारण दीर्घ आयुष्य जगतात.

१३) व्याघात योग: आपल्या स्वभावामुळे लोक आपल्याला मूर्ख बनवतात. काही प्रमाणात अप्रामाणिक असतात. स्वच्छता अभावानेच आढळते. काहीसे खुनशी असतात. दुसर्याविषयी सूड भावना मनात खूप काळ तग धरते. घेतलेले काम तडीस नेतात. एकाच वेळी अनेक काम हातावेगळी करण्याचे कसब आत्मसात करतात. काही वेळा एखाद्या विशिष्ट कामात वाकबगार असतात. काही वैशिष्ट्यपूर्ण अंगभूत गुणांमुळे यांना आयुष्यात प्रसिद्धी आणि यश मिळते.

१४) हर्षन योग : काहीसा कुटील स्वभाव असतो. विश्वासू नसतात. पण नशीबवान असतात. काही ठराविक विषयात कमालीचे निष्णात असतात. एकावेळी अनेक काम करण्यात तरबेज असतात.

१५) वज्र योग: एक अशुभ योग असतो. अशुभ ग्रह योग असेल तरअसे जातक खल प्रवृत्तीचे असतात. शिवराळ भाषा असते. अंगापिंडाने मजबूत. शस्त्र हाताळण्यात निष्णात. अंगमेहनतीची कामे लीलया पार पडतात. धाडसी असतात. कंजूष स्वभाव असतो.

Thursday, April 5, 2018

बालारीष्ट योग - माहिती आणि निवारण.


देवाला सगळीकडेच जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आणि ह्या आईला मग ती कशीही असो सुविद्य अथवा अशीशिक्षित, तिला आपल्या लेकराची काळजी हि तिन्ही त्रिकाळ असतेच. अगदी तिचा बाळ तरुण झाला, विवाहित झाला, प्रौढ झाला तरी देखील ह्या माउलीला त्याच्या प्रेमापोटी त्याची काळजी असतेच. अशा अनेक माउली माझ्या माहितीत आहेत ज्या आपल्या मुलासाठी / मुलीसाठी उपास तापास , व्रत  वैकल्य, अंगारे - धुपारे काही बाही आपल्या बुद्धी नुसार करत आल्या आहेत. अशातच एखाद्या जाणत्या ज्योतिषाने सांगितले कि तुझ्या मुलाच्या पत्रिकेत बालारीष्ट योग आहे त्यामुळे त्याच्या जीवास धोका आहे वगैरे तर त्या आईचे काय होईल? तिला अन्न तरी गोड लागेल काय? काय उपाय करावा तिने?
साधारण ५०% पत्रिकांमध्ये असा योग आढळून येतो. त्याचा अर्थ असा मुळीच नाही कि ह्या योगामुळे त्या जातकाचा मृत्यू होईल. प्रथम बालारीष्ट योग म्हणजे मृत्यू हा विचार डोक्यातून पूर्ण पणे काढून टाका.बालारीष्ट हा संस्कृत शब्द बाल + अरिष्ट ह्या दोन शब्दांपासून बनला आहे. दुसरे असे कि अरिष्ट म्हणजे संकट. मग आता सांगा बालारीष्ट ह्या शब्दाचा आणि मृत्यूचा काय संबंध? संकट तर प्रत्येकावर येतच असतात. जगात असा कोण आहे ज्याच्यावर कधीच कुठले संकट आले नाही? पण एक मात्र म्हणता येईल कि संकट आले कि त्या संकटाला तोंड देण्याची आपली काहीच तयारी नसेल, मनाने आपण खंबीर नाही तर कमकुवत असू तर आपली काही खैर नाही. संकटांना घाबरून जाणारे असू तर संकटाची तीव्रता तर वाढतेच पण प्रसंगी आपले भरून न येणारे नुकसान होते. संकटे जेव्हा आपण लहान असताना येतात तेव्हा परमेश्वर आपले रक्षण करतो कसे तर आपले पालक आपल्या साठी आपल्यामागे उभे असतात. पण अस देखील होते कि काही मुलांच्या पाठीशी काही कारणाने त्यांचे पालक नसतात. मग अशांचे काय होत असेल? तिथेही परमेश्वर कोणाना कोणाच्या रूपाने पाठीशी उभा राहतोच.बालपणी काही गंभीर आजार होणार असतील, अपघात होणार असेल तर त्याचे फलादेश बालारीष्ट योगावरून देता येतात. त्यामुळे आपण वेळीच सावध होऊ शकतो. ज्योतिष शास्त्र आपल्या अशाप्रकारे कामास येते. बालारीष्ट योग म्हणजे जन्म लग्न कुंडलीत काही ठराविक ग्रहांचे एकमेकाशी काही स्थानातून झालेले कुयोग. बालारीष्ट योगाचे परिणाम हे तसे काळजी करण्यासारखेच असतात. जातकाच्या लग्न कुंडलीत क्षीण चंद्र आणि लग्न स्थान तसेच लग्नेश, अष्टम स्थान आणि अष्टमेश हे विचारात घ्यावे लागतात. जन्म लग्न कुंडलीत चंद्र हा ६, ८ व १२ स्थानी असून त्याचे रवी, मंगळ, शनी, राहू आणि केतू ह्या सारख्या पाप ग्रहांशी कुयोग होत असता बलारीष्ट योग होतो. त्याचबरोबर मंगळ हा प्रथम किंवा अष्टम स्थानात असून शनी व रवी बरोबर कुयोगात असता बालारीष्ट योग होतो. दशमात शनी, षष्ठात चंद्र आणि सप्तमात मंगळ असेल तर बालारीष्ट योग होतो.रवी आणि चंद्र ह्यांचा कर्क किंवा सिंह राशीत राहुशी संबंधित असता प्रथम स्थानाशी मंगळाचा किंवा शनीचा संबंध आला असताना सुद्धा बालारीष्ट योग होतो. प्रथमात शनी, तृतीयात गुरु आणि अष्टमात चंद्र असेल तरी जपावे. अशुभ क्रूर ग्रह जर लग्नात किंवा अष्टमात, षष्ठात असता लग्न किंवा लग्नेश अशुभ ग्रहाच्या कुयोगात असेल तर धोक्याचे असते.व्ययात किंवा नवमात रवी असता अष्टमात मंगळ असेल तर सांभाळावे. अशावेळी सावध राहायचे म्हणजे काय करायचे तर कुठलाही आजार झाला असेल तर तो अंगावर काढू नये. त्वरित योग्य ते औषधोपचार सुरु करावेत. अनोळखी ठिकाणी पोहावयास जाऊ नये, अनोळखी ठिकाणी काही खाऊ नये, अनावश्यक धाडस करू नये. आपल्या मोठ्यांचे ऐकावे. वाहन जपून चालवावे. रस्त्यावर जपून चालावे. काळजी घ्यावी. काळजी करू नये.
एखाद्या मुला मुलीच्या पत्रिकेत बलारीष्ट योग असेल तर त्याच्या आईने श्री टेंबे स्वामी रचित बालाशिष स्तोत्राचे रोज पाठ करावेत. अत्यंत प्रभावी असे हे बालाशिष स्तोत्र असून. श्री दत्त प्रभू नकीच त्या बालकाचे रक्षण करतात. हे स्वयं सिद्ध असे स्तोत्र असून चौथे दत्तावतार प.पु.प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी रचून समस्त मानवजातीवर अनंत उपकार केले आहेत. शिवाय अखंड श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण केल्यावर आणि नामात असल्यावर विषयच खुंटला. जेथे चाले स्वामिनाम तेथे कली काळाचे हो काय काम? तेव्हा काळजी करू नका काळजी घ्या. 

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


#_balarishta_Yoga, #_Balarishta, #_lagna, #_Ashtam, #_Short_Life, #_Longevity