Wednesday, October 28, 2015

जीवनाचा खेळ

कधी कधी आपण भारावून जातो. मनाचा भारलेपणा अनुभवतो. असा अनुभव जो शब्दात व्यक्त नाही करता येत. दऱ्याखोर्यात संपूर्ण आयुष्य घालवलेल्या खेडुताला समुद्रावर न्या. अथांग दूरवर पसरलेला समुद्र पाहून त्याच्या मनाची अवस्था काय होईल? आयुष्यात पहिल्यांदा भर पौर्णिमेच्या रात्री ताज महाल पाहिल्यावर काय होईल? उंच उंच हिमाच्छादित शिखर, सुर्याकिरणात सोन्यासारखी चमकणारी शिखर पाहिल्यावर काय होईल? सुंदर फुललेलं फुल, बाळाच्या चेहऱ्यावरच निरागस हास्य. एखाद आवडतं गाणं, उगाचच घेतलेली एखादी गिरकी, मारलेली एखदी तान, काढलेलं मस्त चित्र. हि असते मनाची उन्नत अवस्था. जेव्हा मन विचारशुन्य  होतं. अशी अवस्था जिथे आपल्याला काहीच नको असतं. सर्व काही मिळाल्याची भावना. एखादी पूर्ण झालेली जुनी इच्छा. खूप खूप वर्षांनी भेटलेला जुना मित्र. त्याच्याशी मारलेल्या भरपूर गप्पा. मन ना कधी भूतकाळाचा मागोवा घेत कि भविष्यात डोकावत. अशा क्षणी अवचित स्वतःला स्वतःचा शोध लागतो. आणि हाच असतो क्षण आनंदाचा. हीच असते एक प्रकारची समाधी. पण खरी समस्या हि आहे कि मनाची हि अवस्था क्षणिक असते. शाश्वत नसते. परत पुनः आपल्या उन्नत जाणिवांचा स्तर खाली येतो आणि आपले रहाट गाडगे चालू होते. पहिले पाढे पंचावन्न. आपण पुनः तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे आपल्याला तशी अनुभूती आली होती तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो पण तसे होत नाही. ती प्रक्रिया मग कंटाळवाणी होते. कवचित पुन्हा तशी अनुभूती येते हि. हीच तर खरी मेख आहे जीवनाची. हे एक खेळ असतो A game of life.  जीवनातले हे हळवे क्षण शोधायचे असतात. मनातल्या खोल कप्प्यात जोपासायचे असतात. आठवणींची पाखरं भिरभिरणारी मोजायची असतात. हे क्षण कोणाला सापडतात तो जिंकतो ज्याला नाही सापडत त्याने शोध चालू ठेवायचा असतो जीवनाला जिंकण्यासाठी.


No comments:

Post a Comment