Sunday, September 16, 2018

ज्योतिष कथा : "आता कसं वाटतंय दिवेकरजी?"

१३ तारखेची दुपारची वेळ होती. घरोघरी बाप्पाचे आगमन झालं होतच. कुठलीही अपॉइंटमेंट दिलेली नसल्याने निवांत होतो. गायक लोक जसे रियाज करतात तसाच माझाही ज्योतिष शास्त्राचा रियाझ चालू होता. हे म्हणजे विविध मान्यवर ज्योतिषांचे लेख वाचणे. नियतकालिक वाचणे. टिपणं काढणे. स्वतः सोडविलेल्या कुंडलीचे पुन्हा पुन्हा विश्लेषण करणे. वगैरे. संध्याकाळचे ५ कधी वाजले कळलंच नाही. मंडळी पण कन्यारत्नासकट देव दर्शनाला गेल्या होत्या. काय भाऊ हौस असते! जाऊदे आजच्या लेखाचा हा विषय नव्हे.तर काय म्हणत होतो महाराजा, जवळच पडलेलं स्मार्ट फोन नामक यंत्र गुरगुरलं. कारण मी त्याला सायलेन्टवर ठेवला होता. एक परिचित नंबर फ्लॅश होत होता. मी म्हटलं आता कशी काय आठवण आली? फोनवर आपले एक जातक श्री दिवेकर (नाव अर्थातच बदललेले आहे) होते. एका सुपर मार्केटचे मालक. साधारण महिन्याभरापूर्वी त्यांनी मला संपर्क केला होता. व्यवसायात जबर आर्थिक फटका बसलेला. डोक्यावर कर्ज वाढलेलं. ऑपरेटिंग कॉस्ट सुद्धा निघत नव्हती. त्यात तब्येतही साथ देत नव्हती. त्यावेळी मी त्यांना काही उपाय दिल्याचं मला आठवलं. त्यांचा फोन पाहताच मी मनोमन सुखावलो म्हटलं वा! उपाय फळलेले दिसतायत! दुसऱ्याच क्षणी दुसरा विचार मनात आला, सबूर! आज स्वाती नक्षत्र होतं, म्हणजे स्वामी राहू. मनात शंकेची पाल चुकचुकली. मी फोन घेतला. आवाजात शक्य तितका उत्साह आणत मी म्हटलं "नमस्कार दिवेकरजी, कैसे याद किया?" त्यांनी फक्त हॅलो म्हटलं. काही सेकंद काहीच बोलणं नाही. मी समजून चुकलो, दाल में काला है | मी पुन्हा माझा मावळत चाललेला उत्साह गोळा करत म्हणालो, "बोला दिवेकरजी कसे आहात? "
"जरा ऑफिसला येता?"
मी मनात म्हटलं प्यासा कुवेके पास जात है, या कुवा प्यासे के पास? काय करणार देहबुद्धी म्हटल्यावर भल्या भल्यांचा अहंकार नकोत्या वेळी फणा वर काढतो. पण दुसऱ्याच क्षणी मी मनात माझीच निर्भत्सना केली. त्यांचा आवाज जडावलेला होता. I strongly felt, he must be in deep trouble. मी पण गंभीर टोनवर गेलो.
"काय हो काय झालं?"
"ऑफिसला या ना प्लिज, सांगतो."
त्यांनी आर्जव केलं. मी नाही म्हणू शकलो नाही.
"तुमचा लॅपटॉप घेऊन या".
म्हणजे त्यांना कंसल्टेशन हवं होते तर. माझ्या मनात राहू पिंगा घालत होता. स्वाती नक्षत्र !
पुढच्या २० मिनिटात मी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या समोर बसलो होतो.
दिवेकर आपल्या खुर्चीत किंचित रेलून बसलेले. चेहरा अर्थातच चिंता ग्रस्त होता. केस पूर्ण पणे विस्कटलेले. डोळ्यात कुठलीतरी वेदना घर करून राहिलेली. त्या केबिनमधलं वातावरण तणावपूर्ण होतं. मला पाहिल्याबरोबर क्षणात त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलेलं,त्यांनी स्वतःला सावरलं. अत्यंत खोल आवाजात ते म्हणाले, "थँक्स फॉर कमिंग". 
मी शांत आवाजात त्यांच्याशी संवाद साधला, "काय म्हणताय?"
"मला आत्महत्या करावीशी वाटतेय".
खुर्चीचे हात मी घट्ट आवळले. काय बोलावं मला सुचेचना.
"त्याने सर्व मनासारखं होईल?" , मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.
"काय करू?, काहीच सुचत नाही. बस्स संपवावं हे सगळं !"
नैराश्य जे काही म्हणतात त्याच मूर्तिमंत उदाहरण माझ्यासमोर होतं.
तेवढ्यातच मी माझा लॅपटॉप ऑन केला होता, समोर त्यांची कुंडली होती.
"तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येणं ऑब्व्हियस आहे, दिवेकर!"
त्यांनी मान वर करून माझ्याकडे पाहिलं.
"सध्या मंगळ महादशेत शुक्राची अंतर्दशा आणि राहूची विदशा आहे."
"मूळ जन्म कुंडलीत राहू भाग्य स्थान तुला राशीत हर्षल बरोबर."
"राहूच्या विदशेत असा त्रास होणारच, २८ सप्टेंबर नंतर परिस्थिती निश्चितच निवळेल."
दशा स्वामी आणि विदशा स्वामी दुरूनही अष्टम आणि व्यय स्थानाचे कार्येश होतं नव्हते.
"तुम्ही कितीही विचार केलात तरी, तुमच्याहातून हे पाप घडणार नाही! चिंता नॉट."
त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले.
"दिवेकर, आपल्या बऱ्या वाईट कर्माचे भोग असतात. ते भोगुनच संपवावे लागतात."
"आत्महत्या करून आपल्याला वाटत, आपली सुटका होईल. पण मृत्यूनंतर हि जीवन आहे."
"गरुड पुराणात तसे स्पष्ट उल्लेख आहेत."
"आत्महत्या केलेला आत्मा , जीव हजारो वर्षे खितपत पडतो."
"अनंत यातना भोगाव्या लागतात."
"राहिलेले भोग पुढच्या जन्मात पुन्हा भोगावेच लागतात."
"मी तुम्हाला दिलेले उपाय करा. उपासनाच तारील."
"शनी मार्गी झालाच आहे, काहीतरी मार्ग निघेल पुढील १०-१२ दिवसात".
माझ्यापरीने मी त्यांना आश्वस्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परिणाम अगदी दुसऱ्याच क्षणी जाणवला."
"उपासना, ती तर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोज करतो. रोज जप करतो."
"अहो, तसे नाही. दिवसभरातला खास १५-२० मिनिटे वेळ त्यासाठी देणं गरजेचं".
"आपल्या उपास्य दैवतांशी संवाद साधायचा, जे माझ्याजवळ बोललात ते त्याच्या जवळ बोलायचं."
"कळवळून प्रार्थना करायची, आईही रडल्याशिवाय लेकराला दूध देत नाही. रडायचं!"
"निवेदन भक्ती म्हणतात त्याला"
माझ्या जीवनातले काही प्रसंग त्यांना मी सांगितले. अर्ध्या तासापूर्वीचे दिवेकर आणि आताचे दिवेकर यात जमीन अस्मानाचा फरक होता. तणाव आता निवळला होता. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थांची देवी स्वरूपातली उपासना करण्यासंबंधी सल्ला मी त्यांना गेल्यावेळी दिला होता. तसेच राहूचे व शुक्राचे दान करण्याविषयी सूचना केली होती. अर्थातच यापैकी त्यांनी काहीही केले नव्हते. डॉ. ने दिलेली औषध तुम्ही घेतलीच नाहीत तर बरे व्हाल का? तोच नियम इथेही लागू होते. ज्योतिर्विद ज्या सूचना करतो त्या जातकांनी तंतोतंत पाळल्या पाहिजेत तरच फायदा होईल. पण तसे जर केलेच नाही तर कर्म भोगांची तीव्रता कमी न होता ते भोगावे लागतातच. असो,
"तुम्ही हात पाहता का? "
दिवेकरांनी मला पुढचा प्रश्न विचारला.
"नाही हो, म्हणजे तसं कधी गरजेचं नाही वाटलं."
"तुम्हाला हात दाखवायचा आहे का"?
"पण तुम्हीतर म्हणालात ना कि तुम्ही पाहत नाही, मग कसे काय? जाऊद्या!"
माझ्या मनात माझे स्नेही हेमंतजी रणनवरे यांचा विचार आला. समोर बसलेल्या जातकाचे संपूर्ण समाधान करणे महत्वाचे त्यात आत्महत्येसारख्या विचारापासून नुकतेच परावृत्त झालेले. मी त्वरित त्यांना म्हटले. "मी हात पाहत नाही, हस्त सामुद्रिक शास्त्राचा माझा अभ्यास नाही, पण माझे एक स्नेही आहेत नाशिकला राहतात त्यांना तुमचा हात दाखवता येईल."
"नाशिकला जायचे म्हणता कि काय?"
"अहो, त्यासाठी नाशिकला जायची काहीही आवश्यकता नाही. तुम्ही फक्त बोला. दाखवायचा आहे का हात?"
इच्छापूर्ती होतेय म्हटल्यावर, दिवेकर त्वरित हो म्हणाले.
तोपर्यंत मी हेमंतजीना फोन लावलाच होता. जातकाची पूर्ण कल्पना दिली आणि हेमंतजी त्यांचा हात पाहायला त्वरित तयार झाले. दिवेकरजींच्या दोन्ही हाताच्या तळव्यांचे स्पष्ट फोटो कडून हेमंतजीना whatsup केले. पुढच्या १० मिनिटात हेमंतजींचा फोन आला. दोन्ही हातांचे विश्लेषण करून हेमंतजी म्हणाले, "हा माणूस काही आत्महत्या करणार नाही. शनी उंचवटा रवीकडे आणि रवी उंचवटा शनीकडे झुकला आहे. लाईफलाईन ला सपोर्ट लाईन हि दिसते आहे. साधारण दीर्घायुष्य आहे. चंद्र उंचवट्यावर अशुभ चिन्ह असल्यामुळे मानसिक त्रास करून घेतला आहे. ह्या अगोदर बरेचदा आत्महत्येचे विचार आले आहेत. मंगळाचे मैदान सुस्पष्ट असून चांगला महत्वाकांक्षी माणूस असतो. मित्र नुकसान करतात. रवी, शुक्र आणि गुरु बिघडले आहेत. यांनी देवी उपासना करावी व माणिक रत्ना धारण करावे. वैवाहिक सौख्य आणि संतती सौख्य नाही. काही गंभीर आजार दिसतो पण त्यावरही मात करतील. आणखी बरेचसे हेमंतजी बोलले. मी मात्र मनात म्हणत होतॊ, कुंडली तर आपल्याला सर्वकाही दाखवते. कुंडलीतले १२ भाव, १२ राशी, नक्षत्र, योग सर्व क्लिअर करतात. दिवेकर विवाहित असूनही पत्नीच्या नोकरीमुळे पत्नीपासून विभक्त राहत होते. काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना अपत्य नव्हते. किडनीच्या विकाराने ग्रस्त होते. ह्या सर्व गोष्टी कुंडलीने दाखवल्या होत्याच पण हे सर्व हातातही स्पष्ट दिसते! शिवाय माझा आणि हेमंतजींचा फलादेशात इतकं साम्य! मी अचंबित होतॊ. हेमंतजींची हस्त सामुद्रिक शास्त्रावरची पकड आणि त्यांचा फलादेश केवळ अचूक. दिवेकरांना मी देवी उपासना कशी काय सांगितली? भाग्येश शुक्र लग्नात. भाग्यात राहू हर्षल तूळेचा. चंद्र धनु राशीत लाभात. - भगवान श्री स्वामी समर्थांची देवी स्वरूपात उपासना करावी! हेमंतजी हि तेच म्हणतात. माझ्या समोर दिवेकर आता खुर्चीत आणखी रिलॅक्स बसले होते. खुर्चीच्या मागे भिंतीवर देव्हारा होता. त्या देव्हाऱ्यात स्वामींचा देवीस्वरूपातला फोटो होता. तुपाचा दिवा मंद तेवत होता. उदबत्तीचा दरवळ वातावरण सुगंधित करीत होता. दिवेकरचा हात हळुवार दाबत मी त्यांना विचारले, "आता कसं वाटतंय दिवेकरजी?"



No comments:

Post a Comment