Thursday, April 5, 2018

बालारीष्ट योग - माहिती आणि निवारण.


देवाला सगळीकडेच जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आणि ह्या आईला मग ती कशीही असो सुविद्य अथवा अशीशिक्षित, तिला आपल्या लेकराची काळजी हि तिन्ही त्रिकाळ असतेच. अगदी तिचा बाळ तरुण झाला, विवाहित झाला, प्रौढ झाला तरी देखील ह्या माउलीला त्याच्या प्रेमापोटी त्याची काळजी असतेच. अशा अनेक माउली माझ्या माहितीत आहेत ज्या आपल्या मुलासाठी / मुलीसाठी उपास तापास , व्रत  वैकल्य, अंगारे - धुपारे काही बाही आपल्या बुद्धी नुसार करत आल्या आहेत. अशातच एखाद्या जाणत्या ज्योतिषाने सांगितले कि तुझ्या मुलाच्या पत्रिकेत बालारीष्ट योग आहे त्यामुळे त्याच्या जीवास धोका आहे वगैरे तर त्या आईचे काय होईल? तिला अन्न तरी गोड लागेल काय? काय उपाय करावा तिने?
साधारण ५०% पत्रिकांमध्ये असा योग आढळून येतो. त्याचा अर्थ असा मुळीच नाही कि ह्या योगामुळे त्या जातकाचा मृत्यू होईल. प्रथम बालारीष्ट योग म्हणजे मृत्यू हा विचार डोक्यातून पूर्ण पणे काढून टाका.बालारीष्ट हा संस्कृत शब्द बाल + अरिष्ट ह्या दोन शब्दांपासून बनला आहे. दुसरे असे कि अरिष्ट म्हणजे संकट. मग आता सांगा बालारीष्ट ह्या शब्दाचा आणि मृत्यूचा काय संबंध? संकट तर प्रत्येकावर येतच असतात. जगात असा कोण आहे ज्याच्यावर कधीच कुठले संकट आले नाही? पण एक मात्र म्हणता येईल कि संकट आले कि त्या संकटाला तोंड देण्याची आपली काहीच तयारी नसेल, मनाने आपण खंबीर नाही तर कमकुवत असू तर आपली काही खैर नाही. संकटांना घाबरून जाणारे असू तर संकटाची तीव्रता तर वाढतेच पण प्रसंगी आपले भरून न येणारे नुकसान होते. संकटे जेव्हा आपण लहान असताना येतात तेव्हा परमेश्वर आपले रक्षण करतो कसे तर आपले पालक आपल्या साठी आपल्यामागे उभे असतात. पण अस देखील होते कि काही मुलांच्या पाठीशी काही कारणाने त्यांचे पालक नसतात. मग अशांचे काय होत असेल? तिथेही परमेश्वर कोणाना कोणाच्या रूपाने पाठीशी उभा राहतोच.बालपणी काही गंभीर आजार होणार असतील, अपघात होणार असेल तर त्याचे फलादेश बालारीष्ट योगावरून देता येतात. त्यामुळे आपण वेळीच सावध होऊ शकतो. ज्योतिष शास्त्र आपल्या अशाप्रकारे कामास येते. बालारीष्ट योग म्हणजे जन्म लग्न कुंडलीत काही ठराविक ग्रहांचे एकमेकाशी काही स्थानातून झालेले कुयोग. बालारीष्ट योगाचे परिणाम हे तसे काळजी करण्यासारखेच असतात. जातकाच्या लग्न कुंडलीत क्षीण चंद्र आणि लग्न स्थान तसेच लग्नेश, अष्टम स्थान आणि अष्टमेश हे विचारात घ्यावे लागतात. जन्म लग्न कुंडलीत चंद्र हा ६, ८ व १२ स्थानी असून त्याचे रवी, मंगळ, शनी, राहू आणि केतू ह्या सारख्या पाप ग्रहांशी कुयोग होत असता बलारीष्ट योग होतो. त्याचबरोबर मंगळ हा प्रथम किंवा अष्टम स्थानात असून शनी व रवी बरोबर कुयोगात असता बालारीष्ट योग होतो. दशमात शनी, षष्ठात चंद्र आणि सप्तमात मंगळ असेल तर बालारीष्ट योग होतो.रवी आणि चंद्र ह्यांचा कर्क किंवा सिंह राशीत राहुशी संबंधित असता प्रथम स्थानाशी मंगळाचा किंवा शनीचा संबंध आला असताना सुद्धा बालारीष्ट योग होतो. प्रथमात शनी, तृतीयात गुरु आणि अष्टमात चंद्र असेल तरी जपावे. अशुभ क्रूर ग्रह जर लग्नात किंवा अष्टमात, षष्ठात असता लग्न किंवा लग्नेश अशुभ ग्रहाच्या कुयोगात असेल तर धोक्याचे असते.व्ययात किंवा नवमात रवी असता अष्टमात मंगळ असेल तर सांभाळावे. अशावेळी सावध राहायचे म्हणजे काय करायचे तर कुठलाही आजार झाला असेल तर तो अंगावर काढू नये. त्वरित योग्य ते औषधोपचार सुरु करावेत. अनोळखी ठिकाणी पोहावयास जाऊ नये, अनोळखी ठिकाणी काही खाऊ नये, अनावश्यक धाडस करू नये. आपल्या मोठ्यांचे ऐकावे. वाहन जपून चालवावे. रस्त्यावर जपून चालावे. काळजी घ्यावी. काळजी करू नये.
एखाद्या मुला मुलीच्या पत्रिकेत बलारीष्ट योग असेल तर त्याच्या आईने श्री टेंबे स्वामी रचित बालाशिष स्तोत्राचे रोज पाठ करावेत. अत्यंत प्रभावी असे हे बालाशिष स्तोत्र असून. श्री दत्त प्रभू नकीच त्या बालकाचे रक्षण करतात. हे स्वयं सिद्ध असे स्तोत्र असून चौथे दत्तावतार प.पु.प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी रचून समस्त मानवजातीवर अनंत उपकार केले आहेत. शिवाय अखंड श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण केल्यावर आणि नामात असल्यावर विषयच खुंटला. जेथे चाले स्वामिनाम तेथे कली काळाचे हो काय काम? तेव्हा काळजी करू नका काळजी घ्या. 

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


#_balarishta_Yoga, #_Balarishta, #_lagna, #_Ashtam, #_Short_Life, #_Longevity

No comments:

Post a Comment