Wednesday, October 7, 2020

ज्योतिष कथा : हार्ट शेप.

 "तो ना सर, म्हणजे ... थोडा ... अहंकारी आहे सर!"

फोनवरचा नेहाचा स्वर भांबावलेला होता. तिला आवडणाऱ्या मुलाचं वर्णन करण्याचा तिचा प्रयत्न कौतुकास्पद होता. एक एक शब्द पॉज घेत घेत तिने वाक्य पूर्ण केलं. तिच्या फोन वर ऐकू येणाऱ्या श्वासाच्या लयीवरून मी ओळखलं, तिला अजून काही सांगायचं होत. मीही ती काही बोलेल म्हणून कान लावून होतो. 

"म्हणजे काय आहे ना सर, तो जरा पैसेवाला आहे ना..... "

आणखी एक पॉज तिने घेतला होता.  

" त्याचे खूप मित्र आणि मैत्रिणी आहेत." 

"म्हणजे आम्हीसुद्धा मित्र आहोत, ... सर घरात खूप कटकट चालली आहे आजकाल .."

"सर खूप वैताग आलाय सगळ्याचा."

आपल्या 'जवळच्या' मित्राविषयी सांगतानाच ट्रॅक चेंज करत तिनं घरातल्या वातावरणाचा विषय काढला.  

नेहाला नेमकं काय सांगायचंय याचा मला अंदाज आलाच होता. २२-२३ वर्षाच्या मुलीला घरात कटकट होणं म्हणजे सोप्पंय, घरच्यांनी वर संशोधन सुरु केलेले आहे, आणि हिचा जीव दुसरीकडेच अडकलाय. बरं जिथे अडकलाय तिथे सांगायची सोय नाही आणि आलेली स्थळ नाकारण्याच्या मनाच्या धोरणामुळे घरचे  व्हीलन झाले आहेत. सर्वच प्रेमात 'पडलेल्यांची' हि गोची होते. अरे ज्याच्यावर प्रेम आहे त्याला हे तुम्ही जो पर्यंत सांगणार नाही तोपर्यंत त्याला कळणार कसं? 

"तो जो तुझा मित्र आहे, तो तुला आवडतो."

"तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे, हे तू मला सुरुवातीलाच सांगितलंस."

"तुझ्या बोलण्यावरून मला असं समजतंय कि तू अजून त्याला लग्नाबद्दल विचारलंच नाही ."

मी आमचं बोलणं आणखी स्पष्ट करत तिला कन्क्लुजनवर आणलं. 

"हो ना सर, पण मी त्याला कसं विचारू?"

"त्याने नकार दिला तर?"

म्हणजे तिची समस्या जेन्युईन होती. त्याने नकार दिला तर? नकार पचवण्याची ताकत आपल्यात नाही हे हि साहजिकच आहे. नेहाच्या मनाची तगमग मी समजू शकत होतो. 

"ठीक आहे, आपण एक काम करू."

"इच्छित व्यक्तीशी लग्न होईल का?" हा प्रश्न मनाशी घे, आपण प्रश्नकुंडली मांडू."

"सर, खरंच मला समजेल - माझं ओंकारशी लग्न होईल कि नाही ते?"

माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच अधीरपणे नेहाने प्रश्न टाकला होता.  

एखाद्या लहान मुलाला अनपेक्षितपणे खाऊ मिळाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर कसे भाव उमटावेत तसं मला नेहाच्या आवाजावरून वाटलं. बऱ्याचदा समोरच्याला आपली समस्याच  मांडता येत नाही. तारुण्य सुलभ संकोच म्हणा किंवा डावलले जाण्याची भीती किंवा आणखी आपली कोणी खिल्ली तर उडवणार नाहीना असं वाटण स्वाभाविकच आहे. 

"अगदी बरोबर म्हणते आहेस."

"प्रश्न कुंडली मांडून आपण एवढे निश्चितच सांगू शकू, कि तुझ्या मनात असलेल्या मुलाशीच तुझं लग्न होई का."

मी हि तिला दुजोरा देत आश्वस्त केलं. 

"म्हणजे माझा विश्वासच बसत नाहीये सर, असं होतं?"

टिळा टिळा दार उघड म्हटल्यावर हळूच कुर कुर आवाज करत गुहेचा दरवाजा आपोआप उघडायला लागल्यावर आपलं काय होईल? मनाची तगमग, हुरहूर जे काही ते मानवी भावनांचे सर्व अविष्कार नेहाच्या फोनवरील आवाजात  ओतप्रोत भरले होते. 

"म्हणजे काय, खरंच बोलतोय मी!" 

तिच्या आवाजाच्या पट्टीशी माझा आवाज जुळवत मी म्हटलं. आता तिची कळी खुलली होती. 

"सर तसं आम्ही खूप गप्पा मारतो फोनवर, व्हाट्स अप वर"

"म्हणजे सर पण तो त्याच्या इतर मैत्रीणींशीपण गप्पा मारत असणार ना." 

"मग कशावरून त्याच्याही मनात मी असेन?"

"सांगा ना सर मी काय करू?"

"काय म्हणजे काय?, त्याला सरळ सांगायचं ... मला तू आवडतोस आपण लग्न करूया का? सिम्पल!"

मी थोडं कमांडिंग मोड मध्ये जात तीला सांगितलं, मला माहित्ये कि ते एवढं सोपं नसत, पण आपल्याकडे दुसरा काय पर्याय असतो?

मनाची हि सैरभैर अवस्था, गोंधळ , अगतिकता यावर उपाय असूनही तो अमलात आणणे म्हणजे महा कर्मकठीण होऊन बसतं. आता मला हे जास्त ताणून धरणं नको वाटत होतं. म्हणून मी म्हटलं, "नेहा, हे पहा तुझ्या घरचे तुझं लग्न ठरवत आहेत. तुझ्या वयाच्या मानाने तुझं लग्न होणं असं घरच्यांना वाटणं हे स्वाभाविक आहे, आणि ते त्यांचं कर्तव्य देखील आहे." 

"खूप मेहनतीने ते तुझ्यासाठी स्थळ शोधतात आणि तू काही कारण देऊन नकार देतेस, मग कटकट होणारच."

"तू निर्णय घेऊ शकत नाहीस कारण तुझं मन इथे गुंतलय."

"म्हणजे जो पर्यंत तुला इथे काही ठाम समजत नाही तो पर्यंत तुला घरच्यांना काही सांगता येत नाही."

"याचा अर्थ आधी ओंकारला विचार, तो जर हो म्हणाला तर प्रश्नच मिटला."

"तो जर नाही म्हणाला, तर तुझी तू मोकळी पुढचे डिसिजन घेण्यासाठी."

"आणि तुला जमत नसेल तर तुमच्या एखाद्या कॉमन फ्रेंडला मध्यस्ती करुदे".

"शिवाय प्रश्न कुंडली मांडून मी तुला सांगेनच कि - त्याच्याशी लग्न होईल कि नाही ते."

"एकदा प्रश्न कुंडलीद्वारे होकार आला तर यु कॅन गो अहेड !!"

"पण पुढाकार मात्र तुला घ्यायलाच पाहिजे,  धिस इज द सोल्युशन."

थोडक्यात पुढचा कोर्स ऑफ ऍक्शन मी तीला दिला होता. 

"हो सर, प्लिज मांडा ना प्रश्न कुंडली..... " 

प्रश्न कुंडली मांडण्यासाठी मी तीला सर्व आवश्यक सूचना दिल्या आणि तिच्याकडून नंबर घेतला - ५७ आणि प्रश्न कुंडली तयार केली. माझं अनालिसिस सुरूच होतं. २-३ मिनिट झाली असतील, "सर झालं का?" नेहाने अधीर होतं विचारलं." 

"सर, सांगा ना प्लिज". 

२-५ मिनिटे झाली, मी हि खुश होतो. प्रश्न कुंडली कडून हवा तो कौल मिळाला होता. 

"ऐकतेस ना?"

"हो.. हो सर .. काय झालं ?"

नेहाला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं, मी अजून १०-१२ सेकंड पॉज घेत फुटेज घेत होतो. 

शेवटी मी म्हटलं, "येस्स नेहा, तुझ्या मनात असलेल्या मुलाशीच तुझं लग्न होणार."

"सर, पण असं खरंच होतं?"

अजूनही तिचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.

मी तीला नियम सांगितला, "अगं, सोपं आहे. प्रश्नकुंडलीत विवाह स्थान म्हणजे सप्तम स्थान. सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी किंवा उपनक्षत्रस्वामीचा नक्षत्रस्वामी दोहोंपैकी कोणीतरी एक स्थिर राशीत असेल तसेच २, ७, ११ यापैकी एकातरी भावाचा कार्येश असेल तर इच्छित व्यक्तीशी विवाह होईल."

"या प्रश्न कुंडलीत सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी गुरु आहे तो धनु या द्विस्वभाव राशीत आहे. गुरूचा नक्षत्रस्वामी शुक्र आहे जो सिंह ह्या स्थिर राशीत आहे. शिवाय गुरु आणि शुक्र दोघेही २, ७ ,११ स्थानांचे कार्येश होतं आहेत. याचा अर्थ प्रश्नवेळी तुझ्या मनात असलेल्या व्यक्तीशीच तुझं लग्न होणारच... " शिवाय विवाहकारक गुरु आणि वैवाहिक सौख्याचा कारक शुक्र हे दोन शुभ ग्रह कुडंलीशी संबंधित आहेत.. म्हणजे १००% होणार .."

"थँक यु सो मच सर, मी आता नक्कीच ओंकारला विचारेन ."

अवश्य, कीप मी इन लूप .. बाकी पुढे आहेच कि मी काही प्रॉब्लेम आलाच तर. 

मोठ्या समाधानानं तिनं फोन ठेवला. 

तासाभरापूर्वी बाहेर पावसाची रीप रीप चालू होती. आता पाहिलं तर लक्ख ऊन पडलं होतं. त्या उन्हाचे कवडसे खिडकीतला माझ्या टेबलवर पडले होते. टेबलावरच्या कागदांवर नुकताच काढून ठेवलेला माझ्या चष्म्यातून पार झालेल्या कवडशांची सुंदर नक्षी कागदावर निर्माण झाली होती .. मी जरा निरखून पाहिलं तर तो बदाम होता. हार्ट शेप. 





ज्योतिष लेख : न जुळलेल्या मनांच्या तारा.

 

बस आता घाटातून चालली होती. वातावरणात गारवा जाणवायला लागला होता. दूर पूर्वेला सूर्य उगवत होता. पक्ष्यांचे कुंजन, चोहीकडे उंच हिरवे डोंगर कडे. दाट झाडी आणि धुकं. बस महाबळेश्वर मध्ये प्रवेश करत होती. उल्हसित मनात हनीमूनच्या एकेक विचारांनी अमोलच्या मनात गुदगुल्या होत होत्या. बाहेर अजून थोडा अंधार होता. बस मध्येही सर्व अद्याप झोपेत होते. शेजारीच बसलेल्या मीनलच्या कानाच्या पाळीचा हलका चावा घेत अमोलने तिला जागं करण्याचा प्रयत्न केला. "मिनू, उठ." "महाबळेश्वर आलं". "बाहेर बघ, काय मस्त वातावरण आहे." त्याला वाटलं, मीनल त्याच्या अजून कुशीत शिरण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या गालावर आपला गाल हळुवारपणे घासत लाडात येत म्हणेल, "म्म्म झोपूदे ना अमु! " मग तो हि तिला अजून घट्ट जवळ ओढून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवत म्हणेल, "मिनू... ..... , चल आता लवकरच हॉटेलही येईल." ....................... अमोलने मिनलच्या कानाच्या पाळीचा हळुवार चावा घेण्याचा प्रयत्न करताच क्षणी मीनल उसळली. "आई ग .... के... ...... काय धसमुसळ्या आहेस रे तू." काय नुसता बघ्घाव तेव्हा अंगचटीला येत असतोस. येणारच आहे ना ते तुझं महाबळेश्वर, थंडी काय कधी अनुभवली नाहीस काय? शी बाबा, जरा कुठे आरामात झोपावं तर तुझी भुणभुण सुरु, उठ उठ .. उठ उठ... अमोल काहीच बोलला नाही. रस्त्यावर काही अंतर बरेच खड्डे होते. त्या खड्ड्यांतून जाताना बसलेले हादरे अमोलला जसे जाणवलंच नाही. त्याच्या मनाला बसलेले हादरे पुरेसे होते. मीनल त्याच्यापासून अजूनच दूर सरकून बसली होती. खिडकीवर डोकं टेकत डोळे बंद करून तिला आणखी काही वेळ झोपायचं होत. बाहेरच्या वातावरणाशी तिला काही घेणं देणं नव्हतं. तिच्यासाठी तो नेहमीचाच दिवस होता. बाहेर दिवस उगवत होता आणि अमोलच्या मनात रात्र अजून गडद होत होती...........

बऱ्याच कपल्स मध्ये हे असे किंवा अशासारखे प्रसंग घडत असतात. आणि अशा प्रसंगांची मालिका सुरु झाली कि नातं कधी तुटण्याच्या मार्गावर येत ते कळत नाही. वैवाहिक सुखाचा कारक शुक्र जर कुंडलीत बिघडला असेल, कुंडलीतले सप्तम स्थान किंवा सप्तमेश बिघडला असेल तर असं होतं. म्हणून कुंडली जुळवताना फक्त गुण नाहीत ग्रह मैत्री, नक्षत्र मैत्री, स्वभाव थोडक्यात एकमेकांची कॉम्पॅटिबिलिटी मेन म्हणजे कुंडलीतील शुक्र, गुरु, मंगळ हे ग्रह अभ्यासणे महत्वाचे ठरते. त्यातूनही असे अनुभव येत असतील तर ज्योतिष शास्त्रीय उपायांची कास धरणे अगत्याचे, उदा. रत्न, रुद्राक्ष, ग्रह शांती आणि महत्वाचं म्हणजे मंत्रोपासना. एखादा तंतू वाद्य परफॉर्म करणारा वादक जसा आपल्या वाद्याच्या तारा खेचून ताणून व्यवस्थित ठेवतो तसाच कुंडलीतील बिघडलेले ग्रह ज्योतिष उपाय व उपासनेमुळे 'ठीक' करता येतात.


ज्योतिषी आमोद विष्णू ननावरे (७७०९५९४९०२)

Saturday, August 1, 2020

मंत्र: मनपसंत पती मिळून विवाह जुळून येण्यासाठी


नमस्कार माउलीनो,

उपवर मुलीच्या मनात असतच, आपल्याला मनपसंत पतीची प्राप्ती व्हावी. विवाह सुस्थळी व्हावा. मुख्य म्हणजे वेळेत व्हावा. सर्व निर्विघ्नपणे पार पडावे. कुंडलीमध्ये असे काही ग्रह योग  असतात ज्यामुळे योग्य वयात विवाह होत नाही. विवाह ठरल्यावरही काही विघ्न येत असतात. ठरलेला विवाह मोडतो. बरीच संकटे येतात. या सर्वातून लाभ होण्यासाठी उपवर मुलीनी खालील मंत्र साधना करावी. विवाहित महिलांनीहि खालील साधना करण्यास हरकत नाही, जेव्हा तुम्हाला तुमच्या पतीचे प्रेम मिळवायचं असत. पती पत्नीमध्ये बेबनाव झाला असेल, पतीचे दुसऱ्या कोण महिला किंवा मुलीशी संबंध असतील, पती तुमच ऐकत नसेल असा वेळी हि साधना नक्कीच लाभदायक ठरेल. (३ माळा जप सलग ४३ दिवस करायचा.)

१) ठराविक वेळ निवडा. एकदा निवडली कि त्यात शक्यतो बदल करू नका.
२) घरातील ठराविक शांत जागा निवडा. मग त्यात बदल करू नका.
३) त्या जागेवर एखादे आसन अंथरा.
४) तुळशीच्या मण्यांची माळ विकत आणा.
५) छानसा धूप लावा (गुग्गुळ किंवा लोभान)
६) तुपाचा दिवा लावा
७) खालील मंत्राचा ३ माळा जप करा. (विवाह होई पर्यंत)

मंत्र:

हे देवी शंकरार्धांगी | यथा त्वं शंकर प्रिया | तथा मां कुरु कल्याणी, कांत कान्ताम सुदुर्लभाम ||

मंत्र : सुधारतील सासू व सुनेचे कौटुंबिक संबंध. निर्माण होईल जिव्हाळा.


नमस्कार माउलींनो,

घर घर कि महाभारत आपण ज्याला म्हणतो, सासू सून संबंध हे बऱ्याच कुटुंबात बिघडलेले असतात. नव विवाहित सून, तिशी - चाळीशीतल्या महिला किंवा वृद्ध सासू तसेच पुरुष मंडळी यात विनाकारण भरडले जातात. घरातलं कौटुंबिक वातावरण बिघडते. बऱ्याचदा सासूला किंवा सुनेला मनापासून वाटत आपले आपल्या सुनेशी किंवा सासूशी संबंध चांगले राहावेत, घरात शांतता सुख आणि समृद्धी नांदावी पण कुणाच्यातरी स्वभावामुळे, सवयीमुळे किंवा जीवनशैलीमुळे दोन व्यक्तीमध्ये सुसंवाद राहत नाही. कालांतराने दुरावा निर्माण होतो. हे सर्व आपण नक्कीच टाळू शकतो. कुटुंबात शांती नांदावी. परस्परात मेळ राहावा म्हणून सासू व सून दोघीही किंवा कुणीतरी एक खालील मंत्र उपासना करू शकते. मंत्र उपासनेमुळे नक्कीच फरक पडतो. अगदी स्वतः उपासना करून रोकडा प्रचीती घ्यावी.

सोप आहे, दिवसभरातली ठराविक वेळ निवडा. घरातील शांत जागा निवडा. एखादे आसन अंथरा. छानसा धूप लावा. तुपाचा दिवा लावा आणि खालील मंत्र ३१ वेळा स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणा. असे सलग ४३ दिवस करा. ८-१५ दिवसात कौटुंबिक वातावरणात फरक वाटायला सुरुवात होईल हे नक्की. एकदा वेळ आणि जागा निवडली कि त्यात बदल करू नका.

मंत्र :
==========================================
|| श्री राम ||

धर्म की माता बनकर कैकयी ने वरदान लिया |
श्री राम को वनवा हुआ |
श्री दशरथ को दुख साथ हुआ |
सीता जी भी चली वनमे |
सास ससुर को पछताताप हुआ |
सास ससुर करे प्यार बहुसे भाव अपार हुआ |
बहु चली वनमे सास ससुर विभाव दर्द हुआ |
सास ससुर जगमे बहुसे प्यार करे |
यह धर्म पुण्य का सार हुआ |
जो माने शक्ती राम की पुण्य स्वीकार हुआ |

|| जय श्री राम ||

=========================================
शुभम भवतु ||

टीप : आपणास लाभ झाल्यास अनुभव नक्की कळवायला विसरू नका. 

Sunday, May 17, 2020

कलियुगातील महामंत्र - 'श्री स्वामी समर्थ' आणि त्याचे मंत्र विज्ञान.


मननात त्रायते इति मंत्र... शब्दांची विशिष्ठ मांडणी म्हणजे मंत्र. याविषयी एक संस्कृत वचन आहे. अमंत्रमक्षरम नास्ति, नास्ति मुलमनौशधम | अयोग्य पुरुषः नास्ति, योजक तत्र दुर्लभः || याचा अर्थ असा कि अमंत्र असे अक्षर नाही. औषधी नाही असे वनस्पतीचे मुळ नाही. अयोग्य असा कोणी पुरुष नाही. वास्तविक योग्य मंत्र, औषधी, गुणी माणूस परखणारा मात्र दुर्लभ आहे. म्हणून असे म्हणता येईल कि आपण जे जे म्हणून उच्चारतो ते प्रत्येक अक्षर, तो प्रत्येक शब्द हा मंत्रच असतो. मंत्र म्हणजे मुमुक्षु आणि साधकांचा जिव्हाळ्याचा विषय. अनेक जण आजही चाचपडत आहेत. ईश्वराच्या साधनेसाठी, वैयक्तिक उपासनेसाठी कोणती मंत्र साधना करावी हा प्रश्न अनेकांना पडतो. मंत्र हा गुरुकडून घ्यावा असा प्रघात आहे. पण योग्य गुरु मिळणे हि गोष्ट आज दुरापास्त झाली आहे. जरी मिळाला तरी त्या व्यक्तीवर गुरुतुल्य श्रद्धा निर्माण होणे कठीण. पुन्हा अनेक तथा कथित बुवा, बाबा, अण्णा, बापू, दादा अशा लोकांनी भक्तीचा बाजार मांडला आहे ते वेगळच. मग अशा परिस्थितीत करायचं काय? याच उत्तर अगदी सोप्प आहे. श्री गोंदवलेकर महाराजांनी यावर अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. स्वतःची पात्रता वाढवा. शिष्य हाहि अधिकारीच असावा नाहीका! खरा सद्गुरू कोणाही सोम्यागोम्याला शिष्यत्व देत नाहीत, किंवा कोणाही अनधिकारी व्यक्तीला शिष्यत्व प्रदान करत नाहीत. येथे पाहिजेत जातीचे.  शिष्याची परीक्षा होतेच. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोध या ग्रंथात उत्तम शिष्याची लक्षण सांगितली आहेत. त्या तपशिला जाण्याचा सध्या आपल्या या लेखाचा विषय नाही पण साधना, उपासना, धार्मिकता याविषयी सध्या जो प्रचंड गोंधळ मनात झाला आहे त्याच निराकरण करणे गरजेचे वाटते. साधना मार्गातही अनेक मत मतांतरे आहेत. साधनेच्या सुरुवातीच्या अवस्थेत कोणत्या देवतेची उपासना करावी या संबंधी साधकाच्या मनात संभ्रम असतो.  मुळात आपल्याला नेमके काय हवे हेच कळत नसते. तत्कालीन सुखाची प्राप्ती व्हावी. मनोकामना पूर्ण व्हावी. संसारिक अडचणींचे निवारण व्हावे यासाठी उपासना किंवा भक्तीचा मार्ग सुरुवातीला अनुसरला जातो. पण साधनेचे, भक्तीचे, उपासनेचे अंतिम ध्येय हे 'परमात्म प्राप्ती' असावे हि जाण कालांतराने येते. अशाच या साधनेच्या सुरुवातीच्या अवस्थेत उपासनेचे विविध मार्ग सुचवणारे अनेक जण भेटतात त्यातून मग कोणी कृष्ण भक्त आहे. कोणी राम भक्त. कोणी हनुमान उपासक आहे तर कोणी दत्त भक्तीत लीन. कोणी गणपती बाप्पा मोरया म्हणणारे तर कोणी शिव भक्त. पण बरेच जण असेही आहेत जे सोमवारी शिव भक्तीत रममाण असतात तर मंगळवारी श्री गणेशच्या मंदिरात रांगा लावतात. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, हरिहर, शैव, महानुभाव, नाना संप्रदाय आणि नाना मार्ग. सामान्य माणसाचा गोंधळ हा होणारच. वास्तविक हे सर्व संप्रदाय, पंथ, मठ, मंदिर, उपासना पद्धती या एकाच सूर्याची अनेक किरणे आहेत. या सर्वातून एकच ईश्वर - आई जगदंबा आदिशक्ती कार्य करते. म्हणून हे आवर्जून निवेदन करावेसे वाटते कि यापैकी एखादाच मार्ग निवडा पण एकदा निवडला कि धरसोड नको. आज ब्र्ह्मकुमारीज च्या प्रवचनाला जाऊन बसलो, परवा बैठकीला जाऊन आलो यामुळे निष्पन्न काहीच होणार नाही उलट अध्यात्मिक आणि मानसिक गोंधळ वाढेल. प.पु. मुंगळे महाराजांनी आपल्या एका ग्रंथात असे प्रतिपादन केले आहे कि साधकाच्या आयुष्यात एकच उपास्य दैवत असावे. एकच मंत्र. एकच ग्रंथ आणि एकच जप माळ. अक्कलकोट स्वामी महाराजही म्हणतात 'भजावे एका देवास'.  भक्तिमार्ग हा त्यातल्या त्यात सोपा आहे, कारण त्यामुळे सामान्य प्रापंचिक माणसाला आपली विहित कर्तव्यकर्मे करीत असतानाच आराध्य दैवताच्या उपसानेद्वारे आपले अंतिम ध्येय साध्य करता येते. ज्ञानेश्वरीत माउली म्हणतात - 

अगा जया जे विहित | ते ईश्वराचे मनोगत | ते करता निभ्रांत | सापडेची तो || ज्ञा. १८.९११ ||

विहित कर्मे निष्काम भावनेने करीत भक्तिमार्गाची वाटचाल केली तर भगवत कृपेची प्राप्ती निश्चित होते. पण हि वाटही सोपी नाही. माउली हरिपाठात म्हणतात, 

पारियाचा रवा घेता भूमीवरी | यत्न परोपरी साधन तैसे|| हरी. १२.३||

जमिनीवर सांडलेला पारा जसा महत्प्रयासाने गोळा करता येतो तसे भगवंताची प्राप्ती होण्यासाठी नेटाने प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात रोज येणाऱ्या अडचणी, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्यांशी झगडत वाट काढावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, 

रात्रंदिन आह्मां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥ जिवाही अगोज पडती आघात । येऊनिया नित्य नित्य करि ॥२॥ तुका ह्मणे तुझ्या नामाचिया बळे । अवघीयांचे काळे केले तोंड ॥

म्हणून असे म्हणता येईल कि अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग म्हणजे नामस्मरण.  भगवान पूर्ण ब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण भक्तांसाठी  महामंत्र म्हणजे - ' श्री स्वामी समर्थ' 
लेखाच्या सुरवातीला जो उल्लेख आला आहे कि आपण जे बोलतो ते प्रत्येक अक्षर म्हणजे मंत्र, प्रत्येक शब्द म्हणजे मंत्र हे समजून सांगण्यासाठी एक उदाहरण देतो. मंत्र जेव्हा पठण केला जातो त्यावेळी आपल्या कंठातल्या स्वर यंत्रातून एक विशिष्ठ ध्वनी निर्माण होऊन आपल्या मुखातून बाहेर पडतो. ध्वनीमुळे स्पंदन निर्माण होतात. या स्पंदनांमुळे आपल्या शरीरावर, सूक्ष्म शरीरावर, शरीरातील ग्रंथींवर सुपरिणाम होतो व अपेक्षित परिणाम साध्य होतो. जसे बाळाला शु येत नसेल तर आई तोंडाने श श श असा आवाज करते, त्याबरोबर बाळाला शु होते. खरेतर श हे अक्षरच इथे मंत्राचे काम करते. श हे बीजाक्षर आहे जे शरीरातील मूलाधार चक्राला उद्दिपीत करते. हे मूलाधार चक्र आपल्या शरीरात शु शी च्या जागी असते. आता समजा कोणी तुम्हाला शिवी दिली तर काय होईल? आपल्याला राग येईल. आपणही शिवीगाळ सुरु करू. प्रसंग विकोपालाहि जाऊ शकतो. याचा अर्थ विशिष्ठ शब्द व त्याचा अर्थ आपल्या मानस पिंडावर, शरीरावर, मनावर परिणाम करतो. शाळेत आपण सर्वच बाराखडी शिकलो. त्यात मुळाक्षरे आणि व्यंजनांचा आपण अभ्यास केला तीच मुळाक्षरे जसे अ आ इ, क ख, ग घ , प फ ब भ .. इत्यादी बीजाक्षरे आहेत. प्रत्येक अक्षराचे मंत्र शास्त्राच्या दृष्टीने विशेष असे महत्व आहे. बीज हा शब्दच अर्थपूर्ण आहे. एका बिजामधुनच विश्वाची उत्पत्ती होते. एक बीज पेरले कि कि ते जसे अनंत पटीने परतफेड करते म्हणून बीज मंत्राचे सामर्थ्य प्रचंड आहे. म्हणून मंत्रशास्त्राच्या आधारे 'श्री स्वामी समर्थ' या मंत्राचा अर्थ आपण जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ यामागील मंत्राचे विज्ञान जाणून घेऊया. 
श्री स्वामी समर्थ या महामंत्रात अनेक बीजाक्षरे आहेत ती पुढील प्रमाणे. 'स + र + इ  = श्री (इथे एक महत्वाचे सांगायचे आहे श्री चा उच्चार आपण अजाणतेपणी श+र+इ असा करतो. तो तसा करू नये.) स +व+आ+म+इ = स्वामी. स+म+र+थ=समर्थ, त्याच बरोबर अ आणि आ हि बीजाक्षरे देखील ह्यात समाविष्ट होतात.
अ - अनादी, अनंत, अविनाशी ईश्वरी तत्व ज्यात सामावले आहे ते बीजाक्षर म्हणजे अ. याची स्पंदने संरक्षक असतात. स्मरणशक्तीला चालना देणारी असतात. ज्ञान, बुद्धी, नवनिर्माणाची क्षमता वाढवणाऱ्या मज्जातन्तुना उद्दिप्तीत करतात. याच्या सतत उच्चारामुळे स्मरणशक्ती वाढते. नेतृत्व गुणांना चालना मिळते. मान, सन्मान, प्रतिष्ठा जपण्याकडे कल वाढतो. सर्वश्रेष्ठ मानला गेलेला मंत्र ओम याची सुरुवात अ पासूनच होते नाही का. आ - निर्मळ, निरागस प्रेम व्यक्त करण्याकरिता आ या व्यंजनाचा वापर होतो. आपण  आपल्नाया जवळच्या  मित्राला नाहीका, मित्रा - गड्या  अशी हाक मारतो. पंकजचा पक्या, परेशचा परश्या हे त्या प्रेमभावनेतूनच होते. याच प्रेम  भावनेला, ममत्व भावेनेला खतपाणी घालणारे बीजाक्षर म्हणजे आ. जीवाभावाचे मैत्र निर्माण करणारे, संरक्षक पालकत्वाची भावना निर्माण करणारे हे बीजाक्षर म्हणूनच आपल्या मराठी भाषेत वयाने वडील असणाऱ्या व्यक्तींना आपण मामा, काका, दादा इ संबोधन वापरतो. अ मधील बुद्धी ज्ञान आणि संरक्षण आ मध्ये जास्त वृद्धिंगत होते. शाश्वत आनंदाचे आगर म्हणजे आ हे बीजाक्षर. आणि म्हणूनच आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती जिला आपण आई म्हणून हाक मारतो. त्याच आई यातले इ हे बीजाक्षर शक्ती निर्मितेचे कार्य करते. पण हि शक्ती अशी आहे कि जी प्रत्यक्षात कार्यान्वित झालेली नाही. इ ची स्पंदने आपल्या बुद्धी, स्मृती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती जागृत करणाऱ्या मेंदूतील केंद्रांना उद्दीपित करते. मेंदूच्या सर्व कार्यांना चालना देण्यासाठी, त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी इ या बीजमंत्राच्या जपाचा प्रचंड फायदा होतो. इ हे बुद्धीबीज असल्याने बुद्धिदेवता, ज्ञान देवता, स्मृती देवता भगवती सरस्वती मातेचा बीजमंत्र 'ऐं' - अ+इ+म यामध्ये इ चा समावेश आहेच. दृढ  इच्छा शक्ती विकसित करण्यासाठी इ ह्या बिजाक्षाराचा उपयोग होतो. आपण आता 'र' या बीज मंत्राचा विचार करूया. अग्नी तत्वाचे, तेज तत्वाचे कारक म्हणजे 'र' हे बीजाक्षर. पंच ज्ञानेन्द्रीयांपैकी दृष्टी या ज्ञानेंद्रियाची क्षमता वाढवणारे 'र' हे बीजाक्षर आहे. नेत्र विकारांवर 'र' ह्या बीजमंत्राचा सतत उच्चार उपकारक ठरतो. 'र' ह्या बिजाक्षरामुळे अध्यात्माची, तपाची, साधनेची ओढ निर्माण होते. सर्व पापांचे निराकरण होते. श्री राम, हरे राम हरे राम राम राम हरे हरे ... इ मंत्रांमध्ये 'र' बीजमंत्राचा झालेला वापर हेच दर्शवतो. र या बिजाक्षरापासून निर्माण झालेला 'रां'  या मंत्रासंबंधी सुद्धा भगवान शिवाने देवी पार्वतीला हेच प्रतिपादन केले होते कि केवळ 'रां' या मंत्राच्या पठणामुळे संपूर्ण विष्णूसहस्त्र नाम स्तोत्राच्या पठणाचे फळ मिळते. साधनेचे तेज धारण करण्यासाठी 'र' ह्या बीज मंत्राचे  पठण उपयुक्त ठरते. श्री स्वामी समर्थ महामंत्रात समाविष्ट असलेले आणखी एक बीजाक्षर म्हणजे 'व'. हे जल तत्वाचे कारक हे. साधनेसाठी, तपासाठी, कुठलेही कार्य करण्यासाठी मनोबल तर आवश्यक असतेच पण त्याच बरोबर त्या कामाप्रती निष्ठा हि महत्वाची. पराक्रमाला भावनेची साथ लाभणे महत्वाचे. आपल्यातली भावुकता वाढवण्याचे काम 'व' हे बीजाक्षर करते. स्वामींची पूजा अर्चना करताना भक्त बरेचदा सद्गदित होतात. डोळ्यातून अश्रुपात होतो. एक वेगळीच अध्यात्मिक अनुभूती येते त्याचे रहस्य म्हणजे 'व' हे बीजाक्षर. शरीरांतर्गत सप्त चक्रांपैकी अनाहत चक्र उद्दीपित होते. ह्रदय, पचनसंस्था, मूत्राशय, रक्त इ संबंधी विकार बरे होतात. शिवाय 'व' हे बीजाक्षर लक्ष्मी कारक, संपत्ती कारक, समृद्धीकारक आहे. 'व' बिजाक्षाराच्या सततच्या पठणामुळे वाचासिद्धी प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ या महामंत्राची सुरुवातच 'स' या बिजाक्षाराने होते. 'स' हे पृथ्वी तत्वाचे बीजाक्षर आहे. 'स' हे कामनापुर्तीचे बीजाक्षर आहे. सृजनाचे कारक आहे. 'स' ची स्पंदने हि तृप्तीची स्पंदने आहेत. समाधानाची स्पंदने आहेत. सकारात्मक आहेत. नाथ पंथ पुरस्कृत शबरी विद्येतील अनेक मंत्रात 'स' हे बीजाक्षर समाविष्ट  झालेले आढळते. श्री स्वामी समर्थ या महामंत्रात सुद्धा 'स' हे बीजाक्षर ३ वेळा येते, हे हि नसे थोडके. प्रातःकाली स्नान झाल्यावर नुसती स ची बाराखडी १६ वेळा म्हणावी असे वर्षभर तरी करावे, पहा अनुभव घ्या... मनःशांती, समाधान, समृद्धी जीवनात प्रवेश करती होते. श्री स्वामी समर्थ या महामंत्रातील शेवटचे बीजाक्षर म्हणजे 'थ'. पृथ्वी तत्वाचे  हे बीजाक्षर सर्व शुद्धीकारक आहे. लक्ष्मी दायक आहे. कामवासना नियंत्रित करणारे, स्थिरत्व प्रदान करणारे आहे. आता आपण श्री स्वामी समर्थ या महामंत्रातील महत्वाच्या 'म' या बिजाक्षाराचा विचार करू. 'म' म्हणजे आकाश तत्व. 'म' म्हणजे अथांग. शांतता. तृप्तीची परिसीमा. प्रत्येक देवतेच्या मंत्रात शेवट नमः ने होतो. अध्यात्मिक प्रगती, सिद्धी, प्रतिष्ठा, साहित्य लेखन, अभिनय , गायन या क्षेत्रात उपयुक्त. कुंडलिनी जागृती, ध्यान धारणा, साधना स्तोत्रपाठ इ साठी उपयुक्त. मंत्र राज ओम सुद्धा शेवटी 'म'कारात लोप पावतो. 'म' हे तारक बीज असल्याची अनुभूती येते. अशाप्रकारे आपण श्री स्वामी समर्थ या महामंत्रातील प्रत्येक बिजाक्षराचे मंत्र विज्ञान जाणून घेतले, म्हणूनच श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करणाऱ्या साधकांच्या जीवनात प्रापंचिक आणि पारमार्थिक प्रगती होतेच होते. लौकिक जीवनाचे सोने करून पारमार्थिक जीवनाला स्वामींच्या कृपेचा परीस स्पर्श अनुभूत चारही पुरुषार्थ साध्य करत आयुष्याचे सार्थक करून देणारा हा महामंत्र समस्त स्वामी भक्तांनी अखंड पठन करत राहावा हि सदिच्छा व्यक्त करत लेखणीला विराम देतो.  अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थार्पणमस्तू .



Wednesday, April 22, 2020

ज्योतिष लेख : मला बाळ होईल का? भाग ३


नमस्कार वाचकहो,

मला बाळ होईल का? या लेखाचे २ भाग प्रकाशित केले त्यांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. हे लेख प्रकाशित केल्यानंतर मला अनेक जणांनी संपर्क केला. त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे येथे देण्याचा प्रयत्न करतो.. मुळात संतती सौख्य हा विषय तसा खूप विस्तृत आहे. बऱ्याच जणांनी फक्त लग्न कुंडली आधारे संतती संबंधी प्रश्न विचारले, इथे एक नमूद करावेसे वाटते कि ज्योतिष शास्त्रांतर्गत विचारला गेलेला कुठलाही प्रश्न हा केवळ जन्म लग्न कुंडली वरून सोडवता येत नाही. तसे कोणी करत असेल तर त्या ज्योतिर्विदांना स्पष्टपणे विचारावे आपण ज्योतिष कुठे शिकलात? असो. संतती संबंधी कोणताही प्रश्न पाहण्यासाठी जन्म लग्न कुंडलीतील पंचम स्थान, पंचम स्थानातील ग्रह, त्या ग्रहांची राशिगत, नक्षत्रगत, नवांशगत (यासाठी नवमांश कुंडलीचा अभ्यास करावा लागतो.) स्थिती असेच त्या ग्रहांची जन्म लग्न कुंडलीतील इतर ग्रहांबरोबर झालेले शुभ अशुभ योग तसेच पंचम स्थानावर असलेली इतर ग्रहांची दृष्टी या गोष्टी अभ्यासाव्या लागतात. त्याचबरोबर पंचमेशाची स्थितीही वरील प्रमाणे अभासावी लागते. त्याचबरोबर तत्कालीन महादशा, अंतर्दशा व गोचर याचाही अभ्यास करावा लागतो, पुन्हा कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे अभ्यास करावयाचा तर ती एक आणखी वेगळी प्रोसेस आहे. पंचम स्थानाचा सब कसा कार्येश झाला आहे ते पाहणे. तत्कालीन महादशा अंतर्दशा स्वामी कसे कार्येश झाले आहेत ते पाहणे. हे असे सखोल विश्लेषण करून मगच फलादेश देता येतो. संतती होईल का? संतती सौख्य देईल का? संतती योग कधी आहेत? संतती होत नसल्यास त्याची शास्त्रीय करणे काय आहेत? त्यासाठी काय उपाय योजना कराव्यात? पितृदोष, सर्पदोष, वास्तुदोष, इ कारणामुळे संतती प्राप्तीत अडथळे येतात. बरे उपायहि काय करावेत ते प्रत्येक कुंडलीप्रमाणे भिन्न असतात. एकच उपाय सरसकट सर्वांनाच फलदायक होत नाही. समजा मंत्रोपासना करायची असेल तर ती व्यक्तीच्या जन्म लग्न, राशी, नक्षत्राप्रमाणे बदलते. संतती प्राप्ती करिता गुरुचरीत्राचा ३९ वा अध्याय पठण करण्याचा सल्ला दिला जातो, पण सर्वांनाच त्याचा फायदा होणार नाही. कारण प्रत्येक व्यक्तीच्या कुंडली प्रमाणे त्याचे आराध्य वेगवेगळे असते. आपल्या हिंदू धर्म संस्कृती प्रमाणे सर्व दैवत जसे, श्रीराम, हनुमान, देवी, दत्त, श्री गणेश, श्री कृष्ण इ संतती प्राप्ती करिता कृपा करण्यास सक्षम आहेत, पण प्रत्येकाचे पूर्वसुकृत वेगळे, पुण्य पाप व कर्म वेगळे. बऱ्याचदा ज्योतीर्विदाची स्वतःची व्यक्तिगत साधना असते त्याचाही जाताकाला उपयोग होतोच म्हणून तज्ञ ज्योतीर्विदाच्या सल्ल्यानुसार योग्य तो उपाय व उपासना आवर्जून विश्वास, श्रद्धा व निष्ठेने करावी. जाता जाता, संतती संबंधी प्रश्न करिता पती पत्नी दोघांच्या कुंडलीचा अभ्यास करावा. 

शुभम भवतु!!

Sunday, April 19, 2020

ज्योतिष लेख : मला बाळ होईल का? भाग २


नमस्कार वाचकहो,

भाग १ मध्ये आपण पती पत्नी पैकी पत्नीच्या कुंडलीचे विश्लेषण केले. आता आपण पतीच्या कुंडलीचे विश्लेषण करूया. महिलांप्रमाणेच पुरुषांना सुद्धा आपण बाबा व्हाव अस वाटत. साहजिकच आहे, कोणीतरी बाबा म्हणून हाक मारावी, हट्ट करावा अशी इच्छा होण स्वाभाविकच आहे. आपल्या नशिबात संतती योग आहे का? असल्यास कधी? संतती कशी असेल? इ अनेक प्रश्न मनात येतात. चला तर जाणून घेऊया ....

नवमांश कुंडली                                                             

लग्न कुंडली







वरील जन्म लग्न कुंडलीत पंचम स्थानात तरी कुठलाही ग्रह नाही. पंचमेश बुध लाभ स्थानात म्हणजे पंचमेशाची पंचम स्थानावर दृष्टी. लाभ स्थानातील मंगळ व रवीची हि दृष्टी पंचम स्थानावर आहे.  पंचेमेश बुध धनु राशीत मूळ नक्षत्रात वृषभ नवांशात आहे.  बाल अवस्थेतला हा बुध शुभ परिणामांच्या दृष्टीने कुचकामी ठरतो.  म्हणजे पंचमेश बलहीन. संतती कारक गुरु षष्ठ स्थानात कर्क राशीत तुला नवांशात वक्री आहे. वृद्धावस्थेमुळे शुभ फळ देण्यात निरापयोगी म्हणजे गुरुबळ नसलेली कुंडली, ज्या कुंडलीत गुरुबळ नाही अशी कुंडली पराक्रम, शिक्षण. विवाह, संतती, करिअर, व्यवसाय, कामधंदा, घरदार, अशा  सर्व बाबतीत अपयश देते. त्यामुळे या व्यक्तीचे मनासारखे शिक्षण झाले नाही.  मनासारखी नोकरी किंवा व्यवसाय नाही. विवाह अत्यंत उशिरा झाला. चाळीशी उलटली तरी अजून संतती नाही. पुरुषांच्या बाबतीत शुक्र जंतूंचा कारक शुक्र या कुंडलीत दशम स्थानात वृश्चिक राशीत सिंह नवांशात आहे. हा शुक्र वृद्ध अवस्थेत बलहीन आहे. हा एक अत्यंत अशुभ योग होतो. म्हणजे शुक्र बळ नाही. या व्यक्तीने दत्तोपासना केल्यास लाभदायक ठरेल. म्हणजे संतती प्राप्तीच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल ग्रहमान. कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे पाहिल्यास पंचमाचा उपनक्षत्रस्वामी रवी हा लाभ स्थानाबरोबरच चतुर्थ स्थानाचा कार्येश देखील होत आहे. चतुर्थ म्हणजे पंचामाचे व्यय स्थान म्हणजे अडथळाच. रवी शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र सुद्धा चातुर्थाचा कार्येश. संतती साठी आवश्यक २, ५  या स्थानांचा कार्येश नाही. रवीचा उपनक्षत्रस्वामी शनी देखील २,५ किंवा ११ चा कार्येश नसून ४ चा कार्येश होतो. शनी शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र देखील २,५ किंवा ११ चा कार्येश नाही. म्हणजे संततीसाठी ग्रहमान अत्यंत प्रतिकूल. काय करणार आलीय भोगासी असावे सादर. 

पती पत्नी पैकी एकाच्या जरी कुंडलीत संततीचा प्रबळ योग असता तर काहीतरी आशा होती. अशा जोडप्याने सरळ मुल दत्तक घ्याव. तेच काल सुसंगत व उचित ठरेल. तुम्हाला काय वाटत?



Saturday, April 18, 2020

ज्योतिष लेख : मला बाळ होईल का? - भाग १



मानवी जीवनात संततीचे महत्व हे अबाधित असतं. लग्न होऊन फार फार तर २ -३ वर्षांनी सुद्धा मुल होत नसेल तर मात्र सतत एक प्रकारची चिंता काळीज पोखरत राहते. खासकरून एखाद्या महिलेसाठी तर अत्यंत कष्टदायक प्रसंगाला सामोरे जावे लागत. बर बऱ्याचदा असेहो होते कि गर्भ राहतो पण काही वैद्यकीय कारणामुळे गर्भपात करावा लागतो किंवा नैसर्गिकपणे होतो. वारंवार गर्भपात होतो. अशी अनेक दुःखी कष्टी जोडपी आहेत. याची कारण पती पत्नीच्या कुंडलीत निश्चितपणे सापडतात. अशाच पती पत्नीच्या कुंडलीचा आढावा आपण घेणार आहोत. या कुंडलीचे विश्लेषण २ पद्धतीने केले आहे. पारंपारिक व कृष्णमुर्ती पद्धती. संतती संबधी प्रश्न असल्यास फक्त पतीची किंवा पत्नीची कुंडली न पाहता दोघांच्याही पत्रिकेचे एकत्रित विश्लेषण करावे आणि मगच फलादेश द्यावा हे माझं स्पष्ट मत आहे.

गोपनीयतेच्या कारणास्तव जातकाचे नाव येथे नमूद करणे अप्रस्तुत ठरेल म्हणून फक्त जन्म लग्न, नवमांश व कृष्णमुर्ती पद्धतीचे तपशिलच येथे दिले आहेत.

पत्नी : 
                    जन्म लग्न कुंडली                                                    नवमांश कुंडली 




संतती संबंधी कुंडलीचे विश्लेषण करताना प्रामुख्याने पंचम स्थान, पंचम स्थानाचा अधिपती  म्हणजेच पंचमेश. संतती कारक गुरु, तत्कालीन महादशा व अंतर्दशा स्वामी  तसेच पंचम स्थानातील ग्रह विचारात घ्यावेत. कृष्णमुर्ती पद्धतीनुसार पंचम स्थानाचा उपनक्षत्रस्वामी कसा कार्येश झाला आहे ते विचारात घ्यावे. 

सदर महिलेच्या जन्म लग्न कुंडलीत पंचम स्थानात मकर राशीत शुक्र, राहू,  शनी व रवी हे ग्रह आहेत. शुक्र  मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात सिंह नवांशात बाल अवस्थेत आहे.  आता आपण शुक्राचा विचार करू. स्त्रियांच्या कुंडलीत बीजांड, गर्भाशय इ प्रजनन संबंधित अवयव हे शुक्राच्या कारकत्वात येतात. बाल्य अवस्थेमुळे शुक्रासारख्या शुभ ग्रहाचे शुभ परिणाम अत्यंत नगण्य मिळतात थोडक्यात शुक्र बळ नाही. पंचम स्थानातील राहू मकर राशीत, उत्तराषाढा या रवीच्या नक्षत्रात कुंभ नवांशात आहे. हा एक अतिशय अशुभ योग होतो. पंचम स्थानातील राहू सर्पदोष दर्शवतो. सर्प दोषामुळे होणारी संतती जगत नाही.  एक समाधानाची बाब अशी कि हा राहू मृत अवस्थेत असल्यामुळे जातकाचे तितके मोठे नुकसान करत नाही पण अशुभ परिणाम जाणवतात हे खरे. पंचमातील शुक्र, राहू बरोबरच शनी देखील स्वराशीत असला तरी राहू व रवीच्या अंशात्मक युतीत आहे. शनी हा विलंबाचा कारक ग्रह आहे. ज्या स्थानात असेल त्या स्थ्नाच्या कारक फलात विलंब व अडथळे निर्माण करतो. दुर्दैवाची गोष्ट हि कि राहू बरोबर अंशात्मक युती मुळे शापित योग निर्माण होतो. कुंडलीत शनी राहु युती कुठल्याही स्थानात होत असल्यास त्याला प्रेत शाप योग मानला जातो. ज्या स्थानात हा योग असतो त्या स्थानाच्या कारकत्वाची अशुभ फले तीव्रतेने मिळतात. पंचमात शनी राहू युती असता संतती होत नाही. झालीच तर जगत नाही. जगलीच तर दुःखास कारणीभूत होते. मकर राशी कुंभ नावांशातील शनी राहू युतीमुळे बिघडला. पंचम स्थानातील मकर राशीतील रवी मुळातच शत्रू राशीत असल्यामुळे अशुभ फळात वृद्धी करतो त्याच बरोबर तो राहू बरोबर अंशात्मक युतित असल्यामुळे प्रखर असा पितृदोष निर्माण होतो. त्याचबरोबर मकर राशिस्थ रवी कुंभ या बलहीन नवमांशी असल्याने अतिशय तीव्र अशुभयोग निर्माण होतो. आता पंचमेशहि शनीच आहे. संतती कारक गुरु हा जन्म लग्न कुंडलीत कर्क राशीत लाभ स्थानात वृश्चिक नवांशात आहे. गुरु युवावस्थेत वक्री आहे. हि एक जमेची बाजू झाली. कारण लाभातला गुरु पंचम स्थानाची शुभ फले देतो, परंतु हा गुरु केतू बरोबर स्थानगत युतीत आहे, शिवाय शनी, राहू, रवीच्या सप्तम दृष्टीत असल्याने अशुभ योग निर्माण होतो. 

कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे, पंचम स्थानाचा उपनक्षत्रस्वामी हा चंद्र असून तो ४, ६, व ११ स्थानचा कार्येश होतो. चंद्र राहूच्या नक्षत्रात असून राहू ४, ५, १२ य स्थानाचा कार्येश होतो. चंद्राचा उपनक्षत्रस्वामी सूर्य देखील ४ व १२ स्थानाचा कार्येश होतो. रवीचा नक्षत्रस्वामी रविच आहे म्हणून त्याचा उपनक्षत्रस्वामी बुध हा १०, ४ व १ स्थानाचा कार्येश होतो. तसे पहिले असता हे सर्व ग्रह चतुर्थ स्थानाचे बलवान कार्येश होतात. म्हणजे पंचमाच्या व्यय स्थानाचे कार्येश होतात सबब संतती प्राप्तीच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल. सध्या महादशा स्वामीसुद्धा शनीच आहे. अशा या प्रतिकूल ग्राहमानामुळे या माउलीचे दुर्दैवाने ४ वेळा गर्भपात झाले. दशास्वामी शनी व अंतर्दशा स्वामी शुक्र, रवी, बुध व केतू हे पंचम स्थानाचे कार्येश असल्याने त्या त्या दशा अंतर्दशेत गर्भ राहिला पण ..... दुर्दैव आड आलेच. उपाय म्हणून या माउलीने प्रेताशाप दोष, पितृ दोष, केतू गुरु चांडाळ दोष व सर्प दोष या अशुभ योगांची शांती कर्म करून घ्यावीत व गं गणपतये नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. संतती योग आहेतच शिवाय खडतर उपासनेमुळे प्रारब्धयोग निश्चितच सौम्य होतात. आता पतीच्या कुंडलीचे विश्लेषण आपण दुसऱ्या भागात करू. 

||शुभम भवतु||