Saturday, November 25, 2017

अध्यात्म: सद्गुरूंच्या शोधात...

सद्गुरूंच्या शोधात..


जीवनात गुरुचे महत्व अनन्य साधारण आहे ह्याबद्दल खचितच कोणाचे दुमत नसेल. जन्माला आल्या पासून आयुष्यभर सतत आपण काही ना काहीतरी शिकतच असतो. म्हणूनच आयुष्य हि एक शाळाच आहे असे कुणीतरी म्हटले असावे. आयुष्याच्या ह्या शाळेत प्रत्येक वळणावर, प्रत्येक बाबतीत आपल्याला गुरुची आवश्यकता भासते. अगदी आई वडिलांपासून ते आपल्या शिक्षकांपर्यंत  सर्व आपले गुरूच. अगदी काही अनाहूत लोक किंवा मित्र सुद्धा आपल्या असयुष्यात गुरुची भूमिका निभावतात. पण आत्ता आपला विषय वेगळा आहे, आयुष्यात गुरुची तर नितांत आवश्यकता असतेच. कुठल्याही क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी, कौशल्य संपादन करण्यासाठी, खाचा खोचा जाणून घेण्यासाठी, यश मिळवण्यासाठी आपली अवस्था गुरुविण सापडेना सोया अशीच होत असते.
आयुष्याच्या एका वळणावर आपण असे म्हणू शकतो कि आता आपण बरेच काही मिळवले. किंबहुना हे बरेच काही मिळवण्यातच आपली मार्ग क्रमणा चालू असते. जन्म, शिक्षण, उच्च शिक्षण, नोकरी - व्यवसाय, विवाह, घर - खरेदी, वाहन - खरेदी, संतती, बँक बॅलन्स, संततीचे शिक्षण, संततीचे विवाह वगैरे पठडीतल्या गोष्टी मिळवण्यातच आपली हयात जाते. आपण आपली आणि आपल्या पुढच्या पिढीची सोय लावण्यातच गर्क असतो, त्यात काही गैर नाही. म्हातारपण सुव्यवस्थित असावं म्हणून आपण व्यवस्था करतोच. त्यासाठी जास्तीचा पेन्शन प्लॅन हि आपण घेतलेला असतो. शिवाय एखाद्या गंभीर आजारपण अथवा अपघात वगैरे सारख्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सुद्धा आपण तत्पर असतो करत एखादी मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली असते. जग रहाटीप्रमाणे विविध उत्सव आपण साजरे करतोच. आपण तसे थोडे, किंवा कामापुरते देव भोळे, पापभिरू, धार्मिक सुद्धा असतो. आणि जप जाप्य, मंत्र पठाण, ग्रंथ वाचन ह्या गोष्टी आपण खास राखून ठेवलेल्या असतात रिटायर झाल्यानंतर करण्यासाठी. पण रिटायर झाल्या नंतर सुद्धा आपला बराचसा वेळ कुठल्याशा क्लब मध्ये पत्ते कुटण्यात जातो, एखाद्या सामाजिक संस्थेत लुडबुड करण्यात जातो, मॉर्निंग वॉकच्या नावाखाली एकत्र येऊन गॉसिप करण्यात जातो, क्रिकेट - राजकारण सारख्या विषयात आपल्याला काहीही गम्य नसताना निरर्थक गप्पा मारण्यात जातो, नाहीतर मक्याचा मुलगा आणि तमक्याची मुलगी वगैरे वगैरे. हि सर्व असते देह बुद्धी. देहाच्या माध्यमातून लौकिक आयुष्य जगताना ह्या सर्व गोष्टी आपण तन्मयतेने आणि समरसून करत असतो आणि ह्यालाच आपण म्हणतो - प्रपंच.
कोणालातरी हा मांडलेला डाव अर्ध्यातच मोडून जावं लागतं, ध्यानी - मनी नसताना. अनेक वेळा अपमान, अवहेलना, उपेक्षा वाट्याला येते. हात लावला तिथे माती व्हावी अशी अवस्था होते. दुर्धर आजारपण किंवा पराकोटीचे दारिद्र्य, एखाद्या वेळेस कर्ज - बाजारीपणा, संततीचे अकाली निधन किंवा वाईट संगत, मार्गाला लागणे वगैरे प्रसंग हि घडतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा षड्रिपूंच्या आहारी जात जीवन जगणे चालूच असते. इच्छांना अंत नसतो. हवे हवे आणि हवे बस .. हीच आयुष्याची इतिश्री. ह्या सर्व जंजाळात आपण इतके गुंतत जातो कि वासनेच्या, इच्छेच्या प्रभावामुळे आपण कर्म बंधनात अडकतो आणि  हेच आपल्या पुनर्जन्माचे कारण बनते. जेव्हा आपल्याला हे समजते तेव्हा वेळ निघून गेलेली असते  किंवा असू शकते म्हणून जो कर्म - चांगली वाईट आपण आयुष्यभर केली का तर आपले आयुष्य इथे ह्या पृथ्वी लोकात सुखकर व्हावं. सर्व बेगमी आपण केली. बँक बॅलन्स जमवला पण परलोकात गेल्यानंतरची सोय आपण केली आहे का? हा मुख्य प्रश्न आहे. संतांनी म्हटले आहे मरणानंतरही जीवन असते. लौकिक आयुष्यात एवढे मिळवले तरीही मन शांत, मोकळं नाही. आणखी एका अशा वळणावर हे सर्व किती नश्वर आहे ह्याची जीवाला जाणीव होते.  इच्छांना किती फलद्रुप करण्याकरिता झटले तरी त्या शमत नाहीत.


न जातु काम: कामानाम उपभोगेन शाम्यति | हविमा कृष्णवर्तमेव भूय: एवं  अभिवर्तते ||


आयुष्याच्या नश्वरतेकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन विकसित होण्याचा हा तो क्षण जेव्हा जिवाच्या ठिकाणी वैराग्याचा उदय होतो. अनुदिनी अनुतापें तापलो रामराया असं म्हणायची वेळ येते. प्रपंचाच्या चिखलातून बाहेर पडण्याची धडपड सुरु होते. त्रिविध तापे पोळला तोचि अधिकारी झाला परमार्थाचा असे होते.मी कोण आहे? माझे स्वरूप काय आहे? माझा जन्म का आहे? विश्वाचा ह्या पसाऱ्यात माझे स्थान काय? मोक्ष काय आहे? अशा अनेक प्रश्नांचे भुंगे मन पोखरू लागतात. परमार्थ साधण्याकडे जीवाचा कल वाढतो. जप जाप्य, विविध साधना, आत्मा क्लेश, उपास तपास , व्रत वैकल्य, तीर्थ यात्रा, ग्रंथ वाचन वगैरे गोष्टींचा अंगीकार केला जातो पण कालांतराने लक्षात येते आपण होतो तिथेच आहोत. तथाकथित दादा, बाबा, बापू, बुवा वगैरे लोकांच्या कच्छपी लागून नुकसान सुद्धा करून घेतलेलं असू शकत. मी साधन करतो, मी नाम स्मरण करतो, हा सात्विक असला तरी अहंकारच. साधनेच्या वाटेवर सर्वात १ नंबरचा शत्रू. अशा या आर्त, मुमुक्षु, साधकाला मार्गदर्शन करण्यासाठी, जिवाशिवाची भेट घडवून देण्यासाठी, साधकाच्या जिवंतपणी आणि त्याच्या मरणानंतरही जन्मो जन्मी त्याची आणि त्याच्या साधनेचा परिपोषाची जबाबदारी वाहण्यासाठी नियतीने एक विशिष्ट योजना केलेली असते ती म्हणजे - सद्गुरू.


सद्गुरूंची भेट व्हावी असं वाटतं, नव्हे तशी तळमळ लागते. पण इथेच खरी मेख आहे, मनाच्या अशा अवस्थेत फसगत होण्याची शक्यता अधिक असते कारण गुरु आणि सद्गुरू ह्यात फरक आहे. समाजामध्ये आज अनेक दादा, बाबा, बापू, अण्णा, श्री श्री वगैरेंचे पेव फुटले आहे, ह्यात प्रस्तुत लेखकाचा कोणाला दुखावण्याचा मानस नाही, पण हि वस्तुस्थिती आहे. रोजच्या वर्तमान पत्रातून अशा स्वरूपाच्या बातम्या वाचायला मिळतात, एका भोंदू बाबाने पूजेच्या बावाखाली ३-३.५ लाख घेऊन पोबारा केला वगैरे. सद्गुरुंच्या शोधात जाण्याची मुळीच गरज नाही असे पुन्हा एकदा येथे लिहितो, तरीही साधना मार्गात श्रद्धा असण्याबरोबच सतर्क राहणं हि आवश्यक आहे. नाहीतर तथाकथित स्वयं घोषित गुरूंच्या नाडी लागून संकटात संपण्याची वेळ येऊ शकते. म्हणून शास्त्रकाराने म्हटले आहे


तस्माद् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तयमम्। शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मपरे च समाश्रयम्॥


अर्थात, अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी साधनारत असणाऱ्या साधकाला अशा योग्य गुरूंच्या सन्निध राहायला हवे जे अध्यात्म शास्त्रात निष्णात असून आत्मानंदात निमग्न असतात. च्यामुले ज्ञान मिळते. दुःख हलके होते. आंतरिक समाधान लाभते. खरा सद्गुरू हा कधीच चमत्कार करत नाही. तो कधीच शिष्याकडून धनाची, मानाची अपेक्षा करत नाही, तो स्वयं सिद्ध असतो. त्याच्या सान्निध्यात शिष्याला आंतरिक समाधान आणि शांती लाभते, आत्यंतिक करुणा, दया, शांती, ममता, वात्सल्य आणि सर्वाभूती समत्व त्यांच्या मनात वसंत असते. आनंद हे सद्गुरुंचे मुख्य लक्षण आहे. त्यांच्या जीवनात असंतोष, उदासीनता, विक्षेप यांना मुळीच स्थान नसते. सद्गुरू हे कर्मे करूनही अकर्त्याच्या भूमिकेत असतात.  ते निर्भय असतात. स्व स्वरूपात स्थित असतात. आत्मानंदात निमग्न असतात. ती जिथे पाहतील तिथे त्यांना सर्व परमात्म स्वरूपाचं दिसते. शिष्याचा माया मोह अहंकार दूर करून त्याचे चित्त ईश्वराच्या स्वरूपात स्थिर करणे, त्याचे मन कामिनी, कांचन आणि कीर्ती यापासून अलिप्त ठेऊन ईश्वरचरणी लावणे हि महत्वाची कार्ये खरा सद्गुरू निरपेक्ष भावनेने करीत असतो. शिष्याची साधनेची बैठक पक्की झाली, चित्त पुरेसे शुद्ध झाले, सद्गुरू भेटीची तळमळ लागली कि सद्गुरू त्याचा शोध घेत येतातच. खऱ्या सद्गुरूंची भेट हि भाग्यताच असावी लागते. पण ह्यामुळे विचलित होण्याचे कारण नाही. आपली भाग्याची वेळ आली कि खरा सद्गुरू भेटणार ! कोणाच्या रूपात, कसा केव्हा हे सांगता येणार नाही. सद्गुरुंच्या शोधात हिंडायची काहीच गरज नाही. आपण आपलं साधन करत राहावं. गुळाची ढेप जिथे असते तिथे मुंगळे आपोआप येतात. आपण सत्शिष्य होणं गरजेचं. वृक्षाच्या पायथ्याशी बसले कि सावली आपोआप मिळतेच. सद्गुरुंकडे काही मागावं लागतं नाही. तिथे न मागताच मिळते. त्यांना सर्व समजते. पण त्यांचे उपायच वेगळे. नुसत्या बघण्याने, साध्या स्पर्शाने, पाठीवरून हाथ फ़िरवण्याने ते आपल्याला आधाराची जाणीव करून देतात. कोणीतरी आपल्याला आहे अशी धारणा होते. मनाचा भार हलका होतो. उद्विग्नता संपते आणि आपण कोणाशीतरी जोडले जातो. आपली वाटचाल सुरू होते तोच भक्ती मार्ग. भगवंताच्या प्रेमाची पणती मनात सतत तेवत ठेवली कि झालं. मी त्याचा आहे आणि तो माझा बस. मग विचारांची धार बोथट होते. मानाची अवस्था उन्मनी होते. एका भगवंताच्या प्रेमाशिवाय आणखी काही नको असे वाटते. भक्तीमार्गात विरह यातना असतात. पण भगवंताच्या स्मरणात कायम राहील कि देवालाच ते बघवत नाही आणि तुमच्या साधनात मदत करण्यासाठी तो सद्गुरुंना पाठवतो. म्हणूनच ह्या सद्गुरूंना नमन करण्यासाठी किती समर्पक अशा श्लोकांची योजना केलेली आहे. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा, सत्चित परब्रह्माचे ज्ञान रुपी अंजन डोळ्यात घालून नवी दृष्टी देणाऱ्या सद्गुरुंना नमस्कार असो.  


अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया। चक्षुरुन्मीलित येन तस्मै श्री गुरवे नमः॥

आनंद हे सद्गुरुंचे मुख्य लक्षण आहे. त्यांच्या जीवनात असंतोष, उदासीनता, विक्षेप यांना मुळीच स्थान नसते. सद्गुरू हे कर्मे करूनही अकर्त्याच्या भूमिकेत असतात.  ते निर्भय असतात. स्व स्वरूपात स्थित असतात. आत्मानंदात निमग्न असतात. ती जिथे पाहतील तिथे त्यांना सर्व परमात्म स्वरूपाचं दिसते. शिष्याचा माया मोह अहंकार दूर करून त्याचे चित्त ईश्वराच्या स्वरूपात स्थिर करणे, त्याचे मन कामिनी, कांचन आणि कीर्ती यापासून अलिप्त ठेऊन ईश्वरचरणी लावणे हि महत्वाची कार्ये खरा सद्गुरू निरपेक्ष भावनेने करीत असतो. शिष्याची साधनेची बैठक पक्की झाली, चित्त पुरेसे शुद्ध झाले, सद्गुरू भेटीची तळमळ लागली कि सद्गुरू त्याचा शोध घेत येतातच.
ज्या साधकांना प्रयत्न करूनही सद्गुरू भेटत नाहीत अशांनी काय करावं? प्रथम साधन, साधना म्हणजे काय हे समजून घ्या. श्री सार्थ दासबोध, ज्ञानेश्वरी अथवा तुकाराम गाथा किंवा एकनाथी भागवत अशा ग्रंथाचे वाचन करा. प्राकृत मराठी समजण्यास कठीण असल्यास या ग्रंथांवर अनेक मान्यवरांनी भाष्य केले आहे अशी पुस्तक वाचता येतील. उदा. प. पु. गोंदवलेकर महाराजांचे अंतरंग शिष्य कै. पु. बाबा बेलसरे लिखित पुस्तके वाचता येतील. तसेच श्री ज्ञानेश्वर, श्री नृसिंहसरस्वती, श्री अक्कलकोट स्वामी महाराज, गजानन महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, साहिरडीचे साई बाबा किंवा धनकवडीचे  शंकर महाराज ह्यांच्या सारख्या हयात नसलेल्या विभूतींनाच मनाने सद्गुरू मानावे. व आपल्याला मार्गदर्शन करण्याबद्दल त्यांना प्रार्थना करावी. प्रार्थनेत शक्ती असतेच. तळमळीने केलेली प्रार्थना वाया कशी जाईल? प्रस्तुत लेखकाचा असा अनुभव आहे कि अशा विभूतींकडून साधकाच्या नकळत त्याला मार्गदर्शन होऊ लागेल. साधनेत काही चुका होत असतील तर कोणाच्या तरी मुखातून त्याविषयी खुलासा होतील. एखादे उपयुक्त पुस्तक वाचनात येईल. अशाप्रकारचे आश्चर्य कारक अनुभव प्रस्तुत लेखक सह अनेक साधक मित्रांच्या बाबतीत आलेले आहेत. साधनेच्या प्राथमिक अवस्थेत परस्त्री, परनिंदा आणि परद्रव्य ह्यापासून कटाक्षाने  दूर राहणे एवढे पथ्य पळाले म्हन्जे पुरेसे जोडीला अभक्ष्य भक्षण आणि अपेयपान टाळले तर दुधात साखर. शेवटी आपल्या आराध्याला (प्रस्तुत लेखकाच्या बाबतील श्री स्वामी समर्थ महाराज ) शरण जाणे हे महत्वाचे. आपल्या आराध्य दैवताला निवेदन करावे. आपल्यातील दोष, वाईट सवयी ईत्यादी चे निराकरण व्हावे अशी कळकळीची प्रार्थना करावी. तुम्ही ठेवलं तसे राहू हि वृत्ती असावी. कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधन - नामस्मरण करावे. कोल्हापूरचे सद्गुरू, प्रा. मुंगळे  ह्यांनी आपल्या एका ग्रंथात म्हटले आहे, कर्म कंदाचे अवडंबर करण्यापेक्षा, गुरूच्या शोधात इतस्ततः भटकण्या पेक्षा, उगाच शेकडो पुस्तक वाचण्यापेक्षा, वेगवेगळ्या देवतांचे पूजन कारण्यापॆक्षा, वेगवेगळे जप करण्यापेक्षा एकच करावे. एकच आराध्य, एकच जप, एकच पोथी, एकच ग्रंथ, आणि एकच  माळ असावी. हातात काम आणि मुखात नाम बस. एकदा आपल्या प्रवचनात पु . बाबा तथा के. वि . बेलसरे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते,  दूर कुठेतरी जिथे जनसंपर्क नाही अशा ठिकाणी १५ -२० दिवस त्यांना एका खोलीत राहावयास सांगितले तर कोणत्या गोष्टी बरोबर ठेवायला आवडतील? ते म्हणाले, एक डायरी. सद्गुरूंचा  फोटो आणि जप माळ बस.  आपण काय मागितलं असत? - वाय - फाय, एक मोबाईल आणि बराच काही ... असो.
शेवटी शब्दांचे बुडबुडेच हे, जर त्यांचा अर्थ आपल्या पचनी पडला नाही तर काय  उपयोग? . मग काय  करता येईल? अगदी थोडक्यात सांगतो. घरात अशी एक जागा पहा जिथे तुम्हाला दीड दोन तास सहज विना व्यत्यय बसता येईल. छानस घोंगड तिथे अंथरा त्याच्यावर दर्भासन ठेवा, (पूजा साहित्य ज्या दुकानात मिळते तिथे ते मिळेल. साधारण ८० ते १०० रुपये किंमत असते) त्यावर सुती किंवा लोकरी जमल्यास रेशमी कापडाची बैठक घाला. झाले तुमाचे आसन  तयार. दिवसातून ठराविक वेळी ह्या आसनावर बसून  तुम्हाला साधन करायचे आहे. ती जागा  हवेशीर असावी. स्वच्छ असावी. पुरेसा उजेड असावा एवढेच. हि झाली पूर्व तयारी. आता स्वच्छ अंघोळ करा. सैलसर कपडे घाला. आसनावर बसा. एखादी सुगंधित उद्बती अथवा धूप लावलेत तर उत्तम. डोळे मिटून आपल्या आराध्य दैवताला प्रार्थना करा - मी साधनेला बसतोय. तुम्ही सांभाळा. हातातल्या जप मालेवर नाम स्मरण चालू होऊ द्या. नाम स्मरणासाठी "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ", "ओम नमः शिवाय", "श्री राम जय राम जय जय राम", ओम गं गणपतये नमः , हरे राम हरे राम, राम राम हरे हरे | हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे | अशा पैकी कुठलाही मंत्र निवडू शकता. आणि महत्वाचे आपला मोबाईल साधन काळात बंद ठेवा. जसे तुम्ही निश्ठेने, अविचलपणे, सातत्याने तुमचे साधन करीत राहाल तसे एक दिवस सद्गुरू भेटीची पाहत तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार हे निःशंशय. शेवटी आपल्या सद्गुरुना समर्पण भावनेने नमन करताना एक श्लोक येथे लिहावासा वाटतो

ध्यान मुलं गुरु: मूर्ती : पूजा मुलं गुरु: पदम | मंत्र मुलं गुरु: वाक्यं | मोक्ष मुलं गुरु: कृपा ||

तेव्हा शुभस्य शीघ्रम

मृत्यू सर्वांग सोहळा

कविवर्य बा. भ. बोरकर यांची रचना. पं. जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं आणि संगीत बद्ध केलेलं गाणे ऐकण्याचा योग आला.

नाही पुण्याची मोजणी |  नाही पापाची बोचणी | जिणे गंगौघाचे पाणी| ....

साधकाच्या दृष्टीने मृत्यूला सामोरं कसं जायचं ह्याच सुंदर विवेचन कविवर्यांनी केल आहे. साधकाच्या दृष्टीने ह्या साठी म्हटले कारण साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यावर साधकाच्या मनात मृत्यूच चिंतन सुरु होत. जीव कासावीस होतो. व्याकूळ होतो. ज्या शरीराच्या योगाने आयुष्यभर साधना केली. नामस्मरण केल. सद्गुरूंची काय वाचा मने पूजा केली. त्या ईश्वराची भक्ती केली ते शरिर सूटलं तर पुढे काय? विठ्ठलाच्या ओढीने तुकोबांनी मोक्ष हि टाळला म्हणूनच त्यांना म्हणावेसे वाटले..... न लगे मुक्ती | धनसंपदा, संत संग देई सदा | तुका म्हणे गर्भवासी | सुखे घालावे आम्हासी || देवा विठ्ठला तुझी भक्ती करण्याकरिता मला वारवार जन्म घेउदे. तरी शेवटी काय? आम्ही जातो आमुच्या गावा | आमुचा राम राम घ्यावा||  मृत्यू हे जिवनाच अटळ सत्य. न चुकवता येणार. जो जन्माला आला आहे तो एक दिवस मरणारच. म्हणून कविवर्य म्हणतात, नाही पुण्याची मोजणी. आपण कोण पुण्य करणारे? केलेले पुण्य मोजून आपण काय मिळवणार. जेव्हा त्या परमात्म्यावरच सर्व सोपवले आहे तर तो ठेवेल तसे राहणे क्रमप्राप्त नाही का. मी पुण्य करतो हा हि एक प्रकारचा सात्विक अहंकारच नव्हे का? साधनेत अहंकार हा क्रमांक एक चा शत्रू. अशाने संपूर्ण शरणागती कशी साधणार? मी नामस्मरण करतो. मी पूजा पाठ करतो. मी पोथी वाचन करतो. मी परोपकार करतो. मी? हा मी कुठून आला? आणि जोपर्यंत हा मी आहे तो पर्यंत स्वस्वरूपाचे आकलन कसे होणार? आणि जिथे हा मी आहे तिथे द्वैत असणारच द्वैत म्हणजे दुसरे कणीतरी. मी व्यतिरिक्त दुसरे. जिथे पुण्य आहे तिथे पाप हि असणारच. पाप नसेल तर पुण्य तरी कसे कळणार? पाप आणि पुण्य एकाच नाण्याच्या दोन बाजू. जिथे प्रकाश आहे तिथे अंधार नाही आणि जो पर्यंत अंधाराचे ज्ञान होणार नाही तो पर्यंत प्रकाश कसा कळणार? साधना पथावर मार्गक्रमण करताना कळत नकळत साधकाकडून पाप हि होते. साधकाच श्रद्धाळू मन गोंधळून जात. पापाचरणाचे दुख त्याला डाचते, पण म्हणून कवी म्हणतात, नाही पापाची बोचणी. रे साधका असू दे भक्ती तुझी सहज आणि अनन्य. पाप पुण्याचे हिशेब का ठेवायचे? शेवटी सर्व इथेच सोडून जायचे आहे. एकदा समर्पित झाले कि काय पुण्य आणि काय पाप. म्हणून म्हणायचं, नाही पापाची बोचणी. जिणे गंगौघाचे पाणी. साधकाचे जीवन कसे असायला हवे गंगेच्या ओघासारखे. पवित्र गंगा नदी. तिचा ओघ - प्रवाह रात्नाकराकडे धावणारा. अखेरीस त्यात सामावून जाणारा. सर्वांच पाप पुण्य आपल्यात सामवून घेत शेवटी अथांग सागरात स्वतःला समर्पित करायचं हेच गंगेचे जीवनाचे सार्थक नाही का. साधकालाही शेवटी त्याच्या आराध्याच्या चरणाशी विसावा घ्यायचाच आहे. तिथे देहा बरोबरच माया मोहाचे, पाप पुण्याचे सर्व संदर्भ गळून पडायला हवेत. सर्व ग्रंथी तुटायला हव्यात.
कवी म्हणतात,
कशाचा ना लागभाग | कशाचा ना पाठलाग | आम्ही हो फुलांचे पराग |

ह्या ओळीचे गीतेतील एका वाचनाशी साधर्म्य आहे, सुख दुःखे समे कृत्वा | लाभा लाभू | जया जयौ | , साधनारत असताना कशाची आसक्ती नसावी. शेवटी मन आहे. पैशा अडक्यात, मुला बाळात अडकणारच. कधी आनंदाचे भरते तर कधी दुःखाचा अनावर आवेग. स्तुती सुमनांनी हुरळून जायचं तर कधी अपमानाचे कडू घोट पचवायचे. अशा नाना प्रकारच्या प्रसंगांनी भरलेले आयुष्य. पण एकदा म्हटले राम हा समर्थ, मग हा खटाटोप कशासाठी? अशाने भक्तीचा परमोच्च क्षण कसा साधणार? आपले साध्य काय आणि आपण कशाच्या मागे लागलेलो आहोत? त्या रामाने ठेवले तसे राहावे. कशात गुंतणे नाही. एका नामा शिवाय कशात रमणे नाही. सर्वात असून नसणे. शरीराने कर्म चाललेली आहेत पण मन नामाच्या ठिकाणी स्थिर अशी अवस्था. कोणी त्यजा अथवा निंदा, आमुचा स्वहिताचा धंदा. त्याच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही म्हणून आम्ही हो फुलांचे पराग. वाऱ्याच्या (ईश्वराच्या) इच्छे नुसार आम्ही वाहणार. असे असावे साधकाचे अंतरंग.

आम्ही नाही नाम - रूप | आम्ही आकाश स्वरूप | जसा निळा निळा धूप |

भक्तिमार्गाच रहस्य इथे प्रकट होते. देव पहावयासी गेलो | तेथे देवची होऊनी ठेलो |, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू असताना, एक दिवस असा येतो कि माउली म्हणतात आजी सोनियाचा दिनू | वर्षे अमृताचा घनु |. आजचा दिवस कसा आहे? सोन्याचा दिवस आहे. अमृताने भरलेला घन आज बरसतोय. सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव होतोय. भक्तिरसात चिंब भिजण चालू आहे. ज्या देवाच्या शोधात मी भटकत होतो तो आज मला माझ्यातच सापडलाय. सर्वत्र त्याच्या भक्तीचा मंद दरवळ भरून राहिलाय. सर्वत्र त्याचा शाश्वत प्रकाश पसरलाय. ज्ञानाचा प्रकाश.  तुझा तूची देव. तुझा तूची भाव. माझे मज रूप कळू आले. आणि शेवट कि सुरुवात? साधक स्वस्वरूपात लीन होतो. साधकाचा हा मृत्यू म्हणावा कि नवा जन्म? तो नाम घेतो. तो त्या विश्वाम्भराच्या रूपाचे ध्यान करतो पण ते सर्व आता एकरूप झाले आहे. आणि हीच सायुज्य मुक्ती साधकाला लाभते जी असते भक्तीची परिसीमा. तो आकाश स्वरूप होतो आणि भक्तीचा निळा रंग सर्वत्र भरून राहतो  धुपा सारखा.

पूजेतल्या पाना फुला | मृत्यू सर्वांग सोहळा | धन्य निर्माल्याची कळा |

पूजा करताना ताजी टवटवीत फुल नाही का आपण वाहत श्री चरणावर, दिवस भरात त्या फुलांच निर्माल्य होत. कोणी पाण्यात विसर्जित होतात. कोणी मातीत एकरूप.  पुन्हा नव्याने त्याला कोंभ फुटतो. धरणीच्या उदरातून  जन्म घेत सद्गुरूंच्या चरण कमलावर विसावण्यासाठी. त्या सुकोमल पवित्र श्रीचरणांच सान्निध्य जर आयुष्य भर मिळत असेल तर मृत्यू हा सोहळा न होता तर नवल.  त्या फुलासारख साधकाच जीवन. संपूर्ण आयुष्य श्री चरणांवर समर्पित झाल्यावर आणखी काय हव? शरीराच सुद्धा तसच आहे. मृत्यू होतो तो शरीराचा.शरीराच निर्माल्य होत. पंचमहाभूतात विलीन होत. नव्याने जन्म घेण्यासाठी. भक्तीची वाट चालण्या साठी. म्हणून इतकेच म्हणावसे वाटते, शेवटचा श्वासही नामात जावा.



Monday, October 2, 2017

When will I get the possession of the house?


One of my friend was worried as he did not get the possession of his flat from the builder. His property was under renovation and re development project. it was completed and builder gave possession of all the flats to everybody except my friend. He expressed a concern and wanted me to help him to know When will he get the possession of the flat? He asked me the question on Friday 29th September 2017 in Mumbai (Goregaon) at 22:35. I thought to use ruling planets and hoary chart to know the same. I asked him to tell any random number from 1 to 259. The number that he gave me was 231. His builder had told him that he will get the possession in 10-12 days. So the incident is expected to take place within 10-12 days, but when?




Date: 29/09/2017
Time: 22:35
Place: Mumbai
KP # 231


Ruling Planets are as shown below.

Lagna : Taurus - lord Venus 
Star: Uttarashadha - Lord Sun
Rashi: Dhanu - Lord Jupiter
Day: Friday - lord Venus.

I found that none of the planets was vakri which was a good sign. Rahu and Ketu were not seen in the Rashi of ruling planets hence Rahu and Ketu does not considered to be a part of ruling planet. Finally I considered the ruling planets were - Venus, Sun and Jupiter. Being a lord of the Lagna and present 2 times in the list of the ruling planets, Venus was considered to be more powerful.

as to see the transit of the moon in the Nakshtra of Venus I checked Panchang and found that Moon's transit will take place in Bharani nakshtra of Venus on October 8, 2017. Hence I came to the conclusion that my friend should get the possession of the flat on October 8, 2017.

I will update this blog once my friend gives me the news. Lets see!

For any Astrological Guidance I am available on 7709594902 (whats up)

Wednesday, May 3, 2017

वाढदिवस आणि नामस्मरण

नमस्कार,

आज एकूणचाळीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे, म्हणजेच अस्मादिकांचा वाढदिवस. तसा तो दर वर्षीच येतो. आणखी एक वर्षाने शरीराचे वय वाढते ( मनाचे वय हा स्वतंत्र विषय) आणि योगायोगाने एक सत्पुरुष श्री केशव बेलसरे यांचा एक लेख वाचनात आला. प. पु. गोंदवलेकर महाराजांचे ते अंतरंग शिष्य. साधकांसाठी त्यांनी लिहिलेले बहुदा शेवटचे पत्र खाली उद्धृत करीत आहे. पु. बाबांच्या विचारांनुसार आज भरपूर नाम घेण्याचा प्रयत्न करणार. कारण एक गोष्ट पटलेली आहे, हाताशी असलेला वेळ खूप कमी आहे. माझ्या, तुमच्या आणि आपणा सर्वांच्या.

*||श्रीराम||*

*आणखी चार महिन्यांनी मी ९० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. मला माझ्या चौथ्या वर्षापासून स्पष्ट स्मृती आहे. मी या ८५ वर्षात जे शिकलो ते प्रत्येकाला उपयोगी पडेल म्हणून सांगतो.* 

*१) आपल्या जीवनाचा जसा आरंभ होतो, तसा त्याचा शेवट कधीच होत नाही. कारण सगळेच कल्पनेबाहेर बदलते. परिस्थिती पण बदलते. माणसे बदलतात. इतकेच नव्हे तर आपले शरीर आणि मन देखील बदलून जाते.* 

*२) जीवन म्हणजे एक गूढ प्रवास आहे. आपण कोठून या जगात आलो, कोणी पाठवले हे आपल्याला कळत नाही. तसेच हे जग कशा परिस्थितीत सोडायचे, कोठे सोडायचे, कशा अवस्थेत सोडायचे हे आपल्याला ठाऊक नाही. बरे! जग सोडल्यावर आपण कुठे जातो, आपल्याला कोण भेटतात, त्यांच्या सहवासात किती काळ राहायचे हे माहीत नाही. एकूण जीवनाचा आरंभ अज्ञानात होऊन त्याचा अंत देखील अज्ञानात घडून येतो.* 

*३) आपण आपल्या इच्छा तृप्त करण्याचा जन्मभर सतत प्रयत्न करतो; परंतु ते घडवून आणण्याची शक्ती आपल्या अंगात नसते. पुढे जे घडून यावे असे वाटते, त्याची उपाय रचना आपण सतत करतो. पण आपले उपाय दृश्यावर म्हणजे समकालीन माणसांच्यावर आणि घटनांवर अवलंबून असतात, त्यामुळे प्रत्यक्षात जे घडून येते, ते आपल्या मनाच्या उलट किंवा मनासारखे घडलेच तरी त्याने मनाचे समाधान होत नाही.* 

*४) यावरून मी असे शिकलो की मानवी जीवन माणसाने ठरविलेल्या सिद्धांताप्रमाणे चालत नाही. ते आगगाडीच्या रूळाप्रमाणे ठरलेले नाही. ते एखाद्या समुद्राकडे धावणा-या नदीसारखे आहे. कोणाच्या वाट्याला काय प्रसंग येईल हे कोणास सांगता येत नाही.* 

*५) आपल्या मनासारखे व्हावे असे तर वाटते आणि तसे घडेल याची खात्रीही नसते. म्हणून प्रत्यक्ष जीवन जगताना मनाला एक प्रकारची अस्वस्थता, काळजी, भीती आणि असुरक्षितता व्यापून राहते. त्यातून मोकळे होण्यास अज्ञाताची कास धरल्या वाचून गत्यंतर उरत नाही. अज्ञात दोन प्रकारचे आहे. १. विश्वाला चालवणारी प्रचंड शक्ती आणि २. ती शक्ती ज्या व्यक्तीमध्ये प्रत्यक्ष अवतरते त्याचा सहवास.* 

*६) विश्वाला चालविणा-या अज्ञात शक्तीला नियती असे म्हणतात. नियतीला संत प्रारब्ध असे म्हणतात. नियतीवर पूर्ण श्रद्धा ठेवून जीवन जगणे सामान्य माणसाला फार कठीण जाते. नियती आपल्या जीवनात काय उलटापालट करील याचा अंदाज कोणालाच करता येणार नाही.* 

*७) म्हणून ज्या व्यक्तीमध्ये विश्वशक्ती साकार होते, अशा सद्गुरूंना मनात घट्ट धरणे हा जीवनातील काळजी, भीती आणि असुरक्षितता नाहीशी करण्याचा रामबाण उपाय आहे. हे मी जीवनात अत्यंत स्पष्टपणे शिकलो.* 

*८) संताला मनाने घट्ट धरणे म्हणजे त्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे स्थान देणे. मी शरीराने व्यवहारात वागत असताना "मी त्यांचा आहे" असे म्हणून त्याचे सतत स्मरण बाळगणे ही संतांचे झाल्याची खरी खूण आहे. आपल्याला अज्ञाताची इच्छा काय आहे ते कळत नाही, म्हणून आपल्या इच्छेमध्ये आणि त्यांच्या इच्छेमध्ये संघर्ष येतो. तो नाहीसा व्हावा यासाठी आपण आपली इच्छा त्यांच्या इच्छेमध्ये विलीन करण्याचा अभ्यास करावा. या अभ्यासालाच नामस्मरण असे संत म्हणतात. म्हणून नामस्मरणाने माणसाचे जीवन अज्ञाताने भरून जाते. एकदा ते भरले की मग कोणत्याही परिस्थितीत माणसाचे समाधान भंगणार नाही असा अनुभव येतो. यासाठी माझ्या शेवटच्या दिवसात मी सगळे सोडून नामस्मरण करतो.* 

*के. व्ही. बेलसरे*
*१४/०९/१९९७*

||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||