"अहो ऐकले का?"
सिंक पाशी भांडी विसळता विसळता बायकोने विषय काढला. मस्त रविवारची ओली दुपार. चमचमीत कोंबडी वडे आणि चिकन वर आडवा हात मारून रविवारचा म. टा वाचत पडलो होतो. जवळच आमच्या एकुलत्या एका कन्यारत्नाची एकीकडे चित्रकला साधना चालू होती आणि दुसरीकडे टीव्हीवर दबंग पाहणे चालले होते. लेक आतापासूनच मल्टिटास्किंग का काय ते, करीत होती. म्हणजे एकाचवेळी 2-3 कामे करायची. आजकालच्या कार्पोरेट युगाचा मंत्र आहे तो. समोरच्या बिल्डिंगच्या बाल्कनीवरच्या अनधिकृत पत्र्यावर पावसाचा ताशा वाजत होता आणि ह्या पार्श्व संगीतावर बायकोने नको त्या विषयाला तोंड फोडले, त्याची सुरुवातच मुळी अशी झाली - "अहो ऐकलं का?" आता रविवारच्या म. टा मधला आवडता लेख अर्ध्यावर सोडून देणे भागच होते हे आपल्यासारख्या चाणाक्ष वाचकांच्या मनात आलेच असणार. मी शांतपणे पेपरची घडी घातली आणि बायको काय म्हणते ह्याकडे जीवाचे कान करून ऐकू लागलो. म्हटलं, "बोल." नुकतीच धुऊन झालेली भांडी निथळत ठेवत ती म्हणाली, " अहो, कालच आईचा फोन आला होता." आतापर्यंत फडक्याने हात पुसून झाले होते. उरलेलं चिकन दुसऱ्या भांड्यात काढून फ्रिज मध्ये ठेवत ती म्हणाली, "मृणालच्या संजयला म्हणे स्थळ सांगून येतायत, तर परवा एक पार्टी आली होती त्यांच्या कडे. एकुलती एक मुलगी आणि तिचे आई वडील." आता हि मृणाल म्हणजे तिची सक्खी मैत्रीण आणि संजय म्हणजे तिच्या मैत्रिणीचा सक्खा भाऊ. मी म्हटलं , " अच्छा हो का! चांगले आहे कि मग. ठरले लग्न?" मी उगाचच बायकोच्या विषयात इंटरेस्ट घेतला. (माझ्यासमोर आणखी कोणता पर्याय होता?) " काय आज कालच्या मूली!" अवघ्या 5-6 वर्षांनी लहान असलेला बायकोच्या मैत्रिणीचा भाऊ आणि आपण एकदम म्हातारे झालो? कालचे झालो? कि तिने म्हणावं काय आज कालच्या मूली. असो. मी म्हटलं, "का ग, काय झालं ?" एव्हाना पदर खोचुन झाला होता. "उगाच आपले त्यांचे जुजबी बोलणे चालू होत, संजय आणि ती नटवी , त्यांना काकूंनी दोघांना जरा बाहेर पाठवले, म्हटलं थोड्या गप्पा मारतील. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतील. थोडा मोकळेपणा मिळेल पण ह्या गाव भवानीने प्रश्नांची सरबत्तीच केली." आतापर्यंत बायकोने दात ओठ खायचेच बाकी ठेवले होते. आपल्या संख्या मैत्रिणीच्या भावाला सांगून आलेलं स्थळ. लग्नाची बोलणी करायला आलेल्या मुलीला नटवी, गावभवानी अशी शेलकी विशेषण तिने द्यावी असा कोणता गुन्हा त्या अश्राप मुलीने केला असावा, असा साहजिक प्रश्न माझ्या मनात चटकन आला. "होल्ड होल्ड. अग झालं तरी काय? अशी एकदम उसळायला काय झालं तुला?" मी आपलं लगेच पांढर निशाण फडकावत बोललो. अर्थात ती तिच्या आईबापाची एकुलती एक लेक होती. कुठल्याही उपवर मुलीच्या मनात काही ढोबळ प्रश्न असणारच. उदा. मुलाचे वय. त्याचे शिक्षण. त्याची नोकरी. पगार. स्वतःचे घर. वगैरे वगैरे आणि ह्या गोष्टींची शहनिशा करायला काहीच हरकत नसावी शिवाय आयुष्यभराचा प्रश्न असतो आफ्टर ऑल लग्नाचा प्रश्न आहे हा. मग असा काय प्रश्न तिने विचारला कि तिकडे पार पुण्यात लागलेल्या आगीची झळ माझ्या बायको पर्यंत यावी? "अहो उसळू नको तर काय?, ती सटवी काय विचारते, बहिणीचे लग्न झाले आहे का? ती इथे कितीवेळा येते? तिचा नवरा काय करतो? कि इथेच माहेरी पडलेली असते? आता मला सांगा मृणालने तिच्या माहेरी जाऊ नये का? कधी जावे कितीवेळा जावे हे हि बया कोण ठरवणार?" बायको आपल्या सात्विक संतापाला वाट करून देत होती. "अजून लग्न व्हायचेय आणि आताच तिचे हे नखरे!" एका मुलीचा बाप म्हणून मलातरी तिचे प्रश्न एवढे चिडण्यासारखे नाही वाटले, मुलगी शिकलेली आहे. कमावती आहे. स्वतंत्र आहे. तीलाही तिचे विचार आहेत. तिच्याही भावी वैवाहिक जीवनाची काही स्वप्न आहेत. तिचे प्रश्न मला प्रॅक्टिकल वाटले. आता हे मी अगदी मनात स्वतःशीच बोललो. "अहो ऐकताय ना?" बायकोने माझी तंद्री भंग केली. "बरोबर आहे तुझं!" " तेच तर म्हणत्ये मी, आणि कहर म्हणजे डुचकी आणखी काय विचारते माहित्ये का?" मी आपला प्रश्नार्थक चेहरा केला. " डस्टबिन कुठे ठेवणार?" मी दचकलो "डस्टबिन?" "हो नाहीतर काय? काय तिची बिशाद? डस्टबिन म्हणजे मुलाचे आई - वडील." "बापरे असं म्हणाली?" आपल्या भावी सासू -सासऱ्यांची गणना तिने कचऱ्याच्या डब्याशी करावी हे मात्र मला अजिबात पटले नाही. तिला असेही विचारता आले असते कि लग्नानंतर आपण एकत्र राहणार कि वेगळे? बर विचारले तर विचारले ते हि इतकया थेट! तोंडावर? एवढा माज? कसला माज? शिक्षणाचा? रूपाचा? नोकरीचा? "हे मात्र अतीच झालं हा". बायकोच्या चिडण्याचे कारण मला आता पटले होते. हा म्हणजे वैचारिक दहशतवाद झाला. त्या मुलीने हे बोलण्या आधी हा नाही विचार केला कि आणखी 25-30 वर्षांनी तिचाही डस्टबिन होणार? तिच्या हि मुलं- मुलीला लग्नाची बोलणी करायला स्थळ येतील आणि हीच घटना पुन्हा रिपीट होईल? लग्न म्हणजे दोन कुटुंबाचे मिलन वगैरेकल्पना पुस्तकीच म्हणायच्या का? आजच्या ह्या तरुण पिढीचे विचार एवढे टोकाचे का झाले आहेत? कुटूंबासाठी करावयाचा त्याग, सेवाभाव वगैरे कवी कल्पनाच का? आणि मला नको तेच घडलं. बायकांना ना सवयच असते तिच्या नात्यात किंवा मित्र मैत्रिणीच्या काही घडलं कि लगेच स्वतःशी रिलेट करायचं. "आता तुम्हीच सांगा, हे बोलणं बरोबर आहे की तीच? तुमच्या आई बाबांनी मला इतका त्रास दिला, मी कधी काही बोलले?" आपली तनया आपल्याकडे लग्नानंतर 3 वर्ष होती, मी काही बोलले? सर्वांचं सर्व केलंच ना मी?" गाडीने आता वेगळाच वळण घेतलं होत. बाथरूमला जायचे म्हणून मी उठलो " चालायचंच ग ! तू होतीस म्हणून निभावलं. सर्वच जणी थोडीच तुझ्या सारख्या असतात!" मी माझं पांढर निशाण अजून ऊंच फडकावत ठेवलं होत. "जरा मस्त गरम गरम आल्याचा चहा करतेस?" दुपारचे 4 वाजले होते. बाहेर पावसाची संततधार चालूच होती. लेकीच्या चित्रातले ओले रंग आता सुकत आले होते. किचन मध्ये चहाचे आधण बायकोने केव्हाच ठेवलं होत. चहात टाकायला तिने आलं ठेचायला घेतलं होत आणि टीव्हीवर गाणं चालू होत मैं झंडू बाम हुई, डार्लिंग तेरे लिये.