Wednesday, February 27, 2019

ज्योतिष: काही ग्रहयोग.



१) अध्यात्म

जन्म लग्न कुंडलीत अष्टम स्थान गुरु व दशमेशाशी संबंधित असेल तर तर अशी व्यक्ती अध्यामात यशस्वी मार्गदर्शक होते.

व्ययेश आणि पंचमेश युती शुभ संबंधित असलयास व्यक्ती अध्यात्मिक वृत्तीची असते.

गुरु शनी युती ५, ९, १२ व्या स्थानात अध्यात्मिक प्रगतीस पोषक असते.

गुरु राहू , गुरु केतू युती अध्यात्मिक उन्नती च्या दृष्टीने चांगली परंतु संतती सुखाच्या दृष्टीने अनिष्ट. कीर्ती, आर्थिक उन्नती, शास्त्राभ्यास इ साठी चांगली.

नवम स्थानी गुरु - अध्यात्मात प्रगतीकारक.

शुक्र व गुरु ह्यांचा अंशात्मक प्रतियोग - अध्यात्मात प्रगतीकारक

२) शनी - मंगळ युती

शनी मंगळ युती हा एक अशुभ ग्रहयोग होतो. लग्न स्थानात शनी मंगल युती असता जातक अल्पायु असतो. गंभीर आजार होतात. धनस्थानी असता कर्ज राहते. तृतीय स्थानात भावंडांना त्रासदायक. चतुर्थ स्थानात मातृसुखात, गृहसौख्यात व वाहन्सौख्यात न्यूनता असते. पंचमात असता संतती सुखात उणीव राहते. षष्ठ स्थानात शत्रुनाश संभवतो पण स्वतःच्या जीवास धोका असतो. सप्तमात असता वैवाहिक जीवन संघर्षमय असते. पत्नीशी पटत नाही. अष्टमात असता आर्थिक अडचणी आणि संकटे येतात. नवम स्थानात असता भाग्योदयात अडचणी येतात. अपकीर्ती होते. दशम स्थानात शनी मंगल युती असेल तर धंद्यात सतत नुकसान, मानहानी आणि पितृसुखात कमतरता राहते. एकादश स्थानात असता सर्व प्रकारच्या लाभापासून जातक वंचित राहतो. मित्र शत्रू होतात. व्ययस्थानात शनी मंगळ युती दारिद्र्य दर्शवते.

३) नोकरी / निलंबन / धंद्यात नुकसान

अष्टमात दशमेश आणि षष्ठेश युती असेल तर दशमेशाच्या / शश्ठेषाच्या  दशेत नोकरी जाणे, निलंबन, जबर आर्थिक नुकसान, धंद्यात नुकसान इ. घटना घडतात.

चंद्र राहू युती जन्म लग्न कुंडलीत कुठेही असेल तर व्यवसाय करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यातून २,४,५,७,८ स्थानी फारच अशुभ असते.

नवमात/ दशमात मिथुनेचा किंवा कन्येचा राहू असेल तर जातक उच्च पदास पोहोचतो.

४) आर्थिक घोटाळे 

धन स्थानी धनेश व अष्टमेश युती असेल तर सर्व प्रकारचे आर्थिक घोटाळे होतात.

५) कष्टमय जीवन

तृतीय स्थानात ( पराक्रमात ) शनी असेल तर, खूप प्रयत्नानंतर यश मिळते.

६) कीर्ती / प्रसिद्धी 

नवमातील चंद्र गुरु माणसाची कीर्ती मरणानंतरही मागे ठेवतो. 


७) आर्थिक प्रगती

लाभ स्थानाचा स्वामी धन स्थानी धनेशाच्या युतीत असल्यास खूप आर्थिक प्रगती होते.

शनी मंगळ युती लग्नाच्या किंवा रवीच्या व्ययात असता कर्जबाजारी राहावे लागते.

चंद्र गुरु युती जीवनभर अआर्थिक सुस्थिती ठेवते.

८) राजकारण 

रवी भाग्येशाबरोबर केंद्र स्थानी अथवा कोण स्थानी शुभ ग्रह दृष्टीत अथवा शुभ राशीत असेल तर अशी व्यक्ती राजकारणात यशस्वी होते.

शुक्र रवीच्या पुढे शुभ स्तिथीत असेल तर राजकीय अधिकार लाभतो.

९) श्रीमंती / आर्थिक परिस्थिती 

व्ययेश व्ययात अष्टमेश वा शाश्ठेषा सह शुभादृष्ट असेल तर अशी व्यक्ती वाहनसुख, ऐषारामी, भरभराटीचे जीवन जगते.

धनाधिपती शुभ ग्रह असून अष्टमात असेल तर पैशाची कमतरता पडत नाही.

मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक लग्नाला चंद्र मंगळ युती हा लक्ष्मी योग आहे.

तृतीय आणि दासःम स्थानी मंगळ असेल तर जातक केव्हाही उपाशी राहणार नाही. काही न काही करून पैसा मिळवतोच.

शनी हर्शल धनात  - जबरदस्त आर्थिक फटका.

शनी मंगळ धनात - दारिद्र्य योग.

चंद्र केंद्रात शुभ स्थितीत असता आर्थिक स्थिती चांगली राहते.

धनेश व्ययेश परिवर्तन योग - धन नाश होतो.

१०) पितृसुख

जन्म कुंडलीत कुठल्याही स्थानात रवी - शनी युती असल्यास पितृसुखात कमतरता असते. कष्टमय जीवन असते.

शनी नवमात असता पितृसुख कमी असते.



११) संतती सौख्य / पिडा / निपुत्रिक योग

पुरुषांचे कुंडलीत गुरु हर्शल अंशात्मक युती असता संतती पासून दुख होते. स्त्रियांचे कुंडलीत निपुत्रिक योग होतो.

पंचमात व भाग्यात शनी, मंगल, रवी, हर्शल, नेपच्यून नसतील व त्यांच्या राशी व दृष्टी हि नसतील तर उत्तम संती सुख लाभतेच.

गुरु राहू , गुरु केतू युती अग्नी राशीत अथवा अशुभ राशीत असता वंध्या योग होतो.

स्त्रियांच्या कुंडलीत वक्री गुरु वंध्या योग दर्शवतो.

अध्यात्मिक योग, अधिकार योग व संकात्कारक असते.

बुध शनी युती संतती सुखाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरते.

वक्री गुरु कन्या संतती देतो. पुत्र संतती बाबत चिंता निर्माण करतो.

पाप ग्रहाच्या कार्तरीतील गुरु संतती चिंता निर्माण करतो.

गुरु पंचमात असून त्याच्या पंचमात पाप ग्रह असल्यास संतती होण्याची शक्यता खूप कमी असते.

गुरूच्या पंचमात शनी असल्यास अल्प संतती अथवा संततीत बरेच अंतर असते.

शनी रवी अष्टमात असणारी स्त्री वंध्या असण्याची शक्यता असते.

शनी मंगळ  नवमात किंवा दशमात असणारी स्त्री वंध्या असण्याची शक्यता असते.

शनी पंचाम्स्थानी असता संतती सुख मिळत नाही.

शनी मकर व शुक्र तुला रहित असेल तर संतती प्रतीबंधक योग होतो.



१२) वैवाहिक सौख्य / समस्या

रवी - शनी अशुभ योग असल्यास सर्वच बाबतीत अपयश येते. विवाहास विलंब होतो. पती - पत्नी विजोड म्हणजे व्यक्तिमत्व आणि स्वभावाने भिन्न असतात. पतीस आर्थिक उन्नतीस अडथळे येऊन शारीरिक त्रास होतो.

रवी हर्शल अश्भ योग संसारी जीवनात संकटे आणतो.

चंद्राच्या सप्तमात हर्शल असता वैवाहिक जोडीदार अत्यंत लहरी व विक्षिप्त असतो.

स्त्री जातकाच्या कुंडलीत रवी - चंद्र शुभ योग असल्यास अत्यंत सु स्वभावी पती असतो. पुरुष जातकाच्या कुंडलीत अशा बाबतीत दैवाची साथ लाभते.

स्त्री जातकाच्या कुंडलीत सप्तमात स्त्री राशीचा गुरु असेल तर पती प्रेमळ व सन्मानाने वागवणारा असतो.

पुरुषाचे कुंडलीत कन्या, वृश्चिक आणि मकर राशीचा गुरु विधुर योग दर्शवतो.

अष्टमस्त गुरु श्रीमंत मुलीशी विवाह घडवतो.

स्त्रियांच्या कुंडलीत दशमात असलेला गुरु विवाहोत्तर पतीस उन्नती कारक असतो.

गुरु शुक्र अंशात्मक अशुभयोग असल्यास जोडीदाराची निवड चुकते.

सप्तमात शनी राहू , शनी केतू, शनी बुध, - विवाहाची शक्यता नसते.

सप्तमात शनी नेपच्यून युती - काम सुखात न्यूनता.

शुक्र राहू युती  - आंतरजातीय / अंतर धर्मीय विवाह. अनारोग्य, संसारिक अशांतता. विवाह बाह्य संबंध.

चंद्र शुक्र युती क्रूर नक्षत्रात असल्यास वैवाहिक सुख लाभत नाही.

रवी मंगळ युती वैवाहिक सुखात कमतरता आणतात.

चंद्र शनी युती - स्त्री जातीपासून सुख कमी मिळते.

सप्तमेश लाभेश शुभ संबंध - पत्नी मिळवती असते. पत्नीकडून आर्थिक लाभ होतो.

सप्तमेश लग्नात, धनात अथवा नवमात असता विवाहानंतर भाग्योदय होतो.

सप्तमात शुक्र , चंद्र अथवा दोन्ही ग्रह असता विवाह लवकर होतो.

चंद्र व शुक्र दोन्ही जलराशीत असतील तर विवाह लवकर होतो.

स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळाच्या व्ययात शनी, पतीसुखाची हानी करतो.

मुलीच्या पत्रिकेत पंचमातील मंगळ विवाहास उशीर करतो.

वृषभ लग्नास सप्तमात धनु राशीचा गुरु वैवाहिक जीवनात तीव्र असमाधान निर्माण करतो.

शुक्र व गुरु ह्यांचा अंशात्मक प्रतियोग असल्यास विवाह लवकर जमतो.

कृत्तिका नक्षत्रातील शुक्र घटस्फोट, विवाहपूर्व मातृत्व, विवाहबाह्य संबंध, वैवाहिक असमाधान दर्शवतो.

शनी अष्टमात असलेल्या व्यक्तीचा साथीदार नेहमी रोगग्रस्त राहतो.

मिथुनेतील शुक्रामुळे पुरुष स्त्रीच्या अधीन राहतो.

मुलीच्या पत्रिकेत शुक्र मंगळ १,२,४,७,१० असेल तर स्थळ चांगले विनाकष्ट मिळते.

लग्नाच्या सप्तमात पापग्रह, शुक्राच्या सप्तमात पापग्रह किंवा शुक्र पापग्रह युक्त, दृष्ट असल्यास जातकस पत्नीकडून कामसुख मिळत नाही.

शुक्राच्या प्रतियोगात शनी वक्री - स्त्री सुख लाभत नाही

शुक्र कन्या राशीत असता विवाहास विलंब होतो.

अष्टमात राहू / हर्शल असता अनेकवेळा लग्न मोडते.

मुलीच्या पत्रिकेत अष्टमात चंद्र, गुरु, शुक्र असता पती श्रीमंत मिळतो.

भाग्येश सप्तमात असेल तर गरीबाघरच्या मुलीलाही भाग्यवान पती मिळतो.

सप्तमेश लग्नी असता स्त्रिया पतीच्या लाडक्या असतात.


१३) आकस्मिक अशुभ घटना

शनी हर्शल युती ज्या भावात असेल त्यासंबंधी फलात आकस्मिक अशुभ घटना घडवते.

१४) पितृदोष

चंद्राच्या चतुर्थातील नेपच्यून वास्तू दोष व घराण्यातील परंपरागत पितृदोष दर्शवतो.

१५) स्वभाव

मंगल कन्या अथवा मिथुन राशीत असता अहंकारी स्वभाव असतो.

कर्क, वृश्चिक आणि मीन राशीतील मंगळ पंचमात असेल तर बेजबाबदार, आळशी, व्यसनी वृत्ती राहते. जातक मनाने चंचल असतो.

अष्टमातील शनी आयुष्यवर्धक असला तरी जातकाला धनलोभी बनवतो.

लाग्नाधीपती सहाव्या व आठव्या स्थानी असता व्यक्ती तापट स्वभावाची असते.

चतुर्थातील चंद्र असता जातक दयाळू असतो.

शनी चंद्र युती धनात - कठोर भाषा व अप्रमानिकपणा.

तृतीयात केतू : कलहप्रिय.

१६) मंगळ - राहू युती

४,५,७,१२ स्थानात - खूप अशुभ. १,३,६,१० स्थानात - साधारण अशुभ. बाकी स्थानात मिश्र फळे मिळतात.

तृतीय स्थान - बंधू भगिनींना घातक
चतुर्थ स्थान - गृह सौख्याचा नाश.
पंचम स्थान - संततीत वैगुण्य / अपंगत्व
षष्ठ स्थान - तीव्र स्वरूपाचा आजार.
सप्तम स्थान - बहु भार्या योग, विवाह पूर्व प्रेम संबंध.
अष्टम स्थान - अल्पायु, सतत आजारपण.
नवम स्थान - प्रत्येक कार्यात अपयश.
दशम स्थान - नोकरी व्यवसायात सतत संकटे.
व्ययस्थान - आर्थिक संकटे.

१७) रत्न शास्त्र

राहू, केतू व शनीची रत्ने तज्ञ ज्योतीर्विदाच्या सल्ल्याशिवाय वापरणे धोक्याचे असते. विशेषत: स्त्रियांनी काळजी घ्यावी.

१८) शत्रू पिडा / शत्रू नाश

षष्ठ स्थानी पाप ग्रह जसे केतू , राहू, शनी असल्यास शत्रू वर विजय मिळवतो परंतु दीर्घ आजारही होतात. कर्ज मुक्तीस सहाय्यक ग्रहमान राहते.

षष्ठ स्थानाचा अधिपती लग्नात असल्यास शत्रू नाश संभवतो.

१९) शिक्षण

षष्ठेश - लग्नेश परिवर्तन योग वैद्यकीय शिक्षणात प्रगतीकारक होतो.

२०) शुक्र - मंगल युती

शुक्र मंगळ युती १,५,६,७,१२ स्थानी असल्यास नैतिक अध:पतन होते.

२१) गुरु ग्रह

गुरु कन्या राशीत कुंडलीत कुठेही असो, त्या स्थानाच्या कारक फळात हानी करतो. अशावेळी गुरुचे रत्न वापरू नये.

गुरु सर्वात जास्ती मंगळाने बिघडतो.

अष्टमात गुरु अथवा शनी दीर्घायुष्य दर्शवतात. जाताकास शांत व सजग मरण येते.


२२) गुरु शनी युती

गुरु शनी युती मिथुन, सिंह, कन्या ह्या राशीत असता वंश नाश योग होतो.

स्त्री जातकाच्या पत्रिकेत ५,७,८ स्थानातील गुरु शनी युती अशुभ असते.

२३) रवी ग्रह 

रवी सर्वात जास्त केतूने बिघडतो.

24)   आरोग्य / आजार 

कर्क राशीत मंगळ / शनी - दमा व छातीचे विकार.

२५) शनी मंगळ यांचे असण्शात्मक प्रतियोग असल्यास जीवावरचे प्रसंग येतात.

२६) शुक्र व चंद्र एकमेकांच्या लाभ योगात असतील तर वाहन सुख लाभाते, अथवा एकमेकांच्या दृष्टीत असावेत.

२७) चतुर्थात केतू - वास्तुदोष.

२८) हर्शल / नेपच्यून ३,९,१२ स्थानी असता दूरचे प्रवास घडतात.

Sunday, February 24, 2019

पंचांग म्हणजे काय ? का आहे पंचांगाची आवश्यकता?


पुढील लेख हा येकदम शांतपने आन निवांतपणे वाचा बरका!!

कालचक्र हजारो वर्षापासून, पृथ्वीच्या निर्मितीपासून अव्याहत चालू आहे. माणूस जसा उत्क्रांत होत गेला तसा एकमेकांशी बोलण्यासाठी भाषांचा जन्म झाला. त्याचबरोबर त्याला काळाचं मोजमाप करण्याची गरज निर्माण झाली. या गरजेतूनच पंचांग जन्माला आलं. ऋषी मुनींनी हे ज्ञान पिढ्यानपिढ्या संक्रमित केलं. काळ मोजण्यासाठी जे प्रमुख घटक लक्षात घेतले जातात व त्यांची साद्यंत माहिती ज्यात असते त्याला पंचांग असे म्हटले जाते. जसे आपल्याला अंतर मोजायचं असेल तर आपण ते किलोमीटर, मैल इत्यादी परिमाणात मोजतो. वेळ मोजण्यासाठी आपण तास, मिनिट, सेकंद हि परिमाण वापरतो तसेच आपल्या हिंदू संस्कृती म्हणा किंवा धर्म म्हणा, काळ मोजण्यासाठी वार, तिथी, नक्षत्र, योग, करण हे पाच घटक कालामापनासाठी वापरले जात आले आहेत. 
आपल्या ज्योतिष शास्त्रात याचा उपयोग यासाठी होतो कि एखाद्या विशिष्ट वेळी एखादा विशिष्ट ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे, कोणत्या राशीत आहे, हे कळल्यावर त्याद्वारे फलादेश देता येतो. जातकाचा जन्म एखाद्या विशिष्ट योगावर, करणावर झाला असता त्याचा स्वभाव, त्याच्या आयुष्यात येणारा बरा वाईट काळ, घडणार्या चांगल्या वाईट घटनांचा अंदाज घेता येतो. 
प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी एका विशिष्ट नक्षत्रात व राशीत असतो त्याप्रमाणे तो इतर ग्रहांबरोबर काही विशिष्ट योग तयार होतात त्यांचे मानवी जीवनावर निश्चित असे परिणाम होतात या सर्व गोष्टींचा अभ्यास करून फलादेश देण्याकरिता पंचांगाची आवश्यकता असते. विविध प्रकारच्या कुंडली तय्रार करण्याकरिता पंचांगाची गरज असते. स्पष्ट ग्रह साधन, स्पष्ट भाव साधन इ गोष्टी पंचान्गाशिवाय होणार नाहीत. वार, तिथी, नक्षत्र, योग, करण  या प्रमुख घटकांच्या व्यतिरिक्त संवत्सर, संवत, ऋतू, अयन, घटी, पळे, पक्ष, मास  यांचा सुद्धा पंचांगात समावेश होतो. 
दिवस, वास्तविक आपली सर्वसाधारणपणे दिवसाची व्याख्या काय आहे? रात्री १२:०० ते रात्री ११:५९ हा आपला एक दिवस. असे ३६५ दिवस म्हणजे आपले एक वर्ष. हे वर्ष आपण १२ महिन्यात विभागले ज्यांना आपण जानेवारी, फेब्रुवारी मार्च इ नावांनी ओळखतो. कालमापनाची हि पद्धत सर्वात जास्त जगभर प्रचलित आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला गणेश चतुर्थीचे व्रत करायचे आहे, होळी साजरी करायची आहे, चैत्र पाडवा साजरा करायचा आहे, दिवाळीत लक्ष्मी पूजन करायचं आहे. अगदी तुमच्या दिवंगत मातेचे किंवा पित्याचे श्राद्ध घालायचे आहे. दूरच्या प्रवासाला निघायचे आहे, नवीन वाहन खरेदी करायचे आहे अशावेळी आपल्याला इंग्रजी महिना आणि तारीख नव्हे तर तिथी, वेळ आणि मुहूर्त जाणून त्याप्रमाणे प्लान करावा लागतो, इथेच पंचांग आपल्या मदतीला येते. आता या पंचांगातील विविध घटकांची थोडक्यात माहिती आपण करून घेऊ. थोडक्यात यासाठी म्हटले कि जर विस्तृत माहिती घ्यायची म्हटले तर एक एका घटकासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल. 

१) वार : पंचांग आणि आपली हिंदू संस्कृती या प्रमाणे एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंत च्या कालावधीला वार असे म्हणतात. म्हणजे रोजच्या सूर्योदयाला वार बदलतो. त्यालाच एक सावन दिवस असे सुद्धा म्हणतात . आता ज्यांना मंगळवारचे उपवास करायचे आहेत त्यांनी पार्टीला जाताना हा विचार केला कि रात्री १२ नंतर बुधवार लागतो तर हाणा चिकनवर ताव तर देवा, सबूर. तुम्हाला बुधवारच्या सूर्योदयापर्यंत थांबावे लागेल आणि सूर्योदयाची वेळ पंचांगामध्ये दिलेली असते, त्याप्रमाणे आपला उपवास आणि ओली -सुकी पार्टी प्लान करावी. 

२) तिथी:  आपले कालमापन जेव्हा चंद्र आणि सूर्य यांच्या गतीवर अवलंबून असते तेव्हा तिथी हा शब्द जास्त व्यापक प्रमाणात आपल्याला गरजेचा होतो. आपलं जे क्रांतीवृत्त आहे त्याचे ३६० समान भाग गणिताच्या सोयीसाठी केले आहेत त्यापैकी प्रयेक एका भागाला अंश असे म्हणतात. चंद्र सूर्य सकट सर्व ग्रह एका विशिष्ट वेळी या क्रांतीवृत्ताच्या कुठल्याना कुठल्यातरी अंशावर असतात. आणि रोज त्यांचा त्यांच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे ते आपली जागा बदलतात काही अंश पुढे जातात यालाच त्या ग्रहांचे गोचर म्हणतात. तसेच प्रत्येक ग्रहाची गती हि वेगवेगळी आणि परस्परांच्या तुलनेत वेगळी असते. सर्वात जलद गती चंद्राची असते. क्रांतीवृत्ताच्या ३६० अंशाच्या चंद्राच्या प्रवासात तो १२ राशी आणि २७ नक्षत्रातून प्रवास करतो, म्हणजे एका विशिष्ट वेळी चंद्र कुठल्याना कुठल्यातरी राशीत आणि नक्षत्रात असतो. आज चंद्र कुठल्या राशीत आणि कुठल्या नक्षत्रात किती वाजेपर्यत आहे याची माहिती पंचांगात दिली असते. उदा. जर मला माझ्या नवीन गाडीची डिलिव्हरी घ्यायची असेल तर मी पाहीन कि चंद्र एखाद्या वायू तत्वाच्या राशीत आणि नक्षत्रात असावा त्याप्रमाणे मी पंचांग पाहून प्लान करीन. (एक एका राशीवर आणि नक्षत्रावर लिहायचं तर ३९ लेख होतील ) परत आपल्या मुळ विषयावर येऊ. चंद्राला सूर्यापासून १२ अंश पुढे जाण्यास जो काळ लागतो त्याला तिथी असे म्हणतात. आणि हा काळ कमी जास्त असल्यामुळे एक तिथी म्हणजे २४ तास असे समजणे चुकीचे होते. एक तिथी २४ तासापेक्षा कमी किंवा जास्तही असू शकते. चंद्राच्या या प्रवासात तो आपल्याला आकाशात दिसेनासा होतो त्यालाच आपण अमावस्या असे म्हणतो आणि कधी चंद्र आपल्याला पूर्ण दिसतो त्याला आपण पौर्णिमा असे म्हणतो. म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा या तिथी आहेत. एका अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत च्या चंद्राच्या प्रवासाला तिथी मध्ये विभागले आहे त्यांची नावे अशी - १ - प्रतिपदा, २- द्वितीय, ३- तृतीय, ४ - चतुर्थी, ५ - पंचमी, ६- षष्ठी,  ७-सप्तमी, ८ -अष्टमी, ९- नवमी, १०- दशमी, ११- एकादशी, १२- द्वादशी, १३ - त्रयोदशी, १४ - चतुर्दशी, १५ - पौर्णिमा किंवा अमावस्या. चंद्राला एक तिथी पूर्ण करण्यास जो वेळ लागतो त्याला एक चान्द्रदिवस असे म्हणतात. असे ३० चान्द्रदिवस मिळून एक चांद्रमास (मास - महिना) होतो. एक चांद्रमास हा २ पक्षात विभागला जातो १५  तिथींचा मिळून एक पक्ष होतो. आता प्रत्येक पक्ष हा १५ दिवसांचाच असेल असे नाही. एक पक्ष हा १३ ते १६ दिवसांचाही असू शकतो. अमावस्या संपल्यानंतर पौर्णिमा पूर्ण होई पर्यंतच्या काळाला शुक्ल किंवा शुद्ध पक्ष असे म्हणतात आणि पौर्णिमा संपल्यानंतर अमावस्या पूर्ण होईपर्यंतच्या काळाला कृष्ण किंवा वद्य पक्ष असे म्हणतात. शुक्ल पक्षातील तिथींना शुक्ल प्रतिपदा, शुक्ल चतुर्थी, शुक्ल सप्तमी तर कृष्ण पक्षातील तिथींना कृष्ण पंचमी, कृष्ण अष्टमी, कृष्ण दशमी असे म्हणतात. पंचांगात प्रत्येक गोष्टीचा समाप्ती काळ दिलेला असतो. पूर्वी तो घटी व पळे या परिमाणात दिलेला असायचा पण सोयीसाठी आता तो तास व मिनिटे या परिमाणात दिलेला असतो. उदा. आज चतुर्थी समाप्ती २६:१३ असे दिलेले असेल तर रात्री १२ नंतर २४, २५, २६ असा मोजायचा म्हणजे चतुर्थी तिथी हि मध्यरात्री २ वाजून १३ मिनिटांनी समाप्त होते असा त्याचा अर्थ घ्यायचा. (२६:१३ म्हणजे मध्यरात्री २:१३ असा त्याचा अर्थ होतो.)  मध्यच थोडे विषयांतर करू. हे अंश, कला, विकला  काय कन्सेप्ट आहे ते पाहू. ३६० अंश मिळून एक क्रांतीवृत्त होते. एका अंशाचे ६० भाग केले  १ कला  होते. एका कलेचे ६० भाग केले कि एक विकला होते.   म्हणजे   ६० विकला म्हणजे एक कला. ६० कला म्हणजे १ अंश    आणि ३६० अंश म्हणजे एक क्रांतीवृत्त जे १२ राशी आणि २७ नक्षत्रात   विभागले आहे. ३६० अंशाच्या क्रांतीवृत्तात प्रत्येक राशीला     ३० अंश दिले आहेत (१२ गुणिले ३० =   ३६०)  आता मूळ वर येऊ. आपण ज्या तिथी या कन्सेप्ट   बद्दल माहिती घेतोय त्या तिथींना क्षय किंवा वृद्धी असते. तिथी हि सूर्य चंद्राच्या गतीवर अवलंबून असते. चंद्राची गती सूर्यापेक्षा जास्त आहे. चंद्राची गती जलद असल्यामुळे एखादे    दिवशी तिथी सूर्योदयानंतर सुरु होते व दुसर्यादिवशी सूर्योदयापूर्वी समाप्त होते अशा तिथीला क्षय तिथी किंवा तिथीचा क्षय  असे म्हणतात. एकाच पक्षात २ तिथींचा क्षय झाला   तर त्याला क्षय पक्ष म्हणतात. तो पक्ष अनिष्ट असतो. अशाच प्रकारे चंद्राची गती जेव्हा मंद असते तेव्हा तिथी सूर्योदयापूर्वी सुरु होऊन  दुसर्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत किंवा थोडा जास्त काळ विद्यमान असते तेव्हा याला तिथीची वृद्धी असे    म्हणतात. थोडक्यात असे कि जी तिथी लागोपाठ दोन्ही    दोन्ही सुर्योदायांना असते तेव्हा तिथीची वृद्धी    झाली   असे म्हणतात. मुहूर्त शास्त्रात या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. 
अशा या तिथींचे ५ प्रकार असतात. १. नंदा तिथी, २. भद्रा तिथी, ३. जया तिथी, ४. रिक्ता तिथी व ५. पूर्णा तिथी. प्रतिपदा, षष्ठी, एकादशी या नंदा तिथी आहेत. द्वितीया, सप्तमी, द्वादशी या भद्रा तिथी आहेत, तृतीया, अष्टमी, त्रयोदशी या जया तिथी आहेत. चतुर्थी, नवमी व चतुर्दशी या रिक्ता तिथी आहेत. (बरेचसे गणेश भक्त संकष्ट किंवा विनायकी चतुर्थीला आपल्या नवीन गाडीची डिलिव्हरी घेण्यासंबंधी आग्रही असतात. नवीन कार्यारंभ करतात त्यांना असे सुचवावेसे वाटते कि चतुर्थी हि रिक्ता तिथी असल्यामुळे अशा कामांना अनिष्ट असते सबब कुठलेही शुभ काम करणे टाळावे.) पंचमी, दशमी किंवा अमावस्या यांना पूर्णा तिथी असे म्हणतात.  मुहूर्त शास्त्रानुसार कोणत्याही शुभकार्यास शुक्ल पक्षातील (म्हणजे अमावस्या संपल्यानंतर) पहिल्या ५ तिथी अनिष्ट, षष्ठी पासून दशमी पर्यंत मध्यम. पुढील ११ पासून १५ पर्यंतच्या  तिथी उत्तम असतात. कृष्ण पक्षात पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत उलट क्रम  लावावा. 
३) नक्षत्र : जे आपल्या जागे पासून किंचितही हलत नाहीत त्या तारकांचा समूहाला नक्षत्र असे  म्हणतात. असे एकूण २७ नक्षत्र आहेत. क्रांतीवृत्ताच्या ३६० अंशाचे २७ समान भाग केले आहेत. प्रत्येक  भाग   हा १३ अंश २० कलांचा होतो. म्हणजेच क्रांतीवृत्तात प्रत्येक नक्षत्राची व्याप्ती हि  १३ अंश २० कलांची होते. पंचांगात रोजचे नक्षत्र दिलेले   असते यालाच चंद्र नक्षत्र असे   म्हणतात म्हणजे चंद्राचे गोचर भ्रमण त्यादिवशी त्या ठराविक नक्षत्रात असते. थोडक्यात चंद्राला क्रांतीवृत्तातील नक्षत्राच्या व्याप्तीचा १३ अंश २० कला भोगण्यास (भ्रमण करण्यास) लागणारा काळ म्हणजे एक चंद्र नक्षत्र होय. ज्योतिष शास्त्रात नक्षत्र हि अतिशय महत्वाची मानली गेली आहेत. कालनिर्णय करण्यासाठी नक्षत्र महत्वाची ठरतात. मुहूर्त शास्त्रात सुद्धा नक्षत्र महत्वाची ठरतात. प्रत्येक नक्षत्राची अधिपती ग्रह असतात. देवता असतात. स्वभाव असतात. तत्व असतात. त्याच्या बलाबलाप्रमाणे फलादेश अवलंबून असतात. (नक्षत्र यावर लिहायचे झाल्यास एक स्वतंत्र पुस्तिका निर्माण होईल, तेव्हा विस्तार भयास्तव एवढेच लिहितो.) 
४) योग: योग हा शब्द मुल युज या संस्कृत धातूपासून तयार झाला. योग म्हणजे जोडणे. एकत्र करणे. रवी आणि चंद्र यांच्या भ्रमणाच्या अंशाची बेरीज १३ अंश २० कला झाली कि एक योग  पूर्ण होतो. असे एकूण २७ योग असतात. ते पुढील प्रमाणे. विष्कम्भ, प्रीती, आयुष्मान, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृती, शूल, गंड, वृद्धी, ध्रुव, व्याघात, हर्षण, वज्र, सिद्धी, व्यतिपात, वरीयानपरीघ, शिव, सिद्ध, साध्य, शुभ, शुक्ल, ब्रह्मा, ऐंद्र, वैधृती. वरील पैकी हिरव्या अक्षरात लिहिलेले योग हे शुभ योग आहेत. ओनात्याही कार्याची सुरुवात या योगांवर केली  असता यश मिळते. लाल अक्षरात लिहिलेले योग हे अशुभ आहेत. या योगांवर कुठलेही शुभ कार्य करू नये. बाकीचे योग हे संमिश्र फळ देतात. 
५) करण: पंचांगाचे हे पाचवे अंग. करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग. म्हणजे एका तिथीमध्ये २ करण येतात. केऊन ११ करण आहेत. १. किस्तुन्घ्न, २. बव, ३. बालव, ४. कौलव ५. तैतिल ६. गरज ७. वानिज ८. विष्टी ९. शकुनी १०. चतुष्पाद ११. नाग. 
पंचांगाच्या या पाच प्रमुख घटकांव्यतीरिक्त आणखी काही कन्सेप्ट आहेत ते आपण पाहू. 

चंद्र राशी: पंचांगामध्ये चंद्र रोज कोणत्या राशीत कधीपर्यंत आहे ते दर्शवलेले असते. क्रांतीवृत्ताचे ३० समान भाग केले असून प्रत्येक राशी हि क्रांतीवृत्ताचे ३० अंश व्यापते. एकूण १२ राशी आहेत हे सर्वज्ञात आहेच. चंद्र कोणत्या राशीत आहे त्यावरून दैनंदिन भविष्य वर्तवले जाते. पंचांगामध्ये ग्रहराशी प्रवेश यासंबंधी माहिती असते. म्हणजे कुठला ग्रह कुठल्या दिवशी कुठल्या तिथीला कुठल्या राशीत प्रवेश करणार हे दर्शवलेले असते. त्यावरून जन्म लग्न कुंडली बनविली जाते. स्पष्ट ग्रह साधन केले जाते. 
पंचांगात आणखी काही शब्द प्रयोग आढळतात त्याविषयी माहिती घेऊ. 
भद्रा:  ज्या दिवशी विष्टी करण असते त्या काळालाच भद्रा किंवा कल्याणी असे म्हणतात. यावेळी शुभ व मंगल कार्ये करु नयेत. जारणमारण, उच्च्चाटन स्तंभन असले अघोरी प्रयोग करण्याकरिता हा काळ प्रशस्त मानतात. अर्थात ते आपले काम नव्हे. 
घबाड योग: हा एक शुभ योग असून शुभ कार्याकरिता उत्तम असतो. 
अमृतसिद्धी योग: रविवारी हस्त, सोमवारी मृग, मंगळवारी अश्विनी, बुधवारी अनुराधा, गुरुवारी पुष्य, शुक्रवारी रेवती आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असे योग म्हणजे अमृतसिद्धी योग असे म्हणतात. सर्व कार्यास शुभ असा हे योग मानतात पण गुरुवारी अमृत सिद्धी योग विवाहास वर्ज्य, शनिवारी अमृतसिद्धी योग प्रवासास व्यर्ज व मंगळवारी अमृत सिद्धी योग गृह प्रवेश व वास्तुशांती करिता वर्ज्य असा शास्त्रार्थ आहे. 
मृत्यू योग: रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृगशीर्ष, शुक्रवारी आश्लेषा व शनिवारी हस्त नक्षत्र असता मृत्यू योग होतो. हा सर्व प्रकारच्या शुभ कार्यास अयोग्य मानावा. मृत्युयोग म्हणजे मृत्यू होईल असे नव्हे. 
यम घंट योग : रविवारी मघा नक्षत्र, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मुळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी, शनिवारी हस्त असे योग असता यम घंट योग असतो. हा योग अत्यंत अशुभ योग असून या योगावर कुठलेही शुभकार्य कधीही करू नये. या योगावर जन्म झाला असता जनन शांती करावी. 
दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी, आणि शनिवारी नवमी असताना हा योग होतो. एक अशुभ योग असून सर्व कार्यास निषिद्ध मानतात. कपिलाषष्ठी योग : भाद्रपद शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला सूर्य हस्त नक्षत्रात असेल, मंगळवार असेल, व्यतिपात योग असेल व चंद्र नक्षत्र रोहिणी असेल तर कपिलाषष्ठी योग निर्माण होतो. अत्यंत शुभ योग असतो. मंगळवार ऐवजी रविवार असतानासुद्धा हा योग निर्माण होतो. अत्यंत दुर्मिळ असा हा योग आहे. 
प्रदोष: सूर्यास्तापासून पुढे ७२ मिनिटाचा कालावधी म्हणजे प्रदोष. चंद्र मासातील प्रत्येक पक्षातील त्रयोदशी जर प्रदोषकाळी ज्यादिवशी असेल त्यादिवशी पंचांगात प्रदोष असे लिहिलेले असते. सोमवारी, मंगळवारी व शनिवारी असा योग आला असता विशेष महत्वाचे मानतात. शिवपूजन, सत्यनारायण, उपवास इत्यादी धार्मिक कार्यास अनुकूल. 
होरा: एका सूर्योदयापासून दुसर्या सुर्योदयापर्यंतच्या काळाला होरा असे म्हणतात. एक होरा साधारण १ तासाचा असतो. प्रत्येक वराला प्रत्येक होरा हा विशिष्ट ग्रहाच्या प्रभावाखाली असतो. उदा. रवीचा होरा रविवारी सूर्योदयापासून १ तास असतो. सोमवारी चंद्र, ,मंगळवारी मंगळ असे. याप्रमाणे त्यापुढील होरे ठराविक क्रमाने येतात. हा होरा ज्योतिष शास्त्रात महत्वाचा मनाला जातो. जातकाने ज्या होर्यावर प्रश्न विचारला असेल त्या होरा स्वामीच्या कारकत्वाखाली गोष्टींबाबत जातकाचा प्रश्न असतो. या व्यतिरिक्त पंचांगामध्ये नदी, योनी गण इत्यादी विषयी माहिती असते. अ व क ह डा चक्र असे एक कोष्टक असते. तर मंडळी याविषयी स्वतंत्र लेख अवश्य लिहीन तूर्तास आपली रजा घेतो. !!!


शुभम भवतु||

आमोद विष्णू ननावरे
ज्योतिष सल्लागार व समुपदेशक 
वसई. 
दूरध्वनी : ७७०९५९४९०२ 



Monday, February 18, 2019

ज्योतिष: नोकरीसाठी परदेश गमन होईल का?


श्री स्वामी समर्थ.

नमस्कार मित्रहो!

नोकरीसाठी परदेश गमन होईल का असा प्रश्न एका महिलेने फोनवर विचारला. आता हे परदेशगमन तेही नोकरी करिता होईल का ते आपण पाहूया.

प्रश्न : नोकरीसाठी परदेशगमन होईल का?
तारीख : १८ फेब्रुवारी २०१९.
वेळ: रात्री ९ वाजून १९ मिनिटे.
स्थळ: वसई (महाराष्ट्र) - ज्योतिषी जिथे असतील ते स्थळ विचारात घ्यावे.

प्रश्न वेळचे तत्कालीन कार्येश ग्रह (Ruling Planet ) खालील प्रमाणे.

लग्न स्वामी : (कन्या) बुध, चंद्र नक्षत्र : (पुष्य) शनी, चंद्र राशी : (कर्क) चंद्र. वार : (सोमवार) चंद्र

प्रश्न लग्न कुंडली

प्रश्न लग्न कुंडलीत चंद्र जरी लाभ स्थानात असला तरी प्रश्न नवमांश कुंडलीत तो भाग्यात म्हणजेच नवम स्थानात आहे. नवम स्थान हे दूरच्या प्रवासासाठी विचारात घ्यावे लागते. दुसरे असे कि चंद्राचा नक्षत्रस्वामी बुध हा प्रश्न लग्न कुंडलीत षष्ठात असून त्याची सातवी दृष्टी व्यय स्थानावर आहे. म्हणजे नक्षत्र स्वामीच्या माध्यमातून चंद्र व्यय स्थान पाहतो. मनातली इच्छा कुंडलीवर अशी प्रतिबिंबित होते. परदेश गमनासाठी व्यय स्थान विचारात घ्यावे लागते. थोडक्यात असे कि प्रश्न बरोबर विचारला आहे. 

परदेश गमन हे व्यय स्थानावरून पाहतात, म्हणजेच परदेश गमनाचे कारक स्थान हे व्यय स्थान असते. परदेशात जाणार म्हणजे तुमच्या सद्य परिस्थितीत अमुलाग्र बदल होणार हे ओघाने आलंच कोणत्याही प्रकारच्या बदलाच, स्ठीत्यन्तराच कारक स्थान म्हणजे तृतीय स्थान. खरे तर स्थानांतर हा शब्द जास्त चपखल वाटो. दुसरे असे कि परदेशात जायचे तर सध्याच्या काळात विमानाला पर्याय नाही. बोटीने तर आपण परदेशात जात नाहीना! तर दूरच्या प्रवासाचे कारक स्थान म्हणजे नवम स्थान विचारात घेणेहि आलंच. म्हणजे असं कि व्यय स्थानाचा उपनक्षत्रस्वामी जर ३, ९ किंवा १२ यापैकी स्थानांचा कार्येश असेल तर परदेश गमन होईल. आता वरील प्रश्न लग्न कुंडलीत तसे आहे का ते पाहू. 

बाराव्या म्हणजेच व्यय स्थानाचा उपनक्षत्रस्वामी हा चंद्र आहे. आणि हा आपला चांदोबा बुधाच्या नक्षत्रात आहे. आता दुसरा मुद्दा हा कि प्रश्न लग्न कुंडलीचा महादशा स्वामी आणि अंतर्दशा स्वामी कौन है? तर तो बुध (मार्च २०३०) व शुक्र (जून २०१९). महादशा स्वामी बुध कोणाच्या नक्षत्रात आहे? गुरु. अंतर्दशा स्वामी शुक्र  कोणाच्या नक्षत्रात आहे? शनी. आता हे झाले आपले सहकलाकार. चंद्र, बुध, शुक्र, गुरु आणि शनी. हे सर्व कलाकार आपापली भूमिका कशी वठवतात ते पाहूया. त्यासाठी त्याचं कार्येशत्व पाहावे लागेल. 

तर व्यय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी चंद्र हा तृतीय स्थान (बदल), लाभ स्थान (इच्छापूर्ती) व षष्ठ स्थान (नोकरी) या स्थानांचा कार्येश होतोय. चंद्राचा नक्षत्रस्वामी बुध हा तृतीय (बदल), षष्ठ (नोकरी), नवम (दूरचे प्रवास), दशम (करिअर), लाभ (इच्छापूर्ती), व व्यय (परदेशातील वास्तव्य)  म्हणजे छप्पर फाडके!!! 

दशास्वामी हि बुधच आहे. त्याचा नक्षत्रस्वामी गुरुही शेम टू शेम बुधाप्रमाणेच कार्येश होतो.  बाबौ!!!

अंतर्दशा स्वामी शुक्र २ व ९!! त्याचा नक्षत्रस्वामी शनी २,९,११ याचा सरळ सरळ सरळ अर्थ असा कि जातक जून २०१९ च्या आत परदेशात जाणार म्हणजे जाणार म्हणजे जाणारच. और पतेकी बात यह है कि, प्रश्न लग्न कुंडलीत तृतीयेश मंगळ व भाग्येश शुक्राचा नव पंचम योग आहे. चतुर्थातल्या शुक्र शनीची दृष्टी दशमावर. दशमेश बुध रविबरोबर षष्ठात शनीच्या तिसर्या दृष्टीत. दशमेश व्यय स्थानाला पाहतो आणि व्ययाधीपती रवी दशमेशाबरोबर. तृतीयातल्या गुरूची लाभातल्या चंद्रावर आणि नवम स्थानावर दृष्टी आहेच. ३,९,१२ याचं तिरकीट चांगलच जमलय .

आणि शेवटच, आपले प्रमुख कलाकार बुध व चंद्र हे लग्न स्वामी व राशी स्वामी म्हणून रुलिंग मध्ये आहेतच. 
सर्व चे सर्व जन मार्गी आहेत. कुनीबी वाकडे (वक्री) न्हाई. 

(हे वाक्य नाकात उच्चारायचे) आता तुम्हास पण काही मार्गदर्शन घ्यायचे असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. माझी कुठेही शाखा नाही आणि मी दुपारी १ ते ४ या वेळेत जागाच असतो. 
७७०९५९४९०२. कसे!!!

आपला (परदेशी जाऊ न शकलेला),

आमोद ननावरे