कविवर्य बा. भ. बोरकर यांची रचना. पं. जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं आणि संगीत बद्ध केलेलं गाणे ऐकण्याचा योग आला.
नाही पुण्याची मोजणी | नाही पापाची बोचणी | जिणे गंगौघाचे पाणी| ....
साधकाच्या दृष्टीने मृत्यूला सामोरं कसं जायचं ह्याच सुंदर विवेचन कविवर्यांनी केल आहे. साधकाच्या दृष्टीने ह्या साठी म्हटले कारण साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यावर साधकाच्या मनात मृत्यूच चिंतन सुरु होत. जीव कासावीस होतो. व्याकूळ होतो. ज्या शरीराच्या योगाने आयुष्यभर साधना केली. नामस्मरण केल. सद्गुरूंची काय वाचा मने पूजा केली. त्या ईश्वराची भक्ती केली ते शरिर सूटलं तर पुढे काय? विठ्ठलाच्या ओढीने तुकोबांनी मोक्ष हि टाळला म्हणूनच त्यांना म्हणावेसे वाटले..... न लगे मुक्ती | धनसंपदा, संत संग देई सदा | तुका म्हणे गर्भवासी | सुखे घालावे आम्हासी || देवा विठ्ठला तुझी भक्ती करण्याकरिता मला वारवार जन्म घेउदे. तरी शेवटी काय? आम्ही जातो आमुच्या गावा | आमुचा राम राम घ्यावा|| मृत्यू हे जिवनाच अटळ सत्य. न चुकवता येणार. जो जन्माला आला आहे तो एक दिवस मरणारच. म्हणून कविवर्य म्हणतात, नाही पुण्याची मोजणी. आपण कोण पुण्य करणारे? केलेले पुण्य मोजून आपण काय मिळवणार. जेव्हा त्या परमात्म्यावरच सर्व सोपवले आहे तर तो ठेवेल तसे राहणे क्रमप्राप्त नाही का. मी पुण्य करतो हा हि एक प्रकारचा सात्विक अहंकारच नव्हे का? साधनेत अहंकार हा क्रमांक एक चा शत्रू. अशाने संपूर्ण शरणागती कशी साधणार? मी नामस्मरण करतो. मी पूजा पाठ करतो. मी पोथी वाचन करतो. मी परोपकार करतो. मी? हा मी कुठून आला? आणि जोपर्यंत हा मी आहे तो पर्यंत स्वस्वरूपाचे आकलन कसे होणार? आणि जिथे हा मी आहे तिथे द्वैत असणारच द्वैत म्हणजे दुसरे कणीतरी. मी व्यतिरिक्त दुसरे. जिथे पुण्य आहे तिथे पाप हि असणारच. पाप नसेल तर पुण्य तरी कसे कळणार? पाप आणि पुण्य एकाच नाण्याच्या दोन बाजू. जिथे प्रकाश आहे तिथे अंधार नाही आणि जो पर्यंत अंधाराचे ज्ञान होणार नाही तो पर्यंत प्रकाश कसा कळणार? साधना पथावर मार्गक्रमण करताना कळत नकळत साधकाकडून पाप हि होते. साधकाच श्रद्धाळू मन गोंधळून जात. पापाचरणाचे दुख त्याला डाचते, पण म्हणून कवी म्हणतात, नाही पापाची बोचणी. रे साधका असू दे भक्ती तुझी सहज आणि अनन्य. पाप पुण्याचे हिशेब का ठेवायचे? शेवटी सर्व इथेच सोडून जायचे आहे. एकदा समर्पित झाले कि काय पुण्य आणि काय पाप. म्हणून म्हणायचं, नाही पापाची बोचणी. जिणे गंगौघाचे पाणी. साधकाचे जीवन कसे असायला हवे गंगेच्या ओघासारखे. पवित्र गंगा नदी. तिचा ओघ - प्रवाह रात्नाकराकडे धावणारा. अखेरीस त्यात सामावून जाणारा. सर्वांच पाप पुण्य आपल्यात सामवून घेत शेवटी अथांग सागरात स्वतःला समर्पित करायचं हेच गंगेचे जीवनाचे सार्थक नाही का. साधकालाही शेवटी त्याच्या आराध्याच्या चरणाशी विसावा घ्यायचाच आहे. तिथे देहा बरोबरच माया मोहाचे, पाप पुण्याचे सर्व संदर्भ गळून पडायला हवेत. सर्व ग्रंथी तुटायला हव्यात.
कवी म्हणतात,
कशाचा ना लागभाग | कशाचा ना पाठलाग | आम्ही हो फुलांचे पराग |
ह्या ओळीचे गीतेतील एका वाचनाशी साधर्म्य आहे, सुख दुःखे समे कृत्वा | लाभा लाभू | जया जयौ | , साधनारत असताना कशाची आसक्ती नसावी. शेवटी मन आहे. पैशा अडक्यात, मुला बाळात अडकणारच. कधी आनंदाचे भरते तर कधी दुःखाचा अनावर आवेग. स्तुती सुमनांनी हुरळून जायचं तर कधी अपमानाचे कडू घोट पचवायचे. अशा नाना प्रकारच्या प्रसंगांनी भरलेले आयुष्य. पण एकदा म्हटले राम हा समर्थ, मग हा खटाटोप कशासाठी? अशाने भक्तीचा परमोच्च क्षण कसा साधणार? आपले साध्य काय आणि आपण कशाच्या मागे लागलेलो आहोत? त्या रामाने ठेवले तसे राहावे. कशात गुंतणे नाही. एका नामा शिवाय कशात रमणे नाही. सर्वात असून नसणे. शरीराने कर्म चाललेली आहेत पण मन नामाच्या ठिकाणी स्थिर अशी अवस्था. कोणी त्यजा अथवा निंदा, आमुचा स्वहिताचा धंदा. त्याच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही म्हणून आम्ही हो फुलांचे पराग. वाऱ्याच्या (ईश्वराच्या) इच्छे नुसार आम्ही वाहणार. असे असावे साधकाचे अंतरंग.
आम्ही नाही नाम - रूप | आम्ही आकाश स्वरूप | जसा निळा निळा धूप |
भक्तिमार्गाच रहस्य इथे प्रकट होते. देव पहावयासी गेलो | तेथे देवची होऊनी ठेलो |, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू असताना, एक दिवस असा येतो कि माउली म्हणतात आजी सोनियाचा दिनू | वर्षे अमृताचा घनु |. आजचा दिवस कसा आहे? सोन्याचा दिवस आहे. अमृताने भरलेला घन आज बरसतोय. सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव होतोय. भक्तिरसात चिंब भिजण चालू आहे. ज्या देवाच्या शोधात मी भटकत होतो तो आज मला माझ्यातच सापडलाय. सर्वत्र त्याच्या भक्तीचा मंद दरवळ भरून राहिलाय. सर्वत्र त्याचा शाश्वत प्रकाश पसरलाय. ज्ञानाचा प्रकाश. तुझा तूची देव. तुझा तूची भाव. माझे मज रूप कळू आले. आणि शेवट कि सुरुवात? साधक स्वस्वरूपात लीन होतो. साधकाचा हा मृत्यू म्हणावा कि नवा जन्म? तो नाम घेतो. तो त्या विश्वाम्भराच्या रूपाचे ध्यान करतो पण ते सर्व आता एकरूप झाले आहे. आणि हीच सायुज्य मुक्ती साधकाला लाभते जी असते भक्तीची परिसीमा. तो आकाश स्वरूप होतो आणि भक्तीचा निळा रंग सर्वत्र भरून राहतो धुपा सारखा.
पूजेतल्या पाना फुला | मृत्यू सर्वांग सोहळा | धन्य निर्माल्याची कळा |
पूजा करताना ताजी टवटवीत फुल नाही का आपण वाहत श्री चरणावर, दिवस भरात त्या फुलांच निर्माल्य होत. कोणी पाण्यात विसर्जित होतात. कोणी मातीत एकरूप. पुन्हा नव्याने त्याला कोंभ फुटतो. धरणीच्या उदरातून जन्म घेत सद्गुरूंच्या चरण कमलावर विसावण्यासाठी. त्या सुकोमल पवित्र श्रीचरणांच सान्निध्य जर आयुष्य भर मिळत असेल तर मृत्यू हा सोहळा न होता तर नवल. त्या फुलासारख साधकाच जीवन. संपूर्ण आयुष्य श्री चरणांवर समर्पित झाल्यावर आणखी काय हव? शरीराच सुद्धा तसच आहे. मृत्यू होतो तो शरीराचा.शरीराच निर्माल्य होत. पंचमहाभूतात विलीन होत. नव्याने जन्म घेण्यासाठी. भक्तीची वाट चालण्या साठी. म्हणून इतकेच म्हणावसे वाटते, शेवटचा श्वासही नामात जावा.
No comments:
Post a Comment