Wednesday, October 10, 2018

ज्योतिष कथा: माझा मुलगा परत येईल का हो?


“शांत व्हा जयकर साहेब, नका असा जीवाला त्रास करून घेऊ”
“काही तरी मार्ग नक्की निघेल.”
“आपल्याच कर्माचे भोग असतात. विचार करा तुमचा मुलगा बुद्धिमान आहे. हाती पायी धड आहे. कुठलेही व्यंग त्याला नाही. कुठलेही व्यसन नाही. उच्च शिक्षित आहे. माझ्या माहितीत असे अनेक पालक आहेत ज्यांची मुले मतीमंद किंवा गतिमंद निपजतात. व्यसनी होतात. गुनेह्गारी कडे वळतात. जन्मजात व्यंग असते. आंधळी निपजतात. अल्पायुषी निघतात. त्यांनी काय करावं? नियतीच्या पुढे कोणाच काय चाललय का?”
“शांत व्हा”.
एका हतबल बापाशी मी बोलत होतो. परोपरीने समजावण्याचा प्रयत्न करत होतो. एक ज्योतिषी म्हणून प्राप्त परिस्थितीची योग्य जाणीव जातकाला करून देण गरजेचं असतं. माझा तसा प्रामाणिक प्रयत्न होता.
“अहो मी काय नाही केलं सुशांत साठी. त्याच्या आईने त्याच्या संगोपनासाठी तिच्या करिअरवर पाणी सोडलं. त्याने मागावं आणि मी आणून द्यावं. काही म्हणून कमी नाही ठेवलं. उत्तम शाळेत त्याच शिक्षण व्हाव म्हणून मी पार्ट टाईम काम करायचो. माझी परिथिती तेव्हा तशी चांगली नव्हती. शाळा, कॉलेज, त्याचे छंद, खेळ कुठे म्हणून मी कमी पडलो का?”
अत्यंत अगतिकतेने जयकर साहेब माझ्याशी बोलत होते. सुशांत, त्यांचा थोरला मुलगा. चुणचुणीत. हुशार. मोठ्या प्रयत्नाने इंजिनिअर झाला. चार चौघात देखणा. सडपातळ. बोलका. एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला होता. पण कुठे माशी शिंकली? कुठल्या आई बापाला नाही वाटत, मुलांनी छान शिकावं. उत्तम नोकरी –व्यवसाय करावा. योग्य वयात लग्न करावं. लौकिक रूढ वाटेने आयुष्याची  वाटचाल करावी. जगाशी दोन हात करावेत. नवनवी क्षेत्र पादाक्रांत करावीत. घरात नातवंड खेळवावीत. अंगणात चिमुकली पावलं दुडूदुडू धावावीत. त्यांच्या पाठी धावता धावता पुन्हा मुल व्हावं. आयुष्याच्या संध्याकाळी मुलांनी आधार व्हावं. संतती सुख म्हणतात ते अजून काय असत?
“पंचविशी सरली. तिशी उलटली. महिने चाललेत. वर्ष उलटत आहेत. ह्याच्या बरोबरीच्या मुलांची लग्न झाली त्यांना मूल झाली तरी हा काही लग्नाचं नाव काढत नाही.”
“येईल ते स्थळ नाकारत सुटलाय.”
“बर, आम्ही हे हि विचारलं तुझ्या मनात कोणी असेत ते तरी सांग, तर ते हि नाही.”
“मी तर आता ह्याच्या पुढे हात टेकले.”
“काही विचारव तर अंगावर वसकतो.”
“आता ह्या वयात हे भोग नशिबी यावेत का आमच्या?”
“३ महिन्यापूर्वी चांगली भली नोकरी सोडली.”
आता मलाही हे सर्व ऐकून धक्का बसला. इथे लोकांना चागल्या नोकऱ्या मिळत नाहीत आणि ह्यान असलेली नोकरी सोडावी?
“आत्ता काय करतो मग सुशांत?”
“अहो कुठल्याशा आश्रमात जाऊन राहिलाय, परत घरी यायचं नाही म्हणतो.”
आई बात समज में | मी मनाशीच म्हटलं
“परोपरीने समजाऊन सांगितलं, त्याला कुटुंबा विषयी काही वाटतच नाही.”
सोसाट्याच्या वाऱ्यात शीड फाटलेल्या गलबतासारखी मनाची अवस्था झाली होती. सैरभैर.
सर्व भावना बोथट झाल्या होत्या. एक एक दिवस नुसता ढकलायचा.
“माझा सुशांत परत येईल का हो?”
जयकर साहेबांनी कळवळून प्रश्न विचारला होता.
का जन्माला येतो आपण. कोण आहोत आपण. जन्माला येऊन काय करायचंय? काळाच्या पुस्तकातली वर्षाची पान उलटत राहतात. जन्म, बालपण, शाळा, सोबती, परीक्षा, खेळ, स्पर्धा, छंद, कॉलेज, समारंभ, प्रेम, प्रेमभंग, लग्न, संतती, नोकरी, करिअर, हॉस्पिटल, आजारपण, फसवणूक, लांड्यालबाड्या, खुन्नस, अपमान, मारामाऱ्या, राजकारण, ......एक दिवस मृत्यू. हीच का आयुष्याची इति कर्तव्यता? का वाटल असेल सुशांतला घर सोडून आश्रमात राहावंसं? त्याला सन्यासी व्हायचय? कि त्याला आयुष्यात जबाबदाऱ्या नको आहेत? एका तरुणाच त्याच्या पालकांप्रती , समाजाप्रती, देशाप्रती काहीच कर्तव्य नाही का? कुठे गेल पौरुष? कुठे गेली विजीगिषु वृत्ती? कुठे गेली मनगटातली रग? अरे घे अंगावर जगाची आव्हानं. कर कठीण परिस्थितीशी दोन हात. उठ! जागा हो! जग तुझ्या आई साठी जीन तुला तळहाताच्या फोडासारखं जपला. जग तुझ्या बापासाठी ज्याने तुझ्यावर मायेच छत्र धरल. जग तुझ्या छोट्या धाकट्या भावासाठी जो सतत दादा दादा करत तुझ्यावर निरपेक्ष प्रेम करतो. जग त्या मित्रांसाठी जे तुझ्या अवतीभवती असतात सतत तुझ्यासाठी. तुझ्या अडचणीत. तुझ्या सुखात, तुझ्या दुखात. जग त्या समाजातल्या वंचितांसाठी, अडलेल्यांसाठी, नडलेल्यांसाठी, हो त्यांच्या अंधारातला प्रकाश देणारा दिवा. हो त्यांच्या आधाराची काठी. त्या परमेश्वराने तुला सर्व दिलय. एक सुंदर सशक्त शरीर. एक मजबूत कणखर मन. का करायचा करंटेपणा? का पळायच परिस्थितीपासून? काय मिळणार आहे त्या आश्रमात हरी हरी करून? तो पुंडलिक कुठल्या आश्रमात गेला होता हरी हरी करायला? प्रत्यक्ष परब्रह्म आले त्याच्या भेटीला. परमेश्वर नाही आश्रमात, तो नाही मंदिरात, तो नाही कुठल्या मठात. तो आहे तुझ्या आत. तो आहे तुझ्या आई बापाच्या चरणाशी. गधड्या तुझ डोक दुखत तेव्हा परमेश्वर येत नाहीरे तुला बाम लावायला, ती माउली येते. करंट्या १०३ ताप असताना कोणी रे तुला खांद्यावर उचलून डॉक्टरकडे नेलं? तो हरी आला होता का? तुझा बाप होता भर पावसात चपला झिजवत तुला डॉक्टरकडे नेणारा. आठवतय का तुला मुलाखतीला जाताना टिफिन विसरून गेला होतास, दुपारी भर उन्हात कोण आले होते रे तुला टिफिन घेऊन? तुझा हरी कि तुझा भाऊ? बाईक वरून धडपडला होतास. ८ दिवस हॉस्पिटलमध्ये होतास. तुला भरती करणारे तुझे मित्र होते. तुझ्या आईला आणि वडिलांना धीर देणारे तुझे मित्र होते. औषधाचे पैसे भरणारे तुझे मित्र होते. तू बरा होऊन घरी येईपर्यंत तुझी सुश्रुषा करणारे तुझे मित्र होते. तुझासाठी देव पाण्यात टाकून ठेवणारी तुझी आई होती. पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, फायर ब्रिगेड इथे तिथे धावणारे तुझे वडील होते. अशा तुझ्या मायेच्या माणसांना सोडून तला त्या टुकार आश्रमात रहावस वाटत? धिक्कार आहे तुझा.
जयकर साहेबांचं बोलण ऐकून माझं विचार चक्र अस सुरु झालं. वाटलं सरळ जावं आणि सुशान्ताचे कान उपटावेत, जयकर साहेबांनी दिलेल्या सुशांतच्या कुंडलीतली पाने उलटण्या व्यतिरिक्त तरी त्याक्षणी मी काय करू शकत होतो?
सुशांतची कुंडली पाहत असतानाच मी मनातल्या मनात सन्यास घेण्या संबंधी ज्योतिष शास्त्राचे नियम जे आहेत त्यांची उजळणी करू लागलो. ज्याअर्थी जातकाला सन्यास घ्यावासा वाटतो त्याअर्थी त्याचा लौकिक आयुष्यातला रस संपला असावा. त्याला उपरती होऊन सद्गुरूंचा शोध घ्यावासा वाटत असावा. त्याला मोक्षाचा अधिकारी व्हावस वाटत असाव. माझ्या मनात हाही विचार आला कि हा टेम्पररी फेज तर नाही? मठ मंदिरातून राहण्याची खाण्याची फुकट सोय होते. कुठलीही हि जबाबदारी नकोय, पडेल ते काम केले. दोन वेळ गिळायचं आणि स्वस्थ बसायचं. जर खरच अध्यात्मात प्रगती होणार असेल तर गोष्ट वेगळी. सुशांतची कुंडली अभ्यासात असताना मी पुढील सन्यास योगांची पडताळणी करू लागलो.
एकूणच वैराग्य आणि सन्यस्त वृत्तीचा कारक ग्रह म्हणजे शनी. तसेच आयुष्य समरसून जगण्यासाठी, प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी बळ लागते चंद्र, रवी, गुरु, मंगल अशा ग्रहाचं.
भाग्येश आणि दशमेश हे दोन्ही ग्रह जर षष्ठेश आणि अष्टमेश याबरोबर असतील तर व्यक्ती सन्यास घेते. लग्नेश व शनी दोन्ही तूळ, मकर व कुंभ या व्यतिरिक्त इतर कुठल्या राशीत असतील तर सन्यास योग निर्माण होतो. रवी, चंद्र किंवा गुरु यापैकी एक ग्रह निर्बली असून लग्न, दशम किंवा व्यय स्थानी असून तूळ, मकर किंवा कुंभ राशीतील शनीच्या पूर्ण दृष्टीत असेल तर वैराग्य येते. अशा ग्रह स्थिती बरोबरच जर सप्तम स्थान कमालीचे बिघडले असेत तर आयुष्यातला रस नाहीसा होतो. लग्न स्थानावर रवी, मंगळ अथवा गुरूची दृष्टी असता विरक्ती येते. जन्म लग्न कुंडलीत चार ते पाच ग्रह एकाच भावात असून त्यापैकी एक ग्रह बलवान असतो. कुठल्याही अन्य ग्रहाच्या दृष्टीत नसतो तसेच यापैकी कुठलातरी एक ग्रह दशमाधीपती असतो अशावेळी जातक संन्यासी वृतीचा असतो. कुंडलीमध्ये लग्न स्थानाचा संबंध शरीराशी तसेच चंद्राचा संबंध मनाशी असतो. असे लग्न स्थान व चंद्राचा संबंध शनीशी असता जातकाला विरक्ती येते. लग्नेश कुणाच्या दृष्टीत नाही पण लाग्नेशाची शनिवर दृष्टी असता विरक्ती येते. तसेच शनिवर कोणाची दृष्टी नसताना शनीची लग्नेशावर दृष्टी असेल तर सन्यस्त वृत्ती निर्माण होते. चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीस्वमीवर फक्त शनीची दृष्टी असेल तर वैराग्य येते. दशमेश इस्तर चार – पाच ग्रहांबरोबर असून केंद्र किंवा त्रिकोण स्थानात असेल तर जातक जीवन्मुक्त होतो. नवमेश बलवान असून तो नवमात किंवा पंचमात असून गुरु अथवा शुक्राच्या पूर्ण दृष्टीत असेल तर जातक संन्यासी होतो. कुठल्याही कार्यात यश हवे असेल तर गुरुबळ असणे अत्यावश्यक आहे. त्यातूनही मोक्ष प्राप्ती, सन्यास अशा बाबतीत तर ते खास महत्वाचे. सुशांतच्या पत्रिकेत लाभत कर्केचा चंद्र आहे खरा, पण त्यावर धनातल्या तुळेच्या शनीची दहावी दृष्टी. हा एक योग मला त्यादृष्टीने योग्य वाटतोय मुख्य म्हणजे नवमांशात सुद्धा चंद्र शनीच्या तिसऱ्या दृष्टीत. थोडं धाडसी विधान करतोय खर, यामुळे सन्यस्त वृत्ती पेक्षा आळशी वूर्त्ती वाढीस लागते अस वाटते. कुठलीही महत्वाकांक्षा नाही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी वृत्ती. पंचमातला रवी शनीच्या मकर राशीत त्यामुळे बिघडला. भाग्येश आणि धनेश शुक्र षष्ठात मंगळाबरोबर म्हणन बिघडला. नवमांशात सुद्धा तो चतुर्थात हर्शल व प्लुटो बरोबर मंगळाच्या राशीत. जन्म लग्न कुंडलीत गुरु हर्शल बरोबर तृतीय स्थानात. म्हणजे एकूणच शुभ ग्रहांचे पाठबळ नाहीच. थोडक्यात सन्यास मार्गात सुद्धा हाती निर्भेळ यश नाही. बिघडलेल्या शुक्रामुळे स्त्रीसुख नाही. वैवाहिक सौख्यात न्यून. एकूणच आश्रमाच्या नियमावलीतील काही नियमामुळे नामस्मरण घडत आहे त्याचा काही परिणाम झाला तर उत्तम. वात्स्तविक कर्क राशीचे लोक कुटुंबाशी सलग्न असतात. कुटुंबापासून दूर राहू शकत नाहीत. पण इथे सर्व उफराटा कारभार. तसा सुशांत अधून मधून घरी येतो पण पुन्हा परत जातो. चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्रस्वामी तृतीय स्थानाचा बलवान कार्येश होतो. तृतीय स्थान हे चतुर्थ स्थानाचे व्यय स्थान त्यामुळे तो तसा कायम घरापासून दूरच राहील. किंबहुना त्यातच त्याचे हित आहे, या निष्कर्षाप्रत मी आलो. कर्क राशीचा स्वामी चंद्राची महादशा जेव्हा सुरु होईल तेव्हा तो घरी येईल. म्हणजे २०१९ च्या शेवटी. अर्थातच नोकरी व काम धंद्यात त्याला रस नसणार कारण षष्ठ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शुक्र पंचम स्थानाचा बलवान कार्येश होतोय. त्याचा नक्षत्र स्वामी मंगळ सुद्धा पंचम स्थानाचा बलवान कार्येश होतोय. तसे चित्र निराशाजनक आहे खर, पण काय करणार ईश्वर इच्छा बलीयेसी. आणखी एक नमूद करण्यासारखी गोष्ट अशी कि हेमंत जी नि सुशांतच हात बघून हि हाच फलादेश दिला. २०१९ – २० च्या सुमारास तो घरी येईल पण....

नुकताच रिलीज झालेला चित्रपट पहिला. “सुई-धागा” त्यात्तल्या त्या नायकाचे उद्गार असतात, “सब बढीया है|”

समाप्त.

Wednesday, October 3, 2018

ज्योतिष कथा: चिंताग्रस्त चिंतामणी



"हॅलो सर आहात का, मी चिंतामणी रानडे बोलतोय".
आवाजापेक्षा मला नाव ओळखीचं वाटलं.
"चिंतामणी, होय आहे घरी. संध्याकाळी ५ नंतर भेटू."
"सर, तुमचा पत्ता व्हाट्स अप करा प्लिज."
“शुअर! मी लोकेशन पण सेंड करतो.”
“आभारी आहे सर, मी येतो ५ वाजेपर्यंत.”
नुकतच फोनवर एक कन्सल्टेशन संपवलं होत. आणि आता हा फोन.
चिंतामणी रानडे. आवाज थोडा स्त्रैण वाटला. एक प्रकारचं आर्जव होत आवाजात. जगातला मी शेवटचा ज्योतिषी उरलो असावा, अस श्री चिंतामणी साहेबांच्या बोलण्यावरून वाटलं. अर्थात मला थोड्या गुदगुल्या झाल्याच. नुकत्याच संपवलेल्या कन्सल्टेशनचे नोटस घेतल्या आणि व्हाट्स अप वर उपाय दिले. घडाळ्यात साडेचार वाजले होते. उन्ह आता बर्यापैकी कलली होती. मस्त गरमागरम चहा हवासा वाटत होता. अशावेळी मदतीला येणारं हक्काचं माणूस म्हणजे कन्यारत्न. मस्त पैकी चहापान चालूच होत आणि बेल वाजली. दरवाजा मीच उघडला. दारात साधारण साडेपाच फूट उंचीचा इसम उभा होता. नखशीकांत गोरा. डोक्यावरचे विरळ झालेच होते. डोळ्यावर चष्मा. चेहऱ्यावर हास्य. भाव असे कि सापडला! मीही चेहऱ्यावर माझं ठेवणीतलं स्मित आणत म्हटलं , “नमस्कार चिंतामणी, या!”
आम्ही दोघेही समोरासमोर बसलो. मध्ये बराच वेळ गेला. माठातलं थंडगार पाणी एव्हाना चिंतामणीनि संपवलं.
“बोला देवा”, मी म्हटलं.
पिशवीतून कुंडली काढत त्यानी ती माझ्या हातात दिली. कपाळाला लावत मी ती उघडली. जन्म लग्न कुंडली, भाव चलित आणि नवमांश कुंडली नजरेखालून घालत मी विचारल, “तुमची जन्मवेळ अचूक आहे?”  
“आहे ना, म्हणजे सकाळी ९:४२ कि ९:५२ हे निश्चित नाही.”
नाकावरचा चष्मा वर सरकवत चिंतामणी म्हणाले.
त्यांनी दिलेली कुंडली सकाळी ९:४२ या वेळेप्रमाणे बनवली होती. म्हणजे माझी शंका रास्त होती.
Birth rectification करणे गरजेचे होते.
मी त्यांना विचारलं, “ तुमचा काय प्रॉब्लेम आहे?”
“मला वाटत, करिअर विषयी काहीतरी समस्या असावी.”
अनुराधा नक्षत्र मला खुणावत होत. मला आठवल, एक ज्योतिर्विद पेपर मध्ये जाहिरात देतात्त. आश्चर्य चकित व्हाल, तुमची समस्या तुम्ही न सांगता ओळखणार. स्वतः येऊन खात्री करा. तर महाराजा त्याच असं आहे कि अनुराधा नक्षत्र असताना आलेला जातक बहुदा करिअर किंवा आर्थिक समस्येवर सल्ला घेण्यासाठी आलेला असतो असा अनुभव आहे.
एव्हाना आश्चर्य चकित व्हायची वेळ चिंताग्रस्त चिंतामणी साहेबांवर आली होती. चेहरा आणि डोळे बोलत होते. बसल्याजागी माझं फेस रीडिंग चालूच होत.
“गेली काही वर्ष बांधकाम क्षेत्रात काम करतोय.”
“पण सध्या मंदी आहे, पहिल्यासारखी परिस्थिती नाही. दुसरा कुठलातरी व्यवसाय करावा म्हणतोय.”
चिंतामणी नि आपल्या चिंतेच गाठोड क्षणार्धात माझ्यासमोर उघड केलं.
“ठीक आहे, आपण आपल्या प्रश्नाच उत्तर प्रश्न कुंडली मांडून सोडवू”.
अर्थातच १ ते २४९ पैकी कुठलाही एक नंबर मी त्यांना मागितला.
“श्री गजाननाच ध्यान करा. प्रश्न स्वतःशी मनात ३ वेळा विचारा आणि नंबर द्या.”
चिंतामणी नि त्वरित श्री चिंतामणीचे ध्यान केले व सांगितल्याप्रमाणे २३ हा नंबर दिला.

तारीख: १५ सप्टेंबर २०११. वेळ: १८:०३:२४ स्थळ: वसई. KP # २३.

मी कुंडलीचा अभ्यास करू लागलो.

प्रश्न: कुठला व्यवसाय करावा?

चिंतामणीना मी प्रश्न विचारला, “तुम्ही तसा काही विचार केला आहे का? “
नारळाचा घाऊक व्यापार करावा असं त्यांना वाटत होत.

प्रश्न कुंडलीला शनी महादशा व मंगळ अंतर्दशा सुरु होती, महत्वाचं म्हणजे राहूची विदशा.
व्यवसायाचा विचार दशम स्थानावरून करावा म्हणून मी दशम स्थानाचा उपनक्षत्रस्वामी पाहिला
दशमाचा उपनक्षत्रस्वामी बुध शुक्राच्या नक्षत्रात सप्तमाचा व दशम स्थानाचा कार्येश होत नव्हता. तसेच तो चर राशीत सुद्धा नव्हता. जर दशम भावाचा सब ७ किंवा १० व्या स्थानाचा कार्येश असून तो चर राशीत असेल तर जातक स्वतःचा व्यवसाय करतो.
“तुम्ही सध्या नोकरी करताय?”
“हो”
दशमाचा सब बुध पंचम  षष्ठ स्थानाचा कार्येश होत होता. सिंह ह्या स्थिर तत्वाच्या राशीत असल्यामुळे तसेच त्याचा नक्षत्र स्वामी शुक्रही षष्ठ स्थानाचा कार्येश होत असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्याच धाडस त्यांनी करू नये ह्या मतापर्यंत मी आलो. पण तरी मला त्यांना निराश करायचं नव्हत.

“चिंतामणी जी, मला तुम्हाला निराश करायचं नाही. पण असलेली नोकरी न सोडता जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरच अगदी कमीत कमी भांडवल गुंतवून करा.”

मी त्यांना सावध सल्ला दिला.

दशास्वामी शनी दशमाचा व लाभाचा कार्येश होत होता. त्याचा नक्षत्र स्वामी केतुही दशम व लाभाचा कार्येश होत होता. शनी धनु ह्या गुरूच्या द्विस्वभाव राशीत होता. नक्षत्र स्वामी केतू हि मंगळाबरोबर शनिच्याच मकर ह्या चर राशीत होता. म्हणजे व्यवसाय संबंधी दशास्वामी अनुकूल होता. अंतर्दशा स्वामी मंगळ मकर ह्या चर राशीत सप्तमाचा कार्येश. आता शनी मंगळ म्हणजे बांधकाम क्षेत्रच मला खुणावत होत. कार्येश स्थानांपैकी अष्टम स्थानाची उपस्थितीती बोलकी होती. बांधकाम साहित्याचा विशेषतः पाईप, नळ प्लंबिंग इ ची विक्री करण्यासंबंधी सूचना मी त्यांना केली.
“अरेच्चा, हा विचारही माझ्या मनात आला होता.”
चिंतामणी तर्जनी आपल्या ओठाशी लावत म्हणाले.

शेवटी मी एवढच म्हणालो, “नोकरी न सोडता जे करता येईल ते करा.”

“मला काही उपाय द्याल?”
प्रश्नाचा रोख मला समजत नव्हता. इथे समस्या अशी नव्हती निर्णय घेण्यासाठी ज्योतीर्विदाची गरज होती.

माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न चिन्ह त्यांना दिसलेच.

“नाही म्हणजे, कुठले रत्न वगैरे वापरू?”

आत्ता माझी ट्यूब पेटली.
मी परत कुंडलीत डोके खुपसले.
अनामिकेत पाचू व गळ्यात गोमेद वापरण्याची सूचना मी त्यांना केली.
“तुम्ही हात पहाता?”
चिंतामणी साहेबांचा पुढचा प्रश्न.
“मी फक्त कुंडली पाहतो, पण तुम्हाला हस्त रेषा वरून फलादेश हवा असेल तर तशी व्यवस्था करता येईल.” एकीकडे हे मी त्यांना म्हणालो आणि दुसरी कडे हेमंतजीना फोन लावला.
चिंतामणीजींच्या हाताचे काळजी पूर्वक फोटो घेऊन ते हेमंतजीना whats अप केले.
पुढच्या १० मिनिटात हेमंत जी नि फोनवरच फलादेश दिले. शनीचा उंचावता प्रबळ आहे. मंगळाच्या मैदानवर स्पष्ट शुभ चिन्ह आहे. स्व कर्तुत्वावर आत्तापर्यंत सर्व उभे केले. वयाच्या ३४ व्या वर्षी अपघात झाला होता. अंगठ्याच्या पर्वतावर शुभ चिन्ह आहे. संतती सुख उत्तम राहील. थोडे वैवाहिक जीवनात पत्नीबरोबर मतभेद राहतात. इच्छाशक्ती प्रबळ आहे. अनामिकेत पाचू रत्न धारण करावे. नोकरीत स्थैर्य आहे, सोडू नये. नोकरी न सोडता व्यवसाय करावा. हेमन्तजी आणखी बरेच काही बोलले. वाक्या वाक्यागणिक चिंतामणी चिंतामुक्त होत असल्याचे मला जाणवायला लागले होते. धोनीने येऊन शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकावा तसं काहीसं मला वाटल. माझ्या आणि हेमन्तजींच्या फलादेशात साम्य होत.

पुढच्या क्षणी चिंतामणीनि आपल्या विजारीच्या खिशातून ३ अंगठ्या बाहेर काढल्या. पाचू, मोती आणि गोमेद. मी त्यांना एवढच म्हटलं, “अहो आधी तरी दाखवायच्या होत्या, विचारायचं ह्या वापरू का.” चिंतामणी ओशाळले. अगोदरच ते कोणा ज्योतीर्वादाकडे जाऊन आले होते हे स्पष्ट होतें. पण लपवायची काय गरज होती? अर्थात हे मी स्वतःशीच म्हणालो.

“छान, फक्त एक करा पाचू आणि मोती एकत्र वापरू नयेत. मोती काढून ठेवा.”

अर्थात ते माझ्या सूचनांचं पालन करतील कि नाहीत ते त्या प्रत्यक्ष “चिंतामणीलाच” माहित.

Sunday, September 16, 2018

ज्योतिष कथा : "आता कसं वाटतंय दिवेकरजी?"

१३ तारखेची दुपारची वेळ होती. घरोघरी बाप्पाचे आगमन झालं होतच. कुठलीही अपॉइंटमेंट दिलेली नसल्याने निवांत होतो. गायक लोक जसे रियाज करतात तसाच माझाही ज्योतिष शास्त्राचा रियाझ चालू होता. हे म्हणजे विविध मान्यवर ज्योतिषांचे लेख वाचणे. नियतकालिक वाचणे. टिपणं काढणे. स्वतः सोडविलेल्या कुंडलीचे पुन्हा पुन्हा विश्लेषण करणे. वगैरे. संध्याकाळचे ५ कधी वाजले कळलंच नाही. मंडळी पण कन्यारत्नासकट देव दर्शनाला गेल्या होत्या. काय भाऊ हौस असते! जाऊदे आजच्या लेखाचा हा विषय नव्हे.तर काय म्हणत होतो महाराजा, जवळच पडलेलं स्मार्ट फोन नामक यंत्र गुरगुरलं. कारण मी त्याला सायलेन्टवर ठेवला होता. एक परिचित नंबर फ्लॅश होत होता. मी म्हटलं आता कशी काय आठवण आली? फोनवर आपले एक जातक श्री दिवेकर (नाव अर्थातच बदललेले आहे) होते. एका सुपर मार्केटचे मालक. साधारण महिन्याभरापूर्वी त्यांनी मला संपर्क केला होता. व्यवसायात जबर आर्थिक फटका बसलेला. डोक्यावर कर्ज वाढलेलं. ऑपरेटिंग कॉस्ट सुद्धा निघत नव्हती. त्यात तब्येतही साथ देत नव्हती. त्यावेळी मी त्यांना काही उपाय दिल्याचं मला आठवलं. त्यांचा फोन पाहताच मी मनोमन सुखावलो म्हटलं वा! उपाय फळलेले दिसतायत! दुसऱ्याच क्षणी दुसरा विचार मनात आला, सबूर! आज स्वाती नक्षत्र होतं, म्हणजे स्वामी राहू. मनात शंकेची पाल चुकचुकली. मी फोन घेतला. आवाजात शक्य तितका उत्साह आणत मी म्हटलं "नमस्कार दिवेकरजी, कैसे याद किया?" त्यांनी फक्त हॅलो म्हटलं. काही सेकंद काहीच बोलणं नाही. मी समजून चुकलो, दाल में काला है | मी पुन्हा माझा मावळत चाललेला उत्साह गोळा करत म्हणालो, "बोला दिवेकरजी कसे आहात? "
"जरा ऑफिसला येता?"
मी मनात म्हटलं प्यासा कुवेके पास जात है, या कुवा प्यासे के पास? काय करणार देहबुद्धी म्हटल्यावर भल्या भल्यांचा अहंकार नकोत्या वेळी फणा वर काढतो. पण दुसऱ्याच क्षणी मी मनात माझीच निर्भत्सना केली. त्यांचा आवाज जडावलेला होता. I strongly felt, he must be in deep trouble. मी पण गंभीर टोनवर गेलो.
"काय हो काय झालं?"
"ऑफिसला या ना प्लिज, सांगतो."
त्यांनी आर्जव केलं. मी नाही म्हणू शकलो नाही.
"तुमचा लॅपटॉप घेऊन या".
म्हणजे त्यांना कंसल्टेशन हवं होते तर. माझ्या मनात राहू पिंगा घालत होता. स्वाती नक्षत्र !
पुढच्या २० मिनिटात मी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या समोर बसलो होतो.
दिवेकर आपल्या खुर्चीत किंचित रेलून बसलेले. चेहरा अर्थातच चिंता ग्रस्त होता. केस पूर्ण पणे विस्कटलेले. डोळ्यात कुठलीतरी वेदना घर करून राहिलेली. त्या केबिनमधलं वातावरण तणावपूर्ण होतं. मला पाहिल्याबरोबर क्षणात त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलेलं,त्यांनी स्वतःला सावरलं. अत्यंत खोल आवाजात ते म्हणाले, "थँक्स फॉर कमिंग". 
मी शांत आवाजात त्यांच्याशी संवाद साधला, "काय म्हणताय?"
"मला आत्महत्या करावीशी वाटतेय".
खुर्चीचे हात मी घट्ट आवळले. काय बोलावं मला सुचेचना.
"त्याने सर्व मनासारखं होईल?" , मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.
"काय करू?, काहीच सुचत नाही. बस्स संपवावं हे सगळं !"
नैराश्य जे काही म्हणतात त्याच मूर्तिमंत उदाहरण माझ्यासमोर होतं.
तेवढ्यातच मी माझा लॅपटॉप ऑन केला होता, समोर त्यांची कुंडली होती.
"तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येणं ऑब्व्हियस आहे, दिवेकर!"
त्यांनी मान वर करून माझ्याकडे पाहिलं.
"सध्या मंगळ महादशेत शुक्राची अंतर्दशा आणि राहूची विदशा आहे."
"मूळ जन्म कुंडलीत राहू भाग्य स्थान तुला राशीत हर्षल बरोबर."
"राहूच्या विदशेत असा त्रास होणारच, २८ सप्टेंबर नंतर परिस्थिती निश्चितच निवळेल."
दशा स्वामी आणि विदशा स्वामी दुरूनही अष्टम आणि व्यय स्थानाचे कार्येश होतं नव्हते.
"तुम्ही कितीही विचार केलात तरी, तुमच्याहातून हे पाप घडणार नाही! चिंता नॉट."
त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले.
"दिवेकर, आपल्या बऱ्या वाईट कर्माचे भोग असतात. ते भोगुनच संपवावे लागतात."
"आत्महत्या करून आपल्याला वाटत, आपली सुटका होईल. पण मृत्यूनंतर हि जीवन आहे."
"गरुड पुराणात तसे स्पष्ट उल्लेख आहेत."
"आत्महत्या केलेला आत्मा , जीव हजारो वर्षे खितपत पडतो."
"अनंत यातना भोगाव्या लागतात."
"राहिलेले भोग पुढच्या जन्मात पुन्हा भोगावेच लागतात."
"मी तुम्हाला दिलेले उपाय करा. उपासनाच तारील."
"शनी मार्गी झालाच आहे, काहीतरी मार्ग निघेल पुढील १०-१२ दिवसात".
माझ्यापरीने मी त्यांना आश्वस्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परिणाम अगदी दुसऱ्याच क्षणी जाणवला."
"उपासना, ती तर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोज करतो. रोज जप करतो."
"अहो, तसे नाही. दिवसभरातला खास १५-२० मिनिटे वेळ त्यासाठी देणं गरजेचं".
"आपल्या उपास्य दैवतांशी संवाद साधायचा, जे माझ्याजवळ बोललात ते त्याच्या जवळ बोलायचं."
"कळवळून प्रार्थना करायची, आईही रडल्याशिवाय लेकराला दूध देत नाही. रडायचं!"
"निवेदन भक्ती म्हणतात त्याला"
माझ्या जीवनातले काही प्रसंग त्यांना मी सांगितले. अर्ध्या तासापूर्वीचे दिवेकर आणि आताचे दिवेकर यात जमीन अस्मानाचा फरक होता. तणाव आता निवळला होता. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थांची देवी स्वरूपातली उपासना करण्यासंबंधी सल्ला मी त्यांना गेल्यावेळी दिला होता. तसेच राहूचे व शुक्राचे दान करण्याविषयी सूचना केली होती. अर्थातच यापैकी त्यांनी काहीही केले नव्हते. डॉ. ने दिलेली औषध तुम्ही घेतलीच नाहीत तर बरे व्हाल का? तोच नियम इथेही लागू होते. ज्योतिर्विद ज्या सूचना करतो त्या जातकांनी तंतोतंत पाळल्या पाहिजेत तरच फायदा होईल. पण तसे जर केलेच नाही तर कर्म भोगांची तीव्रता कमी न होता ते भोगावे लागतातच. असो,
"तुम्ही हात पाहता का? "
दिवेकरांनी मला पुढचा प्रश्न विचारला.
"नाही हो, म्हणजे तसं कधी गरजेचं नाही वाटलं."
"तुम्हाला हात दाखवायचा आहे का"?
"पण तुम्हीतर म्हणालात ना कि तुम्ही पाहत नाही, मग कसे काय? जाऊद्या!"
माझ्या मनात माझे स्नेही हेमंतजी रणनवरे यांचा विचार आला. समोर बसलेल्या जातकाचे संपूर्ण समाधान करणे महत्वाचे त्यात आत्महत्येसारख्या विचारापासून नुकतेच परावृत्त झालेले. मी त्वरित त्यांना म्हटले. "मी हात पाहत नाही, हस्त सामुद्रिक शास्त्राचा माझा अभ्यास नाही, पण माझे एक स्नेही आहेत नाशिकला राहतात त्यांना तुमचा हात दाखवता येईल."
"नाशिकला जायचे म्हणता कि काय?"
"अहो, त्यासाठी नाशिकला जायची काहीही आवश्यकता नाही. तुम्ही फक्त बोला. दाखवायचा आहे का हात?"
इच्छापूर्ती होतेय म्हटल्यावर, दिवेकर त्वरित हो म्हणाले.
तोपर्यंत मी हेमंतजीना फोन लावलाच होता. जातकाची पूर्ण कल्पना दिली आणि हेमंतजी त्यांचा हात पाहायला त्वरित तयार झाले. दिवेकरजींच्या दोन्ही हाताच्या तळव्यांचे स्पष्ट फोटो कडून हेमंतजीना whatsup केले. पुढच्या १० मिनिटात हेमंतजींचा फोन आला. दोन्ही हातांचे विश्लेषण करून हेमंतजी म्हणाले, "हा माणूस काही आत्महत्या करणार नाही. शनी उंचवटा रवीकडे आणि रवी उंचवटा शनीकडे झुकला आहे. लाईफलाईन ला सपोर्ट लाईन हि दिसते आहे. साधारण दीर्घायुष्य आहे. चंद्र उंचवट्यावर अशुभ चिन्ह असल्यामुळे मानसिक त्रास करून घेतला आहे. ह्या अगोदर बरेचदा आत्महत्येचे विचार आले आहेत. मंगळाचे मैदान सुस्पष्ट असून चांगला महत्वाकांक्षी माणूस असतो. मित्र नुकसान करतात. रवी, शुक्र आणि गुरु बिघडले आहेत. यांनी देवी उपासना करावी व माणिक रत्ना धारण करावे. वैवाहिक सौख्य आणि संतती सौख्य नाही. काही गंभीर आजार दिसतो पण त्यावरही मात करतील. आणखी बरेचसे हेमंतजी बोलले. मी मात्र मनात म्हणत होतॊ, कुंडली तर आपल्याला सर्वकाही दाखवते. कुंडलीतले १२ भाव, १२ राशी, नक्षत्र, योग सर्व क्लिअर करतात. दिवेकर विवाहित असूनही पत्नीच्या नोकरीमुळे पत्नीपासून विभक्त राहत होते. काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना अपत्य नव्हते. किडनीच्या विकाराने ग्रस्त होते. ह्या सर्व गोष्टी कुंडलीने दाखवल्या होत्याच पण हे सर्व हातातही स्पष्ट दिसते! शिवाय माझा आणि हेमंतजींचा फलादेशात इतकं साम्य! मी अचंबित होतॊ. हेमंतजींची हस्त सामुद्रिक शास्त्रावरची पकड आणि त्यांचा फलादेश केवळ अचूक. दिवेकरांना मी देवी उपासना कशी काय सांगितली? भाग्येश शुक्र लग्नात. भाग्यात राहू हर्षल तूळेचा. चंद्र धनु राशीत लाभात. - भगवान श्री स्वामी समर्थांची देवी स्वरूपात उपासना करावी! हेमंतजी हि तेच म्हणतात. माझ्या समोर दिवेकर आता खुर्चीत आणखी रिलॅक्स बसले होते. खुर्चीच्या मागे भिंतीवर देव्हारा होता. त्या देव्हाऱ्यात स्वामींचा देवीस्वरूपातला फोटो होता. तुपाचा दिवा मंद तेवत होता. उदबत्तीचा दरवळ वातावरण सुगंधित करीत होता. दिवेकरचा हात हळुवार दाबत मी त्यांना विचारले, "आता कसं वाटतंय दिवेकरजी?"



Sunday, May 27, 2018

मनःशांतीच्या शोधात आहात? मग हे वाचा!


जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूची शोधूनी पाहे| ..... आजवरचं उपलब्ध संत साहित्यात हा श्लोक समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक ह्यात आहे. किती मार्मिक तसाच जिव्हाळ्याचा प्रश्न समर्थांनी काहीशे वर्षापूर्वी विचारला आहे. आणि म्हणून संत साहित्य हे कालातीत आहे. काळाचे सर्व संदर्भ जिथे अपुरे पडतात. काहीशे वर्षापूर्वी समर्थांनी विचारलेला प्रश्न आज पासून काही शे वर्षानंतरही तसाच राहील ह्यात काही शंकाच नाही. आज आपण अनेक मनो कायिक आजारांचा सामना करत आहोत. अति सर्वत्र वर्जयेत | असं कितीही संतांनी कळवळून सांगितलं तरी पालथ्या घड्यावर पाणीच. अति तेथे माती | अशा सारख्या शुभाशितांना काहीच अर्थ राहिला नाहीय. जीवन धकाधकीच झालंय. शांतता हरवलीय. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस अप ह्यामुळे आपल्या पिढीचे हजारो मनुष्य तास वाया जात आहेत. सर्वच दिशाहीन झालय. परिस्थितीचा रेटा इतका जबरदस्त आहे कि प्रपंचाच्या ह्या सागरात आपल जहाज भरकटत चाललंय. पण जहाजाचा कुशल कप्तान जसा मोठ्या संकटातून जहाजाला सुखरूप ठेवतो तसे आपणही आपल्या अंतर्मनाच्या सहाय्याने आणि आपल्या सुप्त शक्तींना विकसित करून ह्यातून सहज बाहेर पडू शकतो. 

आज आपण सर्वच जण ताण तणाव ग्रस्त जीवन जगत आहोत. भौतिक गोष्टींच्या पाठी लागून जे हवं ते कुठल्याही परिस्थितीत मिळवण्याचा हव्यास आपल्याला आहे. त्यासाठी कुठलीही किंमत आपण मोजायला तयार आहोत. कुठे थांबायचं हेच कळेनास झालंय. आयुष्यातले प्रश्न मोठे आहेत. त्यांची उत्तर सापडत नाहीयेत. शिक्षणात अडथळे, व्यसनाधीनता, गृहकलह, विवाह होण्यात झालेला उशीर, बिघडलेले वैवाहिक जीवन, घटस्फोट, विवाहबाह्य संबंध, फसवणूक, संतती न होणे, झाल्यास व्यंग असणे किंवा रोगट असणे, अनारोग्य, अपघात, आर्थिक चिंता, पैसा पुरे न पडण, कमालीचे बिघडलेले नातेसंबंध वगैरे समस्यांची जंत्री कितीही केली तरी वाढतच जाणारी. शिवाय आपला भोवताल, तो तरी कुठे चांगला आहे? जागोजागी घाण, उखडलेले रस्ते, गर्दुल्ले आणि सामाज कंटक लोकांचा सूळसुळाट , गर्दी, गोंगाट, मोर्चे, असवेदनाशील राजकारणी, ह्यातून कुठे आशेचा किरण दिसतोय का? तर हो. नक्कीच. तो आशेचा किरण आपल्यातच आहे. आपल्या मनात. 

तुकाराम महाराजांनी जसे म्हटले आहे, मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण | हे जे मन आहे ते जर स्थिर नसेल तर ते प्रसन्न कसे होईल? मग मनाला स्थिर कसे करावे? पहिले म्हणजे आपल्याला अशी इच्छा असायला हवी कि मला कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहायचय. मग इच्छा तिथे मार्ग निघणारच. कसा? जेव्हा माझ्या समस्या सोडविण्यात मी असमर्थ ठरतो तेव्हा मी त्यांचा जास्त विचार करत नाही, मी माझे विचार बदलतो. समस्या अपोआप सुटतात. हे तत्व महत्वाचे. जेव्हा समस्या निर्माण होते तेव्हा आपण समस्येवर विचार केंद्रित न करता उपायांवर चित्त केंद्रित केलं तर? तर दिशा मिळते दुसर असं कि जी गोष्ट आपल्या डायरेक्ट कंट्रोल मध्ये नसते त्या गोष्टीवर आगपाखड करण्यात काय अर्थ आहे? उगीचच गडबड करून, तिरसट वागून, रागावून, कुढत बसून परीस्थितीत बदल होतो का? नाही. अप्रिय भूतकाळाचा, अप्रिय घटनांचा, दुखांचा सतत विचार न करणे हेच शहाणपणाचे नाही का! आभाळात ढग दाटून आले आहेत तर पाउस पडणारच. पाउस पडला तर चिखल होणारच. चिखल झाला तर तो अंगावर उडणारच. मग आपल्या हातात काय उरते? पावसाचा तिरस्कार? चिखलाचा तिरस्कार? परिस्थितीचा तिरस्कार? जर आपण आपले विचारच बदलले तर नकीच तो पाउस आपण एन्जॉय करू शकू. जे अटल आहे ते घडणारच त्याचा पूर्ण स्वीकार करण्यानेच जीवन सुसह्य होईल नाही का. 

ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या गोष्टीही आपल्याला अस्वस्थ करतात. एखादी व्यक्ती. स्थळ, समुदाय, विचार, पदार्थ असं काही असू शकते. पण त्याचा तरी किती विचार करायचा? रस्त्यावर चालताना घाण पडली असेल तर आपण काय करतो? ती साफ करतो कि नाकावर रुमाल ठेऊन बाजूने निघून जातो? बरोबर. नाकावर रुमाल ठेऊन बाजूने निघून जातो. याला म्हणतात उपेक्षा करणे. तशीच उपेक्षा आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींची कारायला हवी. डोळेझाक करणे, टाळणे, दुर्लक्ष करणे असे काही नाक्कीच्कारता येईल.आपल्या मनाला तशा सूचना द्यायच्या.

आणखी आपण निराश होतो जेव्हा आपण ठरविलेल्या गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत किंवा मिळत नाहीत. आपल्या योजना फसतात. प्रसंगी आपले नुकसान होते. निश्चित ध्येय नसेल तर कोणतीही योजना कार्यान्वित होणार नाही. एकदा का आपण आपले ध्येय ठरविले कि मग काहीही , कितीही अडचणी आल्या, कितीही पीछेहाट झाली तरी हट्टाने आपल्या ध्येयास चिकटून राहणे आवश्यक आहे. आपले ध्येय हे आपल्याला त्या आशेच्या किरणासारखे असते. तेच सतत आपल्याला मार्गदर्शन करते. दुसरे काय म्हणतात ते न ऐकता सतत आपल्या ध्येयाचाच पाठपुरावा करत राहणे महत्वाचे. विलंब लागत असेल तरी हरकत नाही यशाच्या आशेने पुढे पुढे सरकत राहणे हे परत मागे फिरण्यापेक्षा कैक पटीने चांगले नाही का? आपल्या भारतीय तत्वज्ञानात एकांताचा पुरस्कार केलेला दिसून येतो. एकांत म्हणजे एकटे असणे नव्हे. एकटेपणा हा एक प्रकारचा विकार झाला पण एकांत हा जाणून बुजून एकटे राहण्याचा घेतलेला निर्णय असतो. आयुष्यातली खूप गहन अशी कोडी आपल्याला एकांतात सुटतात असा अनुभव आहे. आपण जर नेहमीच घाई गर्दीत राहिलो, झगडत राहिलो तर आपल्याला आपल्या ध्येयपूर्तीची फळ चाखायला कशी मिळतील. प्रसंगी मनाला आणि शरीराला विसावा देणे, आपल्या सुखासाठी समाधानासाठी स्व्यास्थ्यासाठी प्रयत्नरत राहणे महत्वाचे नाही का. आणि म्हणून आपल्या चित्त वृत्तीमध्ये जर आपण समतोल साधला तर मनःशांतीच्या दिशेने टाकलेले ते एक दमदार पाउल ठरेल हे निश्चित. हा समतोल कसा साधायचा ह्याची उत्तरे संत साहित्यात नक्कीच सापडतात. गीतेमध्ये भगवान श्री कृष्णाने म्हटले आहे सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ। ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. जीवन हा एक संघर्ष नाही का? एक प्रकारचे युद्धच आहे. आपले आपल्याशी चाललेले युद्ध. तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आपला आपल्याशीच झगडा चाललेला असतो सतत. आपला अर्जुन झालेला आहे. म्हणून श्री कृष्णाने उपदेश केलाय कि सुखाची दुखाची, जयाची, पराजयाची, लाभाची, हानीची पर्वा न करता केवळ विहित कर्म करणे हेच महत्वाचे. स्तुतीने हुरळून जाऊ नये. अपमानाने निराश होऊ नये, यशाचा गर्व करू नये. हा उपदेश जर आपण तंतोतंत पाळला तर चित्ताचा समतोल साधता येतो. त्यातूनच आपल्याला भूतकाळासाठी नाही,भविष्यासाठी नाही अगदी आजच्या दिवसासाठी नाही तर आत्ताच्या क्षणासाठी जगता येते. शेवटी वाहत्या पाण्यात आपल्याला आपले प्रतिबिंब दिसेल काय? नाही. आपले प्रतिबिंब दिसण्यासाठी पाणी स्थिर असण गरजेच तसाच मनाचा तळ ढवळून निघत असेल तर आपल्याला कशातही यश मिळणार नाही. जर मन स्थिर असेल तरच यशाची अपेक्षा करता येते. प्रसन्नता हा नंतरचा भाग. एक स्थिर मनच प्रसन्न असू शकते. आणि जेव्हा आपल मन स्थिर होत नसेल तेव्हा कशी गत होते जस बहिणाबाई म्हणतात मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर. किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. हे जे मन आहे ते मोकळ्या जनावर सारख आहे. जनावराला जर मोकळं सोडलं तर ते उभ्या शेतात घुसत कितीही हाकलल तरी परत परत शेतात येत. तस मनाच आहे. जनावराला जस खुंट्याला बांधतात तास आपल मनही खुंट्याला बांधणे गरजेच आणि हा खुंटा कुठला तर आपल्या ध्येयाचा. म्हणून मनः शांतीचा मार्ग हा आपल्या ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेतून त्याच्या पूर्तीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कष्टातून आणि समतोल वृत्तीसाठी केलेल्या प्रयत्नातून प्रशस्त होतो. आपल मन हे प्रचंड अशा उर्जेचा एक स्त्रोत आहे. हि जी मनाची शक्ती आहे तीच संवर्धन करणे गरजेचे असते. ती जशी विधायक आहे तशी विघातक देखील. साधी गोष्ट. चाह्गल्या कामासाठी वापरली तर विधायक. वाईट कामासाठी वापरली तर विघातक. आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू. पूज्य वामनराव पै नि म्हटलंच आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरच आहे ते. मनाच्या क्षोभाला आपण जबाबदार असतो आणि मनःशांतीला सुद्धा आपणच जबाबदार असतो. पाणी जसे पतन शील असते. उताराकडे वाहते पण जर त्याला बंध घालून अडवले तर त्यातून आपण वीज निर्मिती करू शकतो. अनेक इतर विधायक काम करू शकतो तसच मनाच सुद्धा आहे. मन हे पतनशील असत. ते सहज विकारवश होते. म्हणून त्याला विधायक कामाकडे वळवणे अतिशय गरजेच. म्हणतात ना रिकामे मन भुताचा कारखाना. अशा या मनाला स्थिर ठेवण्यासाठी त्याच्या समोर ठराविक ध्येय असणं गरजेच. अशा या मनाची शक्ती वाढविण्यासाठी उपासनेची कास धरणे तितकेच महत्वाचे. सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्ती. उपास्य दैवताची भक्ती केल्यामुळे त्या दैवताचे संरक्षण प्राप्त होते. कवच प्राप्त होते. चांगल्या विचारांचा, संगतीचा लाभ होतो. आपले ध्येय सध्या करण्याकरिता करीत असलेल्या प्रयत्नांना ईश्वराचे अधिष्ठान मिळते. आशीर्वाद मिळतात आणि कार्यसिद्धी होते. आणि कार्यसिद्धी झाली कि मनःशांती आलीच.


Tuesday, April 10, 2018

ज्योतिष: जाणून घेऊया कुठल्या योगावर झालाय आपला जन्म. काय आहेत त्याचे परिणाम.

आपल्या भारतीय ज्योतिष शास्त्रात पंचांगाला अनन्य साधारण महत्व आहे. पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग. बाळाचा जन्म झाला कि ज्योतिषी जन्म टिपण घेतात. त्यात ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठला वार, कुठली तिथी, नक्षत्र, कुठल्या योगावर जन्म झालाय. आयुष्यातल्या बराचशा घडामोडी, स्वभाव इ गोष्टींचा घनिष्ट संबंध ह्या पंचांगातील घटकांशी आहे. काही योग हे शुभ तर काही अशुभ असतात. चला तर आपण पाहूया विवध योग आणि त्यांची सविस्तर माहिती. 

१) विश्कुम्भ योग: एक प्रकारचा अशुभ योग जरी असला तरी या योगावर जन्मलेल्या व्यक्ती तशा नशीबवान असतात. गुणी असतात. आरस्पानी सौंदर्य आणि तल्लख बुद्धिमत्तेची देणगी त्यांना जन्मजात लाभलेली असते. सहसा त्यांना आर्थिक तोशीस कधी पडत नाही. जरुरी पुरता पैसा राखून असतात. कुटुंबाला, मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना बरोबर घेऊन चालणे त्यांना आवडते. मित्र मैत्रिणींचा गोतावळा जमवून गप्पांचा फड रंगवायला खूप आवडत. चांगले कौटुंबिक जीवन लाभते. म्हणतात न ब्युटी विथ ब्रेन असा काहीसा पडताळा आपणास येतो जेव्हा आपण या योगावर जन्मलेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात असतो. दुसर्यांना प्रेमाने आणि सन्मानाने वागवण्याकडे यांचा कल असतो.जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले मग अजून काय पाहिजे?

२) प्रीती योग: नावातच सर्व काही आले. सौंदर्याचे उपासक असतात. जीवनात जे काही सुंदर आहे त्याकडे यांचा स्वभावतः कल असतो. खिलाडू वृत्ती उपजतच असते. विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे सहज आकृष्ट होतात. दुसर्यांना आकर्षून घेण्याची कला यांना चांगली अवगत असते. जे हवे ते मिळवण्याकडे बरीचशी उर्जा खर्च होते. बर्याचदा संधीचे रुपांतर यशात करण्यात यांचा हातखंडा असतो. संभाषण कला यांना अवगत असते. उत्साहाचा झरा आपल्याला इथे सापडतो. चांदणे शिंपित जाशी चालता तो चंचले म्हटले तर वावगे ठरणार नाही. ओठात आहे प्रेम अन हृदयात आहे प्रीत हि अशी अवस्था असते. जिओ!

३) आयुष्यमान योग: धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना ... आयुष्य म्हणजे एक कविता असते. सर्वार्थाने कृतार्थ आणि दीर्घ आयुष्य यांना लाभते. तुलनेने अधिक सुखी आयुष्य जगतात. आशावादी असतात. दु:खात हि सुख शोधण्याची वृत्ती यांच्या ठाई असते. सुधृढ शरीरयष्टी यांना लाभलेली असते. प्रसंगी कठोरहो होतात. कोणी वाट्याला आलाच तर त्याची धडगत नाही. आर्थिक परिस्थिती चांगली असते. शिस्तशीर आयुष्य जगण्याकडे कल असतो. चांगलं चुंगलं खायला खूप आवडतं. घेतलेलं काम तडीस नेतात. 

४) सौभाग्य योग: वाग्यज्ञ सतत चालू असतो. सामान्य बोलण्यातही विशिष्ट लकब, अविर्भाव असतो. बोलताना शब्दयोजना चांगली असते. सुगंध आवडतो. छान सुवासिक फुलं, अत्तर इ गोष्टींची उपजतच आवड असते. चांगल्या मार्गाने आणि मेहनतीने यश, प्रतिष्ठा, संपत्ती मिळवतात. काही वैशिष्ट्यपूर्ण कला असण्याची शक्यता असते. विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे सहज आकर्षित होतात. जनमानस यांच्यावर खुश असते. आपल्या अंगभूत गुणांनी किंवा कला आविष्काराने इतरांची वाहवा मिळवतात. एकूणच नशीबवान, भाग्यवान असतात. 

५) शोभन योग: सौंदर्याची खाण आणि आकर्षक व्यक्तिमत्व. हुशार, बुद्धिमान, प्रामाणिक, नैतिकतेला धरून असणारे वर्तन. एखादे काम घेतले कि पूर्ण करणारच. सरळ आणि निर्मल मनाचे लोक. उदात्त विचारसरणी असते. खोटारडेपणा आवडत नाही. मुलांची आवड असते. कुटुंबात रमतात. उत्तम संतती सौख्य लाभते. चिंताच नाही!!

६) अतिगंड योग:एक बर्यापैकी अशुभ योग असून जातकाच्या आईसाठी चांगला नाही. यांच्या एकंदर अनाकलनीय, अनैतिक कर्तुत्वामुळे यांच्या कुटुंबास अनेक प्रकारच्या त्रासातून जावे लागते. अनिर्बंध कामवासना असू शकते. ह्या योगाची शांती करावी हे सांगणे आलेच. सांभाळा!

७) सुकर्मा योग: हाती घेतलेले काम तडीस नेण्याची क्षमता असलेले जातक सुकर्मा योगावर जन्म झालेले असतात. ठराविक काम करण्यासाठी आवश्यक सर्व गुण त्यांच्याजवळ असतात.उद्योग व्यवसाय करण्याकडे स्वाभाविकओढाअसतो.सुस्वभावी व्यक्तिमत्वअसते. धार्मिक वृत्ती असते. त्यांच्या सत्शील स्वभावामुळे लोक त्यांचा आदर करतात. परोपकार करणे. दुसर्यांना मदत करणे आदि सद्गुण उपजतच असतात.

८) धृती योग: एक प्रकारचा सौम्य अशुभ योग असला तरी या योगावर जन्मलेल्या लोकांचा कल शांत जीवन जगण्याकडे असतो. आपल्या चुकांसाठी दुसर्याला जबाबदार धरण्याची वृत्ती काही प्रमाणात आढळते. विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे सहज आकृष्ट होतात. आपले सर्व निर्णय शांत पणे घेतात. सर्व गोष्टींचा सारासार विचार करून मगच योग्य तो निर्णय घेतात. सर्व साधारण निरोगी आयुष्य व्यतीत करतात.

९) शूल योग: सतत अंग दुखी हि एक प्रमुख तक्रार आढळून येते. प्रामाणिक असतात. सत्कर्म करतात. परोपकारी असतात. धार्मिक वृत्ती असते. लेखन कला अवगत असल्यास धार्मिक, अध्यात्मिक प्रकारच लेखन करतात. ऐहिक गोष्टींचाहि तितकाच ओढा असतो. चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवतात. कुठलीही गोष्ट मिळवताना खूप संघर्ष करा लागतो. एक प्रकारचा अशुभ योग असल्याने एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे अशी जीवनभर प्रचीती येते.

१०) गंड योग: अखंड बोलणे हा आपला स्वभाव असतो. दुसर्याच्या मनासारखे बोलून त्याचे मन जिंकणे चांगले जमते. चांगले निगोशिएशन स्किल्स असतात. मधला मार्ग काढून गोष्टी सेटल करण्याकडे कल असतो. अतंस्थ वृत्तींशी एक प्रकारचा स्वतःशीच झगडा सुरु असतो. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे .. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. स्वतःच्या आरोग्याविषयी खूप काळजी घ्यावी लागते. सुधृढ शरीरयष्टी असते. चैनीच्या गोष्टींकडे ओढा असतो. हा एक अशुभ योग असतो.

११) वृद्धी योग: हुशार असतात.विचारांची दिशा  स्पष्ट असते. स्प्राईट च्या जाहिरातीत नाही का म्हटले असते क्लीअर है ! तसं. पटकन मुद्द्यावर येण, खरेपणा, प्रामाणिकपणा हे गुण असतात. आकर्षक व्यक्तिमत्व असते. जीवनात आशावादी असतात. समृद्ध आयुष्य जगतात. सुबत्ता असते. माणसांची उत्तम पारख असते. सद्गुणी आणि सरळ लोकांमध्ये वावर असतो. क्लीअर है !

१२) ध्रुव योग: दुर्दैवाने समाज विरोधी काम करण्यासारखी यांच्या बाबतीत परिस्थिती निर्माण होते. हुशार असतात पण आपल्या अक्कल हुशारीचा उपयोग स्वतःच्या, समाजाच्या उन्नती साठी न करता काहीतरी चुकीचे, बेकायदेशीर करण्यासाठीच करतात. आपल्या वागण्या बोलण्यामुळे अनेक शत्रू निर्माण होतात. मुद्देसूद बोलणे जरी असले तरी त्यामुळे नुकसानच जास्त होते. स्वभाव शांत असतो. परिश्रम पूर्वक पूर्ण क्षमतेने काम पूर्ण करण्याची हातोटी असते. कुंडलीत शुभ ग्रह असतील तर मात्र यांच्या समजूतदार स्वभावामुळे लोकांचे प्रेम यांना लाभते. सव साधारण दीर्घ आयुष्य जगतात.

१३) व्याघात योग: आपल्या स्वभावामुळे लोक आपल्याला मूर्ख बनवतात. काही प्रमाणात अप्रामाणिक असतात. स्वच्छता अभावानेच आढळते. काहीसे खुनशी असतात. दुसर्याविषयी सूड भावना मनात खूप काळ तग धरते. घेतलेले काम तडीस नेतात. एकाच वेळी अनेक काम हातावेगळी करण्याचे कसब आत्मसात करतात. काही वेळा एखाद्या विशिष्ट कामात वाकबगार असतात. काही वैशिष्ट्यपूर्ण अंगभूत गुणांमुळे यांना आयुष्यात प्रसिद्धी आणि यश मिळते.

१४) हर्षन योग : काहीसा कुटील स्वभाव असतो. विश्वासू नसतात. पण नशीबवान असतात. काही ठराविक विषयात कमालीचे निष्णात असतात. एकावेळी अनेक काम करण्यात तरबेज असतात.

१५) वज्र योग: एक अशुभ योग असतो. अशुभ ग्रह योग असेल तरअसे जातक खल प्रवृत्तीचे असतात. शिवराळ भाषा असते. अंगापिंडाने मजबूत. शस्त्र हाताळण्यात निष्णात. अंगमेहनतीची कामे लीलया पार पडतात. धाडसी असतात. कंजूष स्वभाव असतो.