सद्गुरूंच्या शोधात..
जीवनात गुरुचे महत्व अनन्य साधारण आहे ह्याबद्दल खचितच कोणाचे दुमत नसेल. जन्माला आल्या पासून आयुष्यभर सतत आपण काही ना काहीतरी शिकतच असतो. म्हणूनच आयुष्य हि एक शाळाच आहे असे कुणीतरी म्हटले असावे. आयुष्याच्या ह्या शाळेत प्रत्येक वळणावर, प्रत्येक बाबतीत आपल्याला गुरुची आवश्यकता भासते. अगदी आई वडिलांपासून ते आपल्या शिक्षकांपर्यंत सर्व आपले गुरूच. अगदी काही अनाहूत लोक किंवा मित्र सुद्धा आपल्या असयुष्यात गुरुची भूमिका निभावतात. पण आत्ता आपला विषय वेगळा आहे, आयुष्यात गुरुची तर नितांत आवश्यकता असतेच. कुठल्याही क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी, कौशल्य संपादन करण्यासाठी, खाचा खोचा जाणून घेण्यासाठी, यश मिळवण्यासाठी आपली अवस्था गुरुविण सापडेना सोया अशीच होत असते.
आयुष्याच्या एका वळणावर आपण असे म्हणू शकतो कि आता आपण बरेच काही मिळवले. किंबहुना हे बरेच काही मिळवण्यातच आपली मार्ग क्रमणा चालू असते. जन्म, शिक्षण, उच्च शिक्षण, नोकरी - व्यवसाय, विवाह, घर - खरेदी, वाहन - खरेदी, संतती, बँक बॅलन्स, संततीचे शिक्षण, संततीचे विवाह वगैरे पठडीतल्या गोष्टी मिळवण्यातच आपली हयात जाते. आपण आपली आणि आपल्या पुढच्या पिढीची सोय लावण्यातच गर्क असतो, त्यात काही गैर नाही. म्हातारपण सुव्यवस्थित असावं म्हणून आपण व्यवस्था करतोच. त्यासाठी जास्तीचा पेन्शन प्लॅन हि आपण घेतलेला असतो. शिवाय एखाद्या गंभीर आजारपण अथवा अपघात वगैरे सारख्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सुद्धा आपण तत्पर असतो करत एखादी मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली असते. जग रहाटीप्रमाणे विविध उत्सव आपण साजरे करतोच. आपण तसे थोडे, किंवा कामापुरते देव भोळे, पापभिरू, धार्मिक सुद्धा असतो. आणि जप जाप्य, मंत्र पठाण, ग्रंथ वाचन ह्या गोष्टी आपण खास राखून ठेवलेल्या असतात रिटायर झाल्यानंतर करण्यासाठी. पण रिटायर झाल्या नंतर सुद्धा आपला बराचसा वेळ कुठल्याशा क्लब मध्ये पत्ते कुटण्यात जातो, एखाद्या सामाजिक संस्थेत लुडबुड करण्यात जातो, मॉर्निंग वॉकच्या नावाखाली एकत्र येऊन गॉसिप करण्यात जातो, क्रिकेट - राजकारण सारख्या विषयात आपल्याला काहीही गम्य नसताना निरर्थक गप्पा मारण्यात जातो, नाहीतर मक्याचा मुलगा आणि तमक्याची मुलगी वगैरे वगैरे. हि सर्व असते देह बुद्धी. देहाच्या माध्यमातून लौकिक आयुष्य जगताना ह्या सर्व गोष्टी आपण तन्मयतेने आणि समरसून करत असतो आणि ह्यालाच आपण म्हणतो - प्रपंच.
कोणालातरी हा मांडलेला डाव अर्ध्यातच मोडून जावं लागतं, ध्यानी - मनी नसताना. अनेक वेळा अपमान, अवहेलना, उपेक्षा वाट्याला येते. हात लावला तिथे माती व्हावी अशी अवस्था होते. दुर्धर आजारपण किंवा पराकोटीचे दारिद्र्य, एखाद्या वेळेस कर्ज - बाजारीपणा, संततीचे अकाली निधन किंवा वाईट संगत, मार्गाला लागणे वगैरे प्रसंग हि घडतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा षड्रिपूंच्या आहारी जात जीवन जगणे चालूच असते. इच्छांना अंत नसतो. हवे हवे आणि हवे बस .. हीच आयुष्याची इतिश्री. ह्या सर्व जंजाळात आपण इतके गुंतत जातो कि वासनेच्या, इच्छेच्या प्रभावामुळे आपण कर्म बंधनात अडकतो आणि हेच आपल्या पुनर्जन्माचे कारण बनते. जेव्हा आपल्याला हे समजते तेव्हा वेळ निघून गेलेली असते किंवा असू शकते म्हणून जो कर्म - चांगली वाईट आपण आयुष्यभर केली का तर आपले आयुष्य इथे ह्या पृथ्वी लोकात सुखकर व्हावं. सर्व बेगमी आपण केली. बँक बॅलन्स जमवला पण परलोकात गेल्यानंतरची सोय आपण केली आहे का? हा मुख्य प्रश्न आहे. संतांनी म्हटले आहे मरणानंतरही जीवन असते. लौकिक आयुष्यात एवढे मिळवले तरीही मन शांत, मोकळं नाही. आणखी एका अशा वळणावर हे सर्व किती नश्वर आहे ह्याची जीवाला जाणीव होते. इच्छांना किती फलद्रुप करण्याकरिता झटले तरी त्या शमत नाहीत.
न जातु काम: कामानाम उपभोगेन शाम्यति | हविमा कृष्णवर्तमेव भूय: एवं अभिवर्तते ||
आयुष्याच्या नश्वरतेकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन विकसित होण्याचा हा तो क्षण जेव्हा जिवाच्या ठिकाणी वैराग्याचा उदय होतो. अनुदिनी अनुतापें तापलो रामराया असं म्हणायची वेळ येते. प्रपंचाच्या चिखलातून बाहेर पडण्याची धडपड सुरु होते. त्रिविध तापे पोळला तोचि अधिकारी झाला परमार्थाचा असे होते.मी कोण आहे? माझे स्वरूप काय आहे? माझा जन्म का आहे? विश्वाचा ह्या पसाऱ्यात माझे स्थान काय? मोक्ष काय आहे? अशा अनेक प्रश्नांचे भुंगे मन पोखरू लागतात. परमार्थ साधण्याकडे जीवाचा कल वाढतो. जप जाप्य, विविध साधना, आत्मा क्लेश, उपास तपास , व्रत वैकल्य, तीर्थ यात्रा, ग्रंथ वाचन वगैरे गोष्टींचा अंगीकार केला जातो पण कालांतराने लक्षात येते आपण होतो तिथेच आहोत. तथाकथित दादा, बाबा, बापू, बुवा वगैरे लोकांच्या कच्छपी लागून नुकसान सुद्धा करून घेतलेलं असू शकत. मी साधन करतो, मी नाम स्मरण करतो, हा सात्विक असला तरी अहंकारच. साधनेच्या वाटेवर सर्वात १ नंबरचा शत्रू. अशा या आर्त, मुमुक्षु, साधकाला मार्गदर्शन करण्यासाठी, जिवाशिवाची भेट घडवून देण्यासाठी, साधकाच्या जिवंतपणी आणि त्याच्या मरणानंतरही जन्मो जन्मी त्याची आणि त्याच्या साधनेचा परिपोषाची जबाबदारी वाहण्यासाठी नियतीने एक विशिष्ट योजना केलेली असते ती म्हणजे - सद्गुरू.
सद्गुरूंची भेट व्हावी असं वाटतं, नव्हे तशी तळमळ लागते. पण इथेच खरी मेख आहे, मनाच्या अशा अवस्थेत फसगत होण्याची शक्यता अधिक असते कारण गुरु आणि सद्गुरू ह्यात फरक आहे. समाजामध्ये आज अनेक दादा, बाबा, बापू, अण्णा, श्री श्री वगैरेंचे पेव फुटले आहे, ह्यात प्रस्तुत लेखकाचा कोणाला दुखावण्याचा मानस नाही, पण हि वस्तुस्थिती आहे. रोजच्या वर्तमान पत्रातून अशा स्वरूपाच्या बातम्या वाचायला मिळतात, एका भोंदू बाबाने पूजेच्या बावाखाली ३-३.५ लाख घेऊन पोबारा केला वगैरे. सद्गुरुंच्या शोधात जाण्याची मुळीच गरज नाही असे पुन्हा एकदा येथे लिहितो, तरीही साधना मार्गात श्रद्धा असण्याबरोबच सतर्क राहणं हि आवश्यक आहे. नाहीतर तथाकथित स्वयं घोषित गुरूंच्या नाडी लागून संकटात संपण्याची वेळ येऊ शकते. म्हणून शास्त्रकाराने म्हटले आहे
तस्माद् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तयमम्। शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मपरे च समाश्रयम्॥
अर्थात, अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी साधनारत असणाऱ्या साधकाला अशा योग्य गुरूंच्या सन्निध राहायला हवे जे अध्यात्म शास्त्रात निष्णात असून आत्मानंदात निमग्न असतात. च्यामुले ज्ञान मिळते. दुःख हलके होते. आंतरिक समाधान लाभते. खरा सद्गुरू हा कधीच चमत्कार करत नाही. तो कधीच शिष्याकडून धनाची, मानाची अपेक्षा करत नाही, तो स्वयं सिद्ध असतो. त्याच्या सान्निध्यात शिष्याला आंतरिक समाधान आणि शांती लाभते, आत्यंतिक करुणा, दया, शांती, ममता, वात्सल्य आणि सर्वाभूती समत्व त्यांच्या मनात वसंत असते. आनंद हे सद्गुरुंचे मुख्य लक्षण आहे. त्यांच्या जीवनात असंतोष, उदासीनता, विक्षेप यांना मुळीच स्थान नसते. सद्गुरू हे कर्मे करूनही अकर्त्याच्या भूमिकेत असतात. ते निर्भय असतात. स्व स्वरूपात स्थित असतात. आत्मानंदात निमग्न असतात. ती जिथे पाहतील तिथे त्यांना सर्व परमात्म स्वरूपाचं दिसते. शिष्याचा माया मोह अहंकार दूर करून त्याचे चित्त ईश्वराच्या स्वरूपात स्थिर करणे, त्याचे मन कामिनी, कांचन आणि कीर्ती यापासून अलिप्त ठेऊन ईश्वरचरणी लावणे हि महत्वाची कार्ये खरा सद्गुरू निरपेक्ष भावनेने करीत असतो. शिष्याची साधनेची बैठक पक्की झाली, चित्त पुरेसे शुद्ध झाले, सद्गुरू भेटीची तळमळ लागली कि सद्गुरू त्याचा शोध घेत येतातच. खऱ्या सद्गुरूंची भेट हि भाग्यताच असावी लागते. पण ह्यामुळे विचलित होण्याचे कारण नाही. आपली भाग्याची वेळ आली कि खरा सद्गुरू भेटणार ! कोणाच्या रूपात, कसा केव्हा हे सांगता येणार नाही. सद्गुरुंच्या शोधात हिंडायची काहीच गरज नाही. आपण आपलं साधन करत राहावं. गुळाची ढेप जिथे असते तिथे मुंगळे आपोआप येतात. आपण सत्शिष्य होणं गरजेचं. वृक्षाच्या पायथ्याशी बसले कि सावली आपोआप मिळतेच. सद्गुरुंकडे काही मागावं लागतं नाही. तिथे न मागताच मिळते. त्यांना सर्व समजते. पण त्यांचे उपायच वेगळे. नुसत्या बघण्याने, साध्या स्पर्शाने, पाठीवरून हाथ फ़िरवण्याने ते आपल्याला आधाराची जाणीव करून देतात. कोणीतरी आपल्याला आहे अशी धारणा होते. मनाचा भार हलका होतो. उद्विग्नता संपते आणि आपण कोणाशीतरी जोडले जातो. आपली वाटचाल सुरू होते तोच भक्ती मार्ग. भगवंताच्या प्रेमाची पणती मनात सतत तेवत ठेवली कि झालं. मी त्याचा आहे आणि तो माझा बस. मग विचारांची धार बोथट होते. मानाची अवस्था उन्मनी होते. एका भगवंताच्या प्रेमाशिवाय आणखी काही नको असे वाटते. भक्तीमार्गात विरह यातना असतात. पण भगवंताच्या स्मरणात कायम राहील कि देवालाच ते बघवत नाही आणि तुमच्या साधनात मदत करण्यासाठी तो सद्गुरुंना पाठवतो. म्हणूनच ह्या सद्गुरूंना नमन करण्यासाठी किती समर्पक अशा श्लोकांची योजना केलेली आहे. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा, सत्चित परब्रह्माचे ज्ञान रुपी अंजन डोळ्यात घालून नवी दृष्टी देणाऱ्या सद्गुरुंना नमस्कार असो.
अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया। चक्षुरुन्मीलित येन तस्मै श्री गुरवे नमः॥
आनंद हे सद्गुरुंचे मुख्य लक्षण आहे. त्यांच्या जीवनात असंतोष, उदासीनता, विक्षेप यांना मुळीच स्थान नसते. सद्गुरू हे कर्मे करूनही अकर्त्याच्या भूमिकेत असतात. ते निर्भय असतात. स्व स्वरूपात स्थित असतात. आत्मानंदात निमग्न असतात. ती जिथे पाहतील तिथे त्यांना सर्व परमात्म स्वरूपाचं दिसते. शिष्याचा माया मोह अहंकार दूर करून त्याचे चित्त ईश्वराच्या स्वरूपात स्थिर करणे, त्याचे मन कामिनी, कांचन आणि कीर्ती यापासून अलिप्त ठेऊन ईश्वरचरणी लावणे हि महत्वाची कार्ये खरा सद्गुरू निरपेक्ष भावनेने करीत असतो. शिष्याची साधनेची बैठक पक्की झाली, चित्त पुरेसे शुद्ध झाले, सद्गुरू भेटीची तळमळ लागली कि सद्गुरू त्याचा शोध घेत येतातच.
ज्या साधकांना प्रयत्न करूनही सद्गुरू भेटत नाहीत अशांनी काय करावं? प्रथम साधन, साधना म्हणजे काय हे समजून घ्या. श्री सार्थ दासबोध, ज्ञानेश्वरी अथवा तुकाराम गाथा किंवा एकनाथी भागवत अशा ग्रंथाचे वाचन करा. प्राकृत मराठी समजण्यास कठीण असल्यास या ग्रंथांवर अनेक मान्यवरांनी भाष्य केले आहे अशी पुस्तक वाचता येतील. उदा. प. पु. गोंदवलेकर महाराजांचे अंतरंग शिष्य कै. पु. बाबा बेलसरे लिखित पुस्तके वाचता येतील. तसेच श्री ज्ञानेश्वर, श्री नृसिंहसरस्वती, श्री अक्कलकोट स्वामी महाराज, गजानन महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, साहिरडीचे साई बाबा किंवा धनकवडीचे शंकर महाराज ह्यांच्या सारख्या हयात नसलेल्या विभूतींनाच मनाने सद्गुरू मानावे. व आपल्याला मार्गदर्शन करण्याबद्दल त्यांना प्रार्थना करावी. प्रार्थनेत शक्ती असतेच. तळमळीने केलेली प्रार्थना वाया कशी जाईल? प्रस्तुत लेखकाचा असा अनुभव आहे कि अशा विभूतींकडून साधकाच्या नकळत त्याला मार्गदर्शन होऊ लागेल. साधनेत काही चुका होत असतील तर कोणाच्या तरी मुखातून त्याविषयी खुलासा होतील. एखादे उपयुक्त पुस्तक वाचनात येईल. अशाप्रकारचे आश्चर्य कारक अनुभव प्रस्तुत लेखक सह अनेक साधक मित्रांच्या बाबतीत आलेले आहेत. साधनेच्या प्राथमिक अवस्थेत परस्त्री, परनिंदा आणि परद्रव्य ह्यापासून कटाक्षाने दूर राहणे एवढे पथ्य पळाले म्हन्जे पुरेसे जोडीला अभक्ष्य भक्षण आणि अपेयपान टाळले तर दुधात साखर. शेवटी आपल्या आराध्याला (प्रस्तुत लेखकाच्या बाबतील श्री स्वामी समर्थ महाराज ) शरण जाणे हे महत्वाचे. आपल्या आराध्य दैवताला निवेदन करावे. आपल्यातील दोष, वाईट सवयी ईत्यादी चे निराकरण व्हावे अशी कळकळीची प्रार्थना करावी. तुम्ही ठेवलं तसे राहू हि वृत्ती असावी. कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधन - नामस्मरण करावे. कोल्हापूरचे सद्गुरू, प्रा. मुंगळे ह्यांनी आपल्या एका ग्रंथात म्हटले आहे, कर्म कंदाचे अवडंबर करण्यापेक्षा, गुरूच्या शोधात इतस्ततः भटकण्या पेक्षा, उगाच शेकडो पुस्तक वाचण्यापेक्षा, वेगवेगळ्या देवतांचे पूजन कारण्यापॆक्षा, वेगवेगळे जप करण्यापेक्षा एकच करावे. एकच आराध्य, एकच जप, एकच पोथी, एकच ग्रंथ, आणि एकच माळ असावी. हातात काम आणि मुखात नाम बस. एकदा आपल्या प्रवचनात पु . बाबा तथा के. वि . बेलसरे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते, दूर कुठेतरी जिथे जनसंपर्क नाही अशा ठिकाणी १५ -२० दिवस त्यांना एका खोलीत राहावयास सांगितले तर कोणत्या गोष्टी बरोबर ठेवायला आवडतील? ते म्हणाले, एक डायरी. सद्गुरूंचा फोटो आणि जप माळ बस. आपण काय मागितलं असत? - वाय - फाय, एक मोबाईल आणि बराच काही ... असो.
शेवटी शब्दांचे बुडबुडेच हे, जर त्यांचा अर्थ आपल्या पचनी पडला नाही तर काय उपयोग? . मग काय करता येईल? अगदी थोडक्यात सांगतो. घरात अशी एक जागा पहा जिथे तुम्हाला दीड दोन तास सहज विना व्यत्यय बसता येईल. छानस घोंगड तिथे अंथरा त्याच्यावर दर्भासन ठेवा, (पूजा साहित्य ज्या दुकानात मिळते तिथे ते मिळेल. साधारण ८० ते १०० रुपये किंमत असते) त्यावर सुती किंवा लोकरी जमल्यास रेशमी कापडाची बैठक घाला. झाले तुमाचे आसन तयार. दिवसातून ठराविक वेळी ह्या आसनावर बसून तुम्हाला साधन करायचे आहे. ती जागा हवेशीर असावी. स्वच्छ असावी. पुरेसा उजेड असावा एवढेच. हि झाली पूर्व तयारी. आता स्वच्छ अंघोळ करा. सैलसर कपडे घाला. आसनावर बसा. एखादी सुगंधित उद्बती अथवा धूप लावलेत तर उत्तम. डोळे मिटून आपल्या आराध्य दैवताला प्रार्थना करा - मी साधनेला बसतोय. तुम्ही सांभाळा. हातातल्या जप मालेवर नाम स्मरण चालू होऊ द्या. नाम स्मरणासाठी "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ", "ओम नमः शिवाय", "श्री राम जय राम जय जय राम", ओम गं गणपतये नमः , हरे राम हरे राम, राम राम हरे हरे | हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे | अशा पैकी कुठलाही मंत्र निवडू शकता. आणि महत्वाचे आपला मोबाईल साधन काळात बंद ठेवा. जसे तुम्ही निश्ठेने, अविचलपणे, सातत्याने तुमचे साधन करीत राहाल तसे एक दिवस सद्गुरू भेटीची पाहत तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार हे निःशंशय. शेवटी आपल्या सद्गुरुना समर्पण भावनेने नमन करताना एक श्लोक येथे लिहावासा वाटतो
ध्यान मुलं गुरु: मूर्ती : पूजा मुलं गुरु: पदम | मंत्र मुलं गुरु: वाक्यं | मोक्ष मुलं गुरु: कृपा ||
तेव्हा शुभस्य शीघ्रम
No comments:
Post a Comment