Tuesday, October 13, 2015

दुःख, त्रास, नुकसान, अपमान, दैन्य, अनारोग्य, आजार.....

दुःख, त्रास, नुकसान, अपमान, दैन्य, अनारोग्य, आजार, गंभीर दुखापत, अपघात, अपयश, सल, मानहानी, फसवणूक, हत्या, बलात्कार, अत्याचार. असा कोण आहे ज्याला हे किंवा ह्यापैकी काहीतरी उभ्या आयुष्यात भोगावं नाही लागलं? आपल्यापैकी सर्वांनाच ह्यापैकी काही तरी सोसावं लागतं. पण कोणालाच हे नकोय. असा काही झालं कि साहजिकच मनस्ताप होतो. संताप होतो. जे काही ह्याकरिता कारणीभूत आहे त्याच्याविषयी पराकोटीचा राग येतो. प्रसंगी आपण आपल्या नशिबाला बोल लावतो. आपल्या आराध्य दैवताला सुद्धा जबाबदार धरतो. अत्यंत निराश होतो. हतबल होतो. शोकमग्न होतो. हल्लीच पेपर मध्ये वाचलं, एका जोडप्याने आत्महत्या केली. पुरेशा वैद्यकीय उपचारा अभावी त्यांचा एकुलता एक मुलगा डेंग्यू मुळे वारला. त्यांना पुत्र शोक सहन नाही झाला. पुण्यात कात्रज भागात एका वृद्धाने आपल्या ६० वर्षाच्या बायकोचा खून केला. कारण काय तर संशय. सर्व प्रकारच्या दुःखात आपण साधारण एकाच प्रकारे प्रतिक्रिया देतो. दुःख कोणालाच नको असतं. दुःखाचे, नैराश्याचे स्तर वेगवेगळे असले तरी त्याचा प्रभाव आणि परिणाम हा प्रत्यकाच्या बाबतीत वेग वेगळा का असतो. कोणी निराश होतो. कोणी हिंसक होतो. कोणी आत्महत्या करतो. कोणी खून करतो. कोणी सन्यस्त होतो. हे असं का? आपल्या शास्त्रात, वेद, पुराण, उपनिषद, श्रमदभागवत वगैरे ग्रंथांमधून याचे उत्तर मिळते. प्रारब्ध. ज्या लोकांचे संचित पुण्य कर्म नसते, ते लोक अशा घटनांमुळे नीच योनीत जन्म घेतात पण ज्या लोकांचे संचित पुण्य कर्म भरपूर असते त्यांच्या जीवनात ते संचित पुण्य कर्म फलित व्हायची वेळ येते. आयुष्यात भक्तीची पहाट होते. साधना मार्गाची ओळख होते. सद्गुरूंचे मार्गदर्शन मिळते. मनुष्य ईश्वर सन्मुख होतो. जो संसार दुःखे दुखावला तोचि अधिकारी झाला परमार्थाचा. असे श्री रामदास स्वामींनी श्री ग्रंथराज दासबोधात प्रतिपादित केले आहेच. हे जग म्हणजे सर्व माया आहे.  Illusion.  आपण सर्व हे जग आणि त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी सत्य धरून चालतो. मन सतत त्याचे चिंतन करत राहते. मी माझे. तो त्याचे. सर्व प्रकारची सुखे आपल्याला हवी असतात. त्या सुखांच्या आड येणारे आपले शत्रू होतात. ती सुखे प्राप्त करण्याकरिता आपण रात्रंदिवस कष्ट करीत राहतो. काय हव असतं आपल्याला ? निरोगी शरीर, शरीराचे सर्व सुखोपभोग. गाद्या गिरद्या, फिरायला गाडी. राबायला नोकर, उंची वस्त्र, रुचकर खाद्य पदार्थ, सुंदर स्त्री, बंगला, आज्ञाधारक मूले, समाजात प्रतिष्ठा आणि त्यासाठी काही काहीही करायला आपण तयार असतो. जर ह्या इच्छा काही कारणाने पूर्ण नाही झाल्या तर आपला हिरमोड होतो. चित्त कलुषित होते. त्या मार्ग आड येणाऱ्या लोकांचा आपण तिरस्कार करतो. पण जेव्हा मुळातच सात्विक स्वभाव असेल तर मनुष्य अत्यंत दुःखी होतो. त्याची पुण्य कर्मे फलित होतात. त्याला हवी असते मनःशांती. ईश्वराची कृपा होण्याची वेळ समीप येते. साधू संतांची संगती त्याच्या मनाला भावते. ईश्वराविषयी आणखी जाणून घेण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण होते. संसारिक व्यापात बद्ध असलेला तो मुमुक्षु होतो. मुमुक्षूचा भक्त होतो. भक्ताचा साधक होतो. क्वचित प्रसंगी त्याच्या मनात तीव्र वैराग्याचा उदय होतो. देवाच्या नुसत्या नामाने त्याचे अष्टसात्विक भाव उचंबळून येतात. तो अंतर्मुख होतो. परमेश्वराचे साधन, भजन, कीर्तन, ईश्वरापाशी आत्मनिवेदन, ईश्वराचे सख्य, ईश्वराचे  दास्य, देवाचे पूजन, आराध्याचे नाम स्मरण, परमात्म्याचे अर्चन, ई. भक्तीची विविध रूपं भक्ताच्या मनोभूमीवर अंकुरित होतात आणि त्या दयाघन, करुणामय, आनंदघन ईश्वराच्या भेटीला मन व्याकूळ होते. अतिशय कासावीस होते. तो आपल्या ईश्वराला हाक मारू लागतो. जे जे भेटिजे भूत | ते ते मानिजे भगवंत अशी त्याची अवस्था होते. सर्वाभूती एक तूच अशी त्याला अनुभूती येते. वैराग्याच्या अग्नीने मनोभूमीवरचे  विकारांचे, विषयांचे, वासनांचे तण जळून नष्ट होतात. मनोभूमी भक्तीच्या बीज पेरण्याकरिता तयार होते. आणि ते बीज जेव्हा अंकुरित होते तेव्हा ईश्वराच्या कृपेचे ढग दाटून येतात आणि अवचित त्याच्या कृपेच्या वर्षाव होऊ लागतो. सद्गुरूंच्या स्वरुपात ईश्वर मार्गदर्शक होतो. वाटाड्या होतो. भवसागरातून पार होण्याकरिता भक्तीच्या नावेचा नावाडी होतो. संत साहित्य मध्ये अशी अनेक उदाहरण आहेत. पाहूया पुढच्या लेखात.

No comments:

Post a Comment